ravindra bansode
ravindra bansode sakal
सप्तरंग

लढणारा कार्यकर्ता

संपत मोरे

व्यवस्थेच्या विरोधात कायम दंड थोपटून उभा राहणारा लढवय्या रवींद्र बनसोडे! प्रसिद्धीपासून दूर राहून त्याची वाटचाल सुरू

व्यवस्थेच्या विरोधात कायम दंड थोपटून उभा राहणारा लढवय्या रवींद्र बनसोडे! प्रसिद्धीपासून दूर राहून त्याची वाटचाल सुरू आहे. गोरगरिबांची पोरं शिकली पाहिजेत म्हणून वसतिगृह उभारणारा. ते चालवण्यासाठी सतत धडपड करणारा. रवीचे वाचन अफाट आहे. कोणताही संदर्भ विचारला की तो लगेच सांगतो.

आपला एक मित्र स्वत: अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत राहून, ठामपणे चळवळ उभारतो, संस्थात्मक काम करतो, याचा सार्थ अभिमान आहे. अशा हाडाच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी बळ उभे करणे, त्यांची उमेद वाढवणे हीच आपली जबाबदारी असते.

रवींद्र बनसोडे हा पंधरा वर्षांपूर्वी परिवर्तनवादी चळवळीत भेटलेला एक मित्र. पूर्णवेळ कार्यकर्ता. समाजात समता यावी म्हणून जे लढे सुरू आहेत, त्यात सहभागी असलेला रवीदादा रस्त्यावर लढणारा आणि संघटनात्मक काम करणारा एक कार्यकर्ता.

विद्यार्थिदशेत तो आणि त्याचे राज्यभर असलेले सहकारी एकत्रितपणे समतेची भूमिका घेऊन लढत होते. यातील अनेक लढे परिवर्तनवादी चळवळीच्या विश्वात चर्चिले गेले. रस्त्यावरची लढाई करणे, सामान्य माणसांच्या प्रश्नांवर आवाज उठवणे, त्यांचा आवाज बनणे हे या चळवळीचे सूत्र होते. सोबतीला होती पुस्तके आणि त्या पुस्तकांतील क्रांतिकारी विचार. याच विचाराच्या वाटेवरून रवीदादा चाललेला.

रस्त्यावरची लढाई सुरूच होती. मोर्चे, आंदोलने सुरूच होती. लढे सुरूच होते. यादरम्यान रवीने ठरवले आपण चळवळीसोबत काही संस्थात्मक काम करावे. त्याने प्रबुद्ध फाऊंडेशनची स्थापना केली. त्या माध्यमातून मुलांचे वसतिगृह सुरू करण्याचा विचार केला. विजय नाग, पल्लवी आणि दीपाली हे ज्येष्ठ सहकारी सोबतीला घेऊन मुलांचे वसतिगृह सुरू केले.

दौंड तालुक्यातील खुटबाव या गावात रवीने सुरू केलेले संत कबीर वसतिगृह आहे. लहानपणी आईचे छत्र गमावले. मग रवी पुण्यात आला. त्याला व त्याच्या भावंडांना त्याच्या प्रेमळ मावशीने सांभाळले. आईचे प्रेम दिले. या काळात त्याची पुस्तकांसोबत ओळख झाली.

चळवळीसोबत जोडला गेला. भाजी विकून कधीकाळी इस्त्रीच्या दुकानात काम करत हा तरुण चळवळीतही सहभाग नोंदवत राहिला. सामान्य कुटुंबातील रवी समाजातील शोषित-पीडितांच्या भल्याचा विचार करत चळवळीत आला. क्रांतिकारी विचार वाचत राहिला आणि तो विचार आयुष्यात जगत राहिला. तरुणांना जोडत राहिला.

