Sculpture of Nagaraja in Ajanta Caves. esakal
सप्तरंग

राजवंश भारती : नागवंश

Latest Marathi Article : नागवंशीय राजांनी पौराणिक काळात विदिशा, मथुरा, पद्मावती या ठिकाणांहून आपला राज्यकारभार केला.

सकाळ डिजिटल टीम

लेखक : ॲड. सुशील अत्रे

अगदी प्राचीन काळापासून नागवंश अस्तित्वात आहे. त्यांची राज्ये लहान व विखुरलेली होती, पण ती प्रत्येक कालखंडात होती. नागवंश (Naga dynasty) भारताच्या प्रदीर्घ इतिहासाचा महत्त्वाचा साक्षीदार आहे. नागांचे पुसटसे उल्लेख वेदांमध्ये आढळतात;

पण नागवंशाबद्दल ठळक उल्लेख आढळतो, तो महाभारतात. अगदी आजही भारताच्या ईशान्येकडे नागांचा एक प्रदेश, नागप्रदेश ‘नागालँड’ नकाशात विद्यमान आहे. नागवंशीय राजांनी पौराणिक काळात विदिशा, मथुरा, पद्मावती या ठिकाणांहून आपला राज्यकारभार केला. (nashik saptarang latest article on Naga dynasty marathi news)

नागवंश हा असा राजवंश आहे, जो अगदी प्राचीन काळापासून भारतात अस्तित्वात होता. नागांचे पुसटसे उल्लेख वेदांमध्ये आढळतात; पण नागवंशाबद्दल ठळक उल्लेख आढळतो तो महाभारतात. असे दिसते, की सूर्यवंश व चंद्रवंश या दोन्ही प्राचीन वंशांच्या जोडीने नागवंशाची लहान-मोठी राज्ये भारतवर्षात नांदत होती.

पण त्यांचे प्रदेश बहुधा मुख्य राजप्रदेशांपासून दूर, एकीकडे असे होते. शिवाय इतर क्षत्रिय वंशांच्या मानाने नागवंशीराजे अर्धनागरी समजले जात. त्यांच्याविषयी एक प्रकारची भीती आणि परकेपणाची भावना तत्कालीन राजकुळांमध्ये होती. नाग किंवा निषादांचे राज्य जोपर्यंत आडबाजूला होते, तोपर्यंत मोठ्या राजसत्तांना काही आक्षेप नव्हता.

पण त्यांचे वर्चस्व वाढत आहे, अशी शंका आली, की या राजांना ती धोक्याची घंटा वाटायची. मग कोणतेही निमित्त काढून मोठ्या राजसत्ता नागांशी युद्धाला सुरवात करीत. नागवंशी लोक मुळात अत्यंत शूर आणि लढवय्ये होते, पण साधनसामग्रीबाबत ते क्षत्रिय राजांपेक्षा बरेच उणे होते. त्यामुळे बऱ्याचदा त्यांना पराभव स्वीकारावा लागला, असे दिसून येते.

याशिवाय आणखी एक महत्त्वाची उणीव त्यांच्यात होती; ती म्हणजे शिक्षणाची. कोणत्याही महत्त्वाच्या घटनेची नोंद त्या काळी बहुधा मौखिक परंपरेने ठेवली जायची. ती कथारूपात, श्लोकबद्ध करून, पाठांतराने प्रसारित होत असे; जसे महाभारत व्यासशिष्यांनी सर्वज्ञात केले.

त्यामुळे नोंदवणारी व्यक्ती ही मुळातच या मोठ्या राजवंशांशी निगडित असलेली, त्यांची नोंद पक्षपाती अशीच असणार हे उघड आहे. म्हणूनच नागवंशाच्या राजांचे उल्लेख जे प्राचीन वाङ्मयात आहेत, ते तुटक आणि अपुरे आहेत. त्यांची एक सलग अशी वंशावळ सापडतच नाही आणि त्यांचे जे चित्रण केले गेले आहे, तेही अगदी चमत्कारिक, अतिरूपकात्मक आहे.

नागांविषयी बोलताना ते जणू प्रत्यक्ष सर्पयोनीतील अजस्र जीव होते, अशी वर्णनेच जास्त आहेत. विविध शापांच्या गुंतावळ्यात त्यांना अडकवून अतिमानवी योनीत टाकून दिले आहे. परिणामी, या कथांमागची रूपके समजून घेऊन त्यातून इतिहास शोधणे फार जिकिरीचे होते. (Latest Marathi News)

अशा रूपकांच्या गुंत्यातून नाग या राजवंशाची जी थोडीफार माहिती समजते ती अशी : महर्षी कश्यपांना कद्रू या पत्नीपासून जी मुले झाली, त्यांच्यापैकी महत्त्वाचे म्हणजे अनंत (शेष), वासुकी, तक्षक, कर्कोटक, कालिया, पद्म, शंख, कुलिक, धृतराष्ट्र, ऐरावत (ही नागांचीच नावे आहेत) इत्यादी.

कद्रू ही विनतेची बहीण आणि दक्षप्रजापतीची मुलगी असल्याचे पुराणांमध्ये म्हटले आहे. पण, ती स्वत: नागपूजक वनवासी समाजाची असावी किंवा तिने तशी पूजापद्धती अंगीकारली असावी. तिने आपल्या मुलांना ‘नागवंशी’ ही ओळख दिली. त्यांनीही तीच ओळख भविष्यात कायम ठेवली. तशी नागकुळे कितीतरी आहेत; पण आपण सध्या ‘नाग’ या राजवंशाचा विचार करतोय.

कश्यपांनी जो भूभाग रहिवासयोग्य केला, त्याला कश्यपांचा प्रदेश- ‘कश्यपमीर’ हे नाव मिळाले. ते आजचे काश्मीर. इथेच त्यांच्या मुलाने अनंताने आपली नगरी वसविली ती अनंतनाग. अनंताला ‘शेष’ या नावानेही ओळखले जाते. हा पौराणिक नागवंशातील बहुधा पहिला आणि सगळ्यात श्रेष्ठ राजा होय. दुसरा कद्रूपुत्र वासुकी. त्यानेही त्याच भागात हिमालयाच्या पायथ्याला आपले नागराज्य उभे

केले. कर्कोटकानेही काश्मीर प्रदेशातच राज्य केले. त्याचा वंश जास्त काळ टिकला. इसवी सनाच्या आठव्या शतकातील काश्मीरचा प्रसिद्ध राजा ‘ललितादित्य मुक्तापीड’ हा कर्कोटक वंशाचाच राजा होता. कल्हणाच्या ‘राजतरंगिणी’ या ग्रंथामध्ये याची सविस्तर माहिती आहे.

तक्षक थोडा दक्षिणेकडे सरकला. पंचनद प्रदेशात तक्षकशिलेला त्याने आपले राज्य स्थापन केले. कालियाने पूर्वेकडे, यमुनेच्या आसपास आपली वस्ती हलवली. तक्षक आणि कालिया यांनी महत्त्वाकांक्षेपोटी चंद्रवंशाशी वैर पत्करले. त्याचा परिणाम असा झाला, की यदुवंशी श्रीकृष्णाने कालियाला यमुनेपासून हाकलून लावले. (Latest Marathi News)

तिकडे खांडववन अर्जुनाने जाळले, तेव्हा त्यात प्रच्छन्नपणे राहणारी तक्षकपत्नी आणि अनेक नागसेवक मारले गेले. साहजिकच तक्षकाने पांडवांशी वैर धरले. ते अनेक वर्षे टिकले. महाभारत युद्धानंतर त्याने परिक्षित राजाला (बहुधा विषप्रयोगाने) मारले. त्याचा सूड जनमेजयाने घेतला आणि त्याने सगळ्या नागवंशाविरुद्ध युद्ध पुकारले.

तक्षक देवांच्या राजाला इंद्राला शरण गेला. अखेर आस्तिक या एका नागमातेच्या ब्राह्मणपुत्राने या सूडयज्ञात मध्यस्थी करून समेट घडवून आणला. या वैरभावाच्या विपरीत जाऊन अर्जुनाने वनवासात असताना कौरव्य नागवंशाची राजकन्या उलूपी हिच्याशी गांधर्व विवाह केला. त्यांचा मुलगा इरावान, महाभारत युद्धात पांडवसेनेत होता. नागवंशीय राजांनी पौराणिक काळात विदिशा, मथुरा, पद्मावती या ठिकाणांहून राज्यकारभार केला.

इ. स. पूर्व तिसऱ्या शतकात सातवाहन राजा सीमूत याची राणी ‘नागनिका’ ही नागवंशीय होती. स्वत:च्या नावाची नाणी पाडणारी आणि शिलालेख कोरून घेणारी ती इतिहासातील पहिली महिला राज्यकर्ती होती आणि हा मान नागवंशाला जातो! नागवंशीय राजांनी भारताच्या मध्यावर स्थापन केलेली नगरी त्यांच्या नावानेच ओळखली जाते, ती म्हणजे नागपूर!

दक्षिणेतील पांड्य राजवटीची पाळेमुळेही नागवंशात आहेत, असे काही अभ्यासकांचे म्हणणे आहे. हिंदू पुराणांव्यतिरिक्त बौद्ध जातके आणि जैन पुराणांमध्येही नागराजांचा संदर्भ आढळतो. आपल्या अजिंठा लेण्यांमध्ये नागराजाचे एक सुरेख शिल्प कोरलेले आहे.

अशा प्रकारे अगदी प्राचीन काळापासून नागवंश अस्तित्वात आहे. त्यांची राज्ये लहान व विखुरलेली होती, पण ती प्रत्येक कालखंडात होती. नागवंश हा भारताच्या प्रदीर्घ इतिहासाचा महत्त्वाचा साक्षीदार आहे. अगदी आजही भारताच्या ईशान्येकडे नागांचा एक प्रदेश, नागप्रदेश ‘नागालँड’ नकाशात विद्यमान आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray visits Meenatai Thackeray statue : उद्धव ठाकरेंनी केली मीनाताईंच्या पुतळ्याची बारकाईने पाहणी अन् म्हणाले ‘’या मागे दोनच व्यक्ती…’’

World Athletics Championships : नीरज चोप्राने एकाच प्रयत्नात केले सर्वांना गार, आता पाकिस्तानच्या अर्शद नदीमच्या कामगिरीकडे लक्ष

Uddhav Nimse : मुंबई हायकोर्टाकडूनही जामीन नाकारला: उद्धव निमसे अखेर पोलिसांपुढे शरण

Navratra and Overthinking Tips: मन गोंधळले असेल तर नवरात्रीचे ९ दिवस देतील नवा आधार! अशी करू शकता ओव्हरथिंकिंगवर मात

Jalaj Sharma : जिल्हाधिकारी जलज शर्मांची मोठी घोषणा: नाशिकमधील गड-किल्ले होणार स्वच्छ

SCROLL FOR NEXT