कऱ्हाड (सातारा) : महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानांतर्गत (Mahatma Gandhi Dispute Free Village Campaign) जिल्ह्यातील प्रत्येक गावात तंटामुक्त समित्या स्थापण्यात येत आहेत. मात्र, तंटामुक्त समित्या स्थापन होतानाच तंट्यात अडकत आहेत. त्या वादामुळे समित्यांचा पेच वाढला आहे. तालुका पोलिस (Police) ठाण्यांतर्गत तीन ते चार मोठ्या गावात तंटामुक्त समित्यांची स्थापना करताना झालेला वाद मिटविण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. काही महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीमुळे (Election) तंटामुक्ती समितीत राजकीय हस्तक्षेपही अडचणीचा अन् वादाचा ठरत आहे.
महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावात तंटामुक्त समित्या स्थापण्यात येत आहेत.
गावातील तंटा गावातच सामंजस्याने मिटावा, या उद्देशाने १५ ऑगस्ट २००७ पासून राज्य सरकारने महात्मा गांधी तंटामुक्त अभियान सुरू केले. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख व गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पहिल्या वर्षापासून अभियानासाठी बक्षिसे दिली. त्याची व्याप्ती वाढवण्यासाठी गावागावांत तंटामुक्त समित्यांची स्थापना केली. १७ वर्षांत कोरोना कालावधी वगळता अन्य काळात तंटामुक्त अभियानाचे काम चांगले आहे. काही ठिकाणी तंटामुक्ती समिती वादातही अडकली आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळात सारे बंद होते. त्यामुळे तंटामुक्ती थंडच होती. मात्र, शासनाने तंटामुक्त गाव अभियानाला ताकद देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गावोगावी तंटामुक्त समित्यांची स्थापनेचे आदेश दिले आहेत.
शासनाच्या आदेशानुसार तालुक्यातील २३० गावांत या समित्या स्थापनेच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. मात्र, त्या समित्यांच्या निवडी वादात अडकत आहे. तालुका पोलिस ठाण्यांतर्गत १२९ गावांत समित्या स्थापनेसाठी सभा सुरू आहेत. तालुक्यात काही महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या आहेत. त्याचे राजकीय वारे अद्यापही गावागावांत आहे. त्याचा विपरीत परिणाम तंटामुक्त समित्यांच्या स्थापनेवर होताना दिसतो. तालुक्यात तीन ते चार ठिकाणी तंटामुक्त समिती स्थापण्यावरून वाद झाला. सभा उधळून लावण्याची भाषा वापरत अरेरावी करण्यात आली. त्याचवेळी पोलिसांनी केलेल्या हस्तक्षेपामुळे ते प्रसंग टळले. पोलिसांनाच तंटामुक्तीचा तंटा मिटवण्याची वेळ आली.
तंटामुक्ती गाव अभियानातील सहभागी गावांत नक्कीच तंटे निकालात काढले जातात. त्यात काम करणारे निःपक्षपाती राहून काम केले पाहिजे. यासाठीही आमचाही आग्रह आहे. तसे झाल्यास योजना अधिक बळकट होईल.
आनंदराव खोबरे, पोलिस निरीक्षक, कऱ्हाड तालुका
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.