चळवळीसोबतच केवळ गरिबीमुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करावे म्हणून त्याने वसतिगृह उभे केले; पण हे उभारत असताना आलेले अडथळे सांगताना आजही रवीदादाचे डोळे पाणावतात. एका कार्यकर्त्याला संस्था उभी करताना किती संघर्ष करावा लागतो, हे त्याने जवळून अनुभवले. त्या अडचणींना सामोरे जात त्याने वसतिगृह उभे केले.

काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. रात्रीचे आठ वाजलेले. रवी मला फर्ग्युसन रोडवर भेटला. म्हणाला, ‘‘मला घरी जायला वेळ होईल. मला घरी सोडतोस का?’’ मी त्याला सोडायला घरी निघालो. रवीची आणि माझी अनेक वर्षांची ओळख होती; पण त्याच्या घरी जायचा योग कधी आला नव्हता. आम्ही गेलो.

मार्केट यार्डजवळ असलेल्या एका वस्तीजवळ थांबलो. तिथे गाडी लावून मी रवीच्या पाठीमागे एका बोळातून निघालो. एकदम अरुंद बोळ. जाताना पत्रा लागेल म्हणून मी चुकवत निघालो. रवी रोजच्या सवयीनं निघाला होता.

माझी मात्र तारांबळ उडत होती. त्या बोळातून अनेक वळणे घेत आम्ही एका छोट्या खोलीजवळ थांबलो. रवीने दार उघडले. आत गेलो, तर दोन माणसे कशीतरी बसतील एवढी छोटी खोली. वातावरण दमट होते.

‘हे माझं घर’ तो म्हणाला. चेहऱ्यावर आपण काही नवीन सांगतोय, असे भाव नव्हते. उलट सगळी परिस्थिती मी स्वीकारली आहे. असेच त्याच्या देहबोलीतून जाणवत होते. मी रवीला अनेक दिवसांपासून पाहत होतो.

एवढ्या चळवळ्या तरुण, व्यवस्थेच्या विरोधात कायम दंड थोपटून उभा राहणारा लढवय्या, गोरगरिबांची पोरं शिकली पाहिजेत म्हणून वसतिगृह उभारणारा आणि ते चालवण्यासाठी सतत धडपड करणारा माणूस एवढ्या हलाखीत राहत असेल असे स्वप्नातही मला वाटले नव्हते. रवीचे वाचन अफाट आहे.

कोणताही संदर्भ विचारला की तो लगेच सांगतो. अनेक लोक, पत्रकार त्याला फोन करून संदर्भ विचारतात. त्या रवीने एवढे अफाट वाचन त्या छोट्याशा खोलीत बसून केले असेल? त्या कोंदट वातावरणात रवीने कसा अभ्यास केला असेल?

कसा घडला हा कार्यकर्ता? अनेक प्रश्न पडायला लागले. आणि आपला एक मित्र याही परिस्थितीत राहून ठामपणे चळवळ उभारत होता. संस्थात्मक काम उभारत होता याचा अभिमान वाटायला लागला.

शिक्षण हे सगळ्या प्रश्नांचे उत्तर आहे हे रवीला माहिती आहे. त्याला स्वतःला काही कारणांनी शिकता आले नाही; पण तो रवी आज गरिबाघरची मुलं शिकावीत म्हणून रात्रीचा दिवस करतोय.रवीला फोन केल्यावर अनेकदा ‘माझ्या पोरांना भेटायला चाललोय’ असे ऐकायला मिळते.

वेगवेगळ्या गावांतून आणि घरांतून आलेल्या पोरांना रवीदादाचा आणि रवीला पोरांचा लळा लागला आहे. शाळा सुटल्यावर पोरांचे डोळे रस्त्याकडे लागलेले असतात. हातात पिशवी घेऊन येणारा ‘रवीदादा’ दिसला की एखादा पोरगा आनंदाने ओरडतो, ‘‘रवीदादा आला...’’

मग पोरं त्यांच्याकडे येतात. वसतिगृहाच्या दिशेने चालणारा रवी आणि त्याच्या पाठीमागे चालणारी पोरं हे पाहून त्यांचा फोटो काढावा, असा मोह एखाद्या छायाचित्रकाराला होईल असेच ते दृश्य असते. रवी नेहमी म्हणतो, ‘‘ही पोरं खूप मोठी होणार आहेत.’’

रवी आयुष्याच्या मध्यभागी आहे. माणसाला भौतिक म्हणून जे काही सुख हवे असते, त्याची त्याला फिकीर नाही. रवी साधे आयुष्य जगतोय. त्याला स्वतःला खूप काही मोठे व्हायचे नाही. त्याला जे काही करायचे आहे ते या मुलांसाठी!

तो नेहमी या मुलांच्या भविष्याबद्दल बोलत राहतो. पोरं मोठी व्हावीत या स्वप्नासाठी अनेक अडथळ्यांवर मात करत रवी चालतो आहे. अलीकडच्या काळात त्याला सरकारी अडथळे पार करावे लागत आहेत. अनेकदा अनुदान उशिरा मिळते, वर्ष-वर्ष मिळत नाही. अशावेळी त्याची खूप तारांबळ उडते.

काही मित्र-हितचिंतक उभे राहतात; पण तीही मदत तोकडी पडते. रवीदादासारखा लढणारा कार्यकर्ता खूप अस्वस्थ होतो, पण अडथळे आले तरी लढत राहतो. अशा कार्यकर्त्याच्या पाठीशी अनेकांचे बळ उभे राहिले तर त्याला अजून हुरूप येईल असे वाटते. दादा प्रत्येक वेळी वसतिगृहाचा आणि तिथल्या मुलांचा विचार करत राहतो. नवीन योजना आखतो, त्या अमलात आणण्यासाठी कष्ट करतो.

पंधरा वर्षांपूर्वीचा रवीदादा आणि आजचा रवीदादा यात फरक पडलाय, आता त्याने चाळिशी पार केलीय. सततच्या धावपळीचा तब्येतीवर परिणाम झालाय. आजवरच्या धावपळीत शरीराकडे दुर्लक्ष केल्यामुळे शरीराच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत. वयोमानानुसार काही आजार मागे लागले आहेत. हे असूनही तो त्यावर मात करत निघाला आहे.

सकाळी सहा वाजता त्याचा दिवस सुरू होतो. रात्री उशिरापर्यंत तो लोकांच्या सोबत असतो. सतत कार्यमग्न असतो. चळवळीसाठी आयुष्य देणाऱ्या एका कार्यकर्त्याची ही गोष्ट आहे. आताच्या काळात पूर्णवेळ कार्यकर्ते कुठे आहेत?

असे विचारणाऱ्या लोकांनी रवीला भेटावे, त्याच्यासोबत एक दिवस फिरावे, म्हणजे समजेल कार्यकर्ता म्हणजे काय? मी त्याच्यासोबत फिरून हे अनुभवले आहे. त्याचे कार्यकर्तेपण जवळून पाहिले आहे.

रवीदादाने स्थापन केलेल्या संस्थेचे मुलांचे वसतिगृह २००९ मध्ये गोऱ्हे (बु.) येथे एका घरात सुरू केले होते. आज दौंड तालुक्यातील खुटबाव येथे त्याचा विकास-विस्तार झाला आहे. संस्थेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर नवायान संशोधन प्रशिक्षण केंद्र व कौशल्य विकास केंद्र हा प्रकल्प हाती घेणार आहे. संशोधन प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून संस्थात्मक विधायक कृती व फिल्डवर्क करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक केंद्र उभे करण्याचा रवीदादाचा मानस आहे.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत रवीदादांसारखी माणसे रचनात्मक काम करत असतात. प्रसिद्धीपासून दूर राहून त्यांची वाटचाल सुरू असते. अशा हाडाच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी बळ उभे करणे, त्यांची उमेद वाढवणे हीच आपली जबाबदारी असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT