kashi vishwanath temple sakal
सप्तरंग

काशीचा कायाकल्प

प्राचीन भारतीय साहित्यात या काशीनगरीचा उल्लेख ‘काशी, ‘वाराणसी’, ‘अविमुक्ता’, ‘आनंदवन’, ‘महाश्मशान’, ‘व्याप्ती’ अशा अनेक नावांनी केला गेलेला आहे.

शेफाली वैद्य shefv@hotmail.com

प्राचीन भारतीय साहित्यात या काशीनगरीचा उल्लेख ‘काशी, ‘वाराणसी’, ‘अविमुक्ता’, ‘आनंदवन’, ‘महाश्मशान’, ‘व्याप्ती’ अशा अनेक नावांनी केला गेलेला आहे.

आजवर आपण ‘राउळी मंदिरी’ या सदरामधून भारतातल्या अनेक पुरातन मंदिरांची ओळख करून घेतली; पण आज परिचय करून घेणार आहोत तो अशा एका मंदिराचा, जे एकाच वेळी पुरातनही आहे आणि नित्यनूतनही. भारतातच काय पण; संपूर्ण जगात एकही असा हिंदू नसेल ज्यानं काशी शहर आणि तिथल्या भव्य काशी विश्वेश्वराचं नाव ऐकलं नसेल. आयुष्यात एकदा तरी काशीला जावं आणि विश्वेश्वराचं दर्शन घेऊन तिथलं गंगेचं पाणी तामिळनाडूमध्ये रामेश्वरी नेऊन तिथं त्या पाण्यानं शिवावर अभिषेक करावा, असं प्रत्येक भाविक हिंदू व्यक्तीला वाटतं.

काशीमध्ये असं काय आहे की, हजारो वर्षांपासून हिंदूंचा जीव काशीमध्ये अडकलेला आहे? तेरा डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशीमध्ये ३३९ कोटी रुपये खर्चून बांधलेल्या ‘काशी विश्वनाथ मंदिर कॉरिडॉर प्रकल्पा’चं लोकार्पण केलं तेव्हा मी काशीमध्येच होते. जवळजवळ पाच लाख चौरस फूट विस्तार असलेल्या या प्रकल्पानं इंदूर संस्थानची राणी, देवी अहिल्याबाई होळकर यांनी १७८३ मध्ये बांधलेलं विश्वनाथाचं मंदिर थेट गंगाभिमुख केलं. काशी ही काशी आहे ती गंगा नदीमुळे. हिंदूंना सदैव पवित्र असलेली गंगा नदी काशीमध्ये एक खूप मोठं अर्धचंद्राकृती वळण घेते. तिच्या विस्तीर्ण पात्राच्या उत्तरेला, गंगेच्या डाव्या काठावर, वाराणसी वसलेलं आहे. फार प्राचीन काळापासून काशी ही एक पवित्र नगरी मानली गेलेली आहे.

प्राचीन भारतीय साहित्यात या काशीनगरीचा उल्लेख ‘काशी, ‘वाराणसी’, ‘अविमुक्ता’, ‘आनंदवन’, ‘महाश्मशान’, ‘व्याप्ती’ अशा अनेक नावांनी केला गेलेला आहे. रामायण, महाभारत, स्कंद, मत्स्य, पद्म आदी पुराणं, बौद्धजातकं, बृहत्संहिता या सर्व ग्रंथांमधून काशीनगरीचा उल्लेख ‘भगवान शिवांची नगरी’ असा आहे.

महाभारतातील एका कथेनुसार, काशीराज दिवोदास हा या काशीचा संस्थापक आहे. त्यानं इंद्राच्या आज्ञेवरून गंगेकाठी हे नगर वसवलं आणि भगवान शिवांना काशीमध्ये येऊन कायम राहायची विनंती केली. त्या विनंतीला मान देऊन शिव इथं आले आणि त्यांनी भक्तांना सांगितलं की, प्रलय आला तरी काशी शिवांच्या त्रिशूळाच्या तीन टोकांवर सुरक्षित राहील, आणि इथं प्राणत्याग करणाऱ्या सर्वांना जन्म-मृत्यूच्या फेऱ्यापासून कायमची मुक्ती मिळेल.

साक्षात् भगवान शिव काशीत राहायला आल्यामुळे इतर देव-देवताही इथं वास्तव्याला आल्या आणि मंदिरं घडत गेली. फार प्राचीन काळापासून काशी हे संस्कृत, वेद, ज्योतिष, व्याकरण आदी अध्ययनाचे एक प्रमुख केंद्र होते. चिनी प्रवासी ह्यूएन त्संग जेव्हा काशीत आला तेव्हा, ‘आपल्याला शंभर भव्य हिंदू मंदिरं दिसली’ असं त्यानं लिहिलं आहे, तर जेम्स प्रिन्सेप या ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ यानं अठराव्या शतकाच्या सुरुवातीला केलेल्या पाहणीत त्याला जवळजवळ एक हजार मंदिरं आढळली. काशी हे अतिशय सुंदर, श्रीमंत आणि हिंदूंसाठी पवित्र असं शहर होते आणि त्यामुळेच काशीवर इस्लामी आक्रमकांची सतत वक्रदृष्टी राहिली.

काशी हे एक जनपददेखील होतं. ‘बौद्ध अंगुत्तर निकाय’ या ग्रंथात तत्कालीन भारतातील सोळा महाजनपदांमध्ये काशीची गणना होत होती. पुढं अकराव्या शतकात कनौजच्या गाहडवालवंशीय राजांनी वाराणसी इथं आपली उपराजधानी स्थापन केली. त्यांनी बाराव्या शतकात बांधलेलं वाराणसीजवळच्या कंदावा इथलं कर्दमेश्वर महादेव हे एकमेव असं मंदिर आहे, जे आक्रमकांच्या विध्वंसापासून वाचलं. ते मंदिर आजही मूळ स्वरूपात कंदावा इथं एका सुंदर पुष्करिणीशेजारी उभं आहे.

कनौजचा राजा जयचंद राज्यावर असताना मुहंमद घोरीनं काशीवर स्वारी करून तिथली मंदिरं तोडली, हिंदूंचं शिरकाण केले आणि प्रचंड लूट केली. हे काशीवर झालेलं पहिलं इस्लामी आक्रमण. पुढं दिल्लीच्या तख्तावर आलेला कुतबुद्दीन ऐबक आणि त्यानंतरचा इस्लामी शासक अलाउद्दीन खिलजी यांनीही काशीवर हल्ला करून इथली हजार मंदिरं नष्ट केली, त्यात काशीविश्वेश्वराचंही मंदिर होतंच. हिंदूंनी ते परत उभारलं, हुसेन शाह शार्की आणि सिकंदर लोदी यांनी परत ते उद्ध्वस्त केलं. हा विध्वंसाचा आणि पुनर्निर्मितीचा क्रम सुरूच राहिला; पण हिंदूंनी कधीही काशीवरचा आपला हक्क सोडला नाही. जितक्या वेळा मंदिर पाडलं गेलं तितक्या वेळा ते परत बांधलं गेलं.

पुढं अकबराच्या काळात त्याचा सेनापती मानसिंह यानं १५८५ मध्ये काशी विश्वनाथाचं भव्य मंदिर नव्यानं बांधलं; पण औरंगजेबानं १६६९ मध्ये ते मंदिर जमीनदोस्त करून त्या जागी मशीद बांधली आणि हिंदूंवर जिझिया कर लादला. तेव्हा भक्तांनी तिथलं शिवलिंग नजीकच्या ज्ञानवापी विहिरीत लपवलं. औरंगजेबानं मंदिराची एक भिंत जाणून-बुजून अर्धीच पाडून तीवर मशीद उभारली; जेणेकरून हिंदूंना हा अपमान सदैव लक्षात राहावा. त्या काळी मंदिराच्या जागेलाच श्रीविश्वेश्वर मानून भक्त नमस्कार, पिंडदान व प्रदक्षिणा करत असत. औरंगजेबानं वाराणसीचं नावही बदलून महंमदाबाद असं ठेवलं होतं. छत्रपती शिवाजीमहाराजांना या घटनेनं अपरिमित दुःख झालं होतं. उत्तरेवर स्वारी करून हे मंदिर पुन्हा उभारावं अशी त्यांची खूप इच्छा होती; पण त्यांच्या अकाली मृत्यूमुळे ते शक्य झालं नाही.

पेशव्यांच्या राजवटीच्या वेळी अहिल्यादेवी होळकरांनी औरंगजेबकालीन मशीद न पाडता ज्ञानवापीतून शिवलिंग बाहेर काढून, सध्या अस्तित्वात आहे ते पंचमंडपयुक्त विश्वनाथाचं मंदिर सतराव्या शतकात बांधलं. पुढं १८३९ मध्ये महाराजा रणजितसिंगानं या मंदिराचं शिखर सोन्यानं मढवून दिलं. हे मंदिर भारतातल्या सर्व हिंदूंना आकर्षित करतं. सध्या आहे ते मंदिर आकारानं छोटंसंच असलं तरी त्याचं शिखर रेखीव असून त्यावर कलात्मक नक्षी आहे. मागेच श्रीतारकेश्वराचं तसंच एक मंदिर आहे आणि दोन्ही मंदिरांना जोडणारा एक स्तंभयुक्त छोटा सभामंडप आहे; पण या मंडपाचं इस्लामी घुमटाकृती शिखर मुख्य मंदिरशिखराशी विसंगत वाटतं.

पूर्वी हे मंदिर काशीच्या अगदी चिंचोळ्या, गजबजलेल्या गल्लीत होतं, त्यामुळे मंदिराचं स्थापत्य नीट दिसायचंच नाही. आजूबाजूला सर्वत्र अस्वच्छता होती. मंदिराबाहेर जेमतेम पन्नास माणसं उभी राहू शकतील इतकीच जागा होती. मंदिराच्या छोट्या आकारामुळे शेजारी असलेल्या औरंगजेबाच्या मशिदीचे घुमट डोळ्यांना जास्तच खुपायचे. आता मात्र मंदिरपरिसराचा पूर्ण कायापालट झालेला आहे. मंदिराभोवती बांधण्यात आलेल्या भव्य प्राकारामुळे मंदिर तर नीट बघता येतंच; पण हजारो लोक एकाच वेळी पूजा करू शकतात.

प्रत्येक भारतीयानं काशीला जाऊन हे मंदिर बघितलंच पाहिजे इतकं सुंदर आणि भव्य-दिव्य असं हे मंदिर आता दिसतं.

(सदराच्या लेखिका मंदिरस्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

ढिंग टांग : वाजत गाजत या...!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT