कथालेखक अरविंद बुधकर यांच्या ‘धुक्यात हरवलेले शकुनांचे पक्षी’ या संग्रहातील बहुतेक कथा समाजातील शोषितांविषयी आहेत
- राजीव जोशी
कथालेखक अरविंद बुधकर यांच्या ‘धुक्यात हरवलेले शकुनांचे पक्षी’ या संग्रहातील बहुतेक कथा समाजातील शोषितांविषयी आहेत. त्यातून त्यांनी समाजात, माणसा-माणसात असणाऱ्या वृत्ती आणि प्रवृत्तीचा शोध घेतला आहे. वाचकांना गुंतवून ठेवणाऱ्या या कथा सामाजिक जाणिवांविषयी जागरुक करणाऱ्या आहेत.
वास्तविक कथा हा वाङ्मय प्रकार लहानपणापासून आपल्या परिचयाचा आहे. आजी-आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकत आपण मोठे झालो. चांदोबा, चंपक, किशोर अशा मासिकांनी कथेची भूक भागवली. अलीकडच्या आजी-आजोबांनाही नातवंडांना गोष्ट सांगावी लागते.
साधारण एकशे तीस वर्षांपूर्वी आपल्याकडे लघुकथा हा प्रकार हरिभाऊ आपटे यांनी आपल्या करमणूक मासिकातून रुजवला. ‘आजकालच्या गोष्टी’ त्यांनी करमणुकीतून लिहायला सुरुवात केली आणि समोर श्रोते बसले आहेत असे समजून, त्यांना विश्वासात घेत ‘वाचकहो’ असे संबोधून एखाद्या कथेकऱ्याच्या थाटात ते गोष्टी लिहीत असत.
आज नेट-इंटरनेटमुळे सतत आपल्या कानावर काही काही आदळत असते. जे कळले ते दुसऱ्यांना सांगण्याची मानवी वृत्ती असल्यामुळे त्याची चढाओढच समाजमाध्यमांवर चाललेली आहे. प्रत्येकाला काही तरी सांगावेसे वाटते, घरचे-दारचे, आजू-बाजूचे, याचे-त्याचे, राजकारण-समाजकारणातले वगैरे.
त्यामुळे गोष्ट घटनासापेक्षतेकडून अधिकाधिक व्यक्तिसापेक्ष होत गेली, व्यक्तिविशेषत्वाच्या बारकाव्यानिशी. कवितेत क्रांती करण्याची शक्ती आहे असे म्हटले जाते. मला व्यक्तिश: क्रांती करण्याची ताकद कथेत विशेषत्वाने जाणवते. गोष्टी, सांगितलेल्या असो, वाचलेल्या असोत वा लिखित, बारीक बारीक तुकड्यांनी समाजात पसरतात आणि गोष्ट गोष्ट न राहता अफवा बनत जातात. याच अफवा समज-गैरसमज व्यक्ती आणि समाजात पसरवत जातात.
हे सर्व सांगण्याचे कारण अरविंद बुधकर यांच्या कथा. ते स्वतः समाजकार्याशी, समाजातल्या विविध तळागाळातल्या घटकांशी, कामगारांशी, कामगार प्रश्नांशी, त्यांच्या कौटुंबिक आणि कायदेविषयक अडचणींशी अनेक वर्षे संबंधित आहेत.
संग्रहातील बहुतेक कथा समाजातील शोषितांशी संबंधित असल्या तरी त्यातून समाजात, माणसा-माणसात असणाऱ्या वृत्ती आणि प्रवृत्तीचा शोध लेखक घेत जातो. एका अर्थाने लेखक आजकालच्याच गोष्टी सांगू पाहत आहे.
चक्रव्यूह कथेचा नायक उमेश. घरची गरिबी, पण एक हुशार मुलगा म्हणून महाविद्यालयात परिचित असतो. वृत्तीने पापभिरू असला तरी कुणाच्याही अडीअडचणींना धावून जाणारा असतो आणि म्हणूनच शिक्षकांसह मुलांमध्येही प्रिय असतो.
त्याच्याच महाविद्यालयातील शिकणारी आणि सरपंचांच्या कार्यालयात काम करणारी ऊर्मिला सरपंचाच्या मुलाकडून फसवती जाते. तिची गरिबी पाहून पैशाच्या जोरावर प्रकरण झटकतो; पण आई-वडिलांचा आणि त्यांच्यावर येणाऱ्या बदनामीचा विचार करून पोटुशी राहिल्यावर विहिरीत उडी मारते. उमेश कशाची पर्वा न करता विहिरीत उडी मारतो.
तिला बाहेर काढतो; पण त्यातून ती जगत नाही. मरताना ती सरपंचांच्या मुलासंबंधी अस्पष्ट बोलते. यातून प्रेमभंगाला उमेश कारणीभूत आहे, असं वाटून सरपंच व त्यांचा मुलगा पोलिसांवर दबाब आणून उमेशला अटक करायला लावतात.
सरपंच कॉलेजचे ट्रस्टीही असतात. उमेशच चारित्र्य, हुशारी, मदत करण्याची वृत्ती यामुळे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी एकत्र येतात. त्यामुळे चौकशीची दिशा बदलते. डीएनए रिपोर्ट वगैरे घेऊन उमेश निर्दोष सुटतो. उमेश पुढे शिक्षण पूर्ण करून कामगार अधिकारी म्हणून एका कंपनीत काम पाहू लागतो, तिथेही अपघातात मेलेल्या झोपडपट्टीतल्या कामगारांसाठी लढतो. उमेशच्या जीवनाची टॅगलाईन ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ हे लेखक सूचित करतो.
बुधकर यांच्या बहुतांश कथा समस्याप्रधान आहेत. अनेक ज्वलंत प्रश्न ते कथेतून हाताळताना दिसतात. यातून माणसा माणसांतील सत्ता संघर्ष, अहंकार ते मांडतात. बॉसशी अनैतिक संधान बांधून आपल्या वा स्पर्धकाला कसे जाळ्यात पकडले जाते आणि त्यांच्यातले सद्गुण,
चारित्र्य यांचे हनन करीत त्यांना कसे अडचणीत आणले जाते, हे अविनाश आणि रोमाच्या संघर्षातून ते ‘सापळा’ या कथेत लेखक परिणामकारकरीत्या मांडतो. यात हार-जीत कुणाची होते हे समकालीन वास्तवामुळे परिचयाचे असले, तरी शेवटी आपले कुटुंब, पत्नी, आई-वडील हेच आपले खरे हितचिंतक असतात, असे लेखक सूचित करतो.
अशाच एका सापळ्यातून सुटलेली, बीड जिल्ह्यातील दुष्काळी भागात शेतात राबणारी, मोलमजुरी करून शिकणारी, वाचनाची आवड असणारी, कॉलेज करून पोळी-भाजीचे घरकाम करणारी सुरेखा नोकरीला लागते.
प्रोबेशनवरून कायम करण्यासाठी बॉस तिला एकटीला कॅबिनमध्ये भेटायला बोलावतो, ती न बधल्यामुळे कामात चुका काढतो, मोठा बॉस कायम करण्याच्या आड येतो, असे दर्शवतो. यातून, निरपेक्षपणे आणि नकळत मोठा बॉस तिची कशी पाठराखण करतो, त्यातून कशी सुखरूप बाहेर येते हे लेखक ‘कसोटी’ या कथेत मोठ्या नाट्यमय पद्धतीने मांडतात. अस्तित्व, व्यावसायिक नीतिमत्ता, अस्मिता, प्रवृत्ती, स्त्री-पुरुष संघर्ष बुधकरांच्या कथेच सूत्र आहे.
अरविंद बुधकर यांचा कामगार क्षेत्रातील व्यवस्थापनाचा अनुभव लक्षात घेता या क्षेत्रातील मजुरांवरील अन्याय, पिळवणूक आदी त्यांच्या कथेत येणे अपेक्षितच आहे. त्या गोष्टी सांगणे हरीभाऊ यांच्या शैलीच्या जवळ जाणाऱ्या आहेत. बुधकर यांचा हा १६० पानांचा दुसरा कथासंग्रह ठाण्याच्या नवसृजन प्रकाशनाने अलीकडेच प्रकाशित केलाय. संग्रहात एकूण तेरा कथा वाचकांना गुंतवून ठेवणाऱ्या आणि सामाजिक जाणिवांविषयी जागरुक करणाऱ्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.