Experiments on humans and ethics  sakal
संपादकीय

माणसांवरचे प्रयोग आणि नैतिकता

माणसाचे आयुर्मान वाढवणे आणि निरनिराळ्या रोगांवर उपाय शोधणे या बाबतीत वैद्यकीय क्षेत्राने जी नेत्रदीपक प्रगती केली

दीप्ती गंगावणे

माणसाचे आयुर्मान वाढवणे आणि निरनिराळ्या रोगांवर उपाय शोधणे या बाबतीत वैद्यकीय क्षेत्राने जी नेत्रदीपक प्रगती केली

माणसाचे आयुर्मान वाढवणे आणि निरनिराळ्या रोगांवर उपाय शोधणे या बाबतीत वैद्यकीय क्षेत्राने जी नेत्रदीपक प्रगती केली आहे, ती वैज्ञानिक पद्धतीच्या बळावर. निरीक्षण आणि प्रयोग हे वैज्ञानिक पद्धतीचे दोन मुख्य आधारस्तंभ आहेत. आधुनिक पाश्चात्य वैद्यकाच्या सुरवातीच्या काळात माणसाची शरीर रचना समजावून घेण्यासाठी वैज्ञानिकांना मृत शरीराचे विच्छेदन लपूनछपून करावे लागे. वैद्यकीय विद्यार्थ्यांना आजही मृतदेहाचे विच्छेदन करावे लागते हे आपल्याला माहिती आहे. या पद्धतीला आज समाज मान्यता आहे. पण माणसांच्या शरीरावर औषधांचे, शस्त्रक्रिया आणि इतर उपचार पद्धतींचे नक्की काय परिणाम होतात हे अभ्यासण्यासाठी अनेकदा जिवंत माणसांवर प्रयोग करावे लागतात. अशा प्रयोगांखेरीज वैद्यक विज्ञानाच्या, तंत्रज्ञानाच्या विकासाला मोठ्याच मर्यादा पडतात. मात्र असे प्रयोग करणे नैतिकतेच्या दृष्टीने विवादास्पद असते. असे प्रयोग ज्या व्यक्तींवर केले जातात, त्यांचे हित आणि हक्क हे मुद्दे या संदर्भात मध्यवर्ती ठरतात.

प्रयोग म्हटले, की त्यात यशापयश असते. पण अयशस्वी प्रयोगही महत्त्वाचे असतात, कारण काय होऊ शकत नाही, हे त्यांमधून समजते. प्रयोग सफल होवोत की असफल, ज्यांच्यावर प्रयोग होतात, त्यांना त्यांमधून काही इजा होते का, होत असल्यास त्याची व्याप्ती या सगळ्याचा विचार आवश्यक असतो. प्रयोगांमुळे भविष्यात रुग्णांचे हित साधले जाण्याची शक्यता निर्माण होते, पण ती वर्तमानात प्रत्यक्षात आलेली नसते. रुग्णांचे भविष्यकालीन हित आणि प्रयोगात सहभागी व्यक्तींना प्रत्यक्ष सोसावी लागणारी पीडा, इजा या दोन्हींमध्ये कुणाचे पारडे जास्त जड हे बघावे लागते. जर हे अहित, वेदना यांचे प्रमाण रुग्णांना होऊ शकणाऱ्या फायद्यापेक्षा जास्त असेल तर असे प्रयोग नैतिकदृष्ट्या समर्थनीय ठरत नाहीत. अनेकदा असे प्रयोग सहभागींसाठी कमी-अधिक प्रमाणात धोकादायक असतात. त्यामुळे सहभागींच्या सुरक्षिततेची सगळी काळजी घेतली जाणे नैतिक आणि कायदेशीर दृष्टीने बंधनकारक असते.

संबंधित व्यक्तीला प्रयोग, त्यात उद्भवू शकणारे धोके, सहभागीला होऊ शकणारा त्रास, वेदना किंवा अस्वास्थ्य यांची पुरेशी माहिती दिली पाहिजे. या माहितीच्या आधारे व्यक्तीने संमती दिल्याशिवाय असे प्रयोग करणे नीति आणि कायदा चुकीचे मानतात. तसेच त्या व्यक्तीला एखाद्या टप्प्यावर प्रयोगातून बाहेर पडण्याचे स्वातंत्र्य देणे अपेक्षित असते. व्यक्तीने खरेच स्वेच्छेने अशी संमती दिली का, हेही तपासवे लागते. जगात प्रचंड प्रमाणात असलेल्या विषमतेमुळे ज्यांच्याजवळ आर्थिक, सामाजिक, राजकीय सामर्थ्य नसते, किंवा फार कमी प्रमाणात असते, त्यांचे शोषण होते. जर्मनीत नाझी राजवटीत ज्यू आणि इतर काही समूहांचा अशा प्रयोगांसाठी जो वापर झाला त्यात त्यांचा अनन्वित छळ झालाच, पण छळ करण्याच्या अमानुष पद्धतींचा शोधही त्यामधून लागला. अशा प्रकारच्या ‘वैज्ञानिक संशोधनाला’ नैतिक समर्थन देणे अशक्य आहे. वैज्ञानिक पद्धतीने केले आहे या केवळ एकाच कारणासाठी कुठलेही संशोधन योग्य ठरत नाही. संशोधनाची उद्दिष्टे रुग्णोपयोगी असावी लागतात. प्रयोगांमधून होणाऱ्या लाभ-हानीचे प्रमाण योग्य असायला लागते. प्रयोगातील सहभागींचे हक्क, त्यांच्या व्यक्तित्वाची प्रतिष्ठा, त्यांचे हित यांचा पुरेसा विचार ज्या प्रयोगांत केला जात नाही, ते नैतिक दृष्टीने असमर्थनीय असतात.

माणूस आणि काही विशिष्ट प्राण्यांच्या शरीर रचनेतील, क्रिया-प्रक्रियांमधील साम्य लक्षात आल्यानंतर गेल्या शतकापासून त्या प्राण्यांवर प्रयोग होऊ लागले. जेव्हा-जेव्हा प्राण्यांवर होणारे प्रयोग शक्य आणि उपयोगी असतात, तेव्हा-तेव्हा ते प्रयोग माणसांवर करणे टाळावे, असा दंडक आहे. प्राण्यांवरील प्रयोगांसंदर्भात जे नैतिक प्रश्न उपस्थित होतात, त्यांचा विचार पुढील लेखात करू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Shakti: शक्ती चक्रीवादळ कुठे पोहोचले? धोका नेमका कधी टळणार? हवामान खात्याकडून तारीख जाहीर

Ramdas kadam : रामदास कदम यांचा आणखी एक खळबळजनक दावा, थेट उद्धव ठाकरेंना आव्हान

Crime News : गोळीबार प्रकरण: पंचवटी पोलिसांकडून १४वा संशयित जेरबंद, आतापर्यंत माजी नगरसेवकासह १४ अटकेत

World Cup 2025: भारताविरुद्ध पाकिस्तानने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल; हस्तांदोलन झालं की नाही?

Sangli Accident Death : काम संपवून घरी निघाला होता, समोरू दुचाकी आली अन् दोघेही जाग्यावर संपले; सांगलीतील घटना

SCROLL FOR NEXT