सातारा : कोरोनाचा अहवाल येण्याच्या नावाखाली तीन दिवस मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात न देण्याचा किंवा स्वत:ही अंत्यसंस्कार न करण्याचा अक्षम्य प्रकार जिल्हा रुग्णालयात घडला आहे. आत्तापर्यंत बेवारस मृतदेह नातेवाईक शोधण्यासाठी तीन दिवस ठेवला जायचा परंतु, नातेवाईक असतानाही जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या कामातील सुसूत्रतेचा व माणुसकीचा अभावामुळे मृत्यूनंतरही एकाची परवड झालीआहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात चाललेय काय आणि या मुर्दाडपणाला रोखणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
यलमरवाडी (ता. खटाव) येथील एकजण लॉकडाउनपूर्वी 15 दिवस मुंबईहून गावी आला होता. लॉकडाउनच्या या संपूर्ण कालावधीत त्याला कोणताही त्रास झाला नाही. कोरोनाची कसलीही लक्षणे दिसली नाहीत. परंतु, शुक्रवारी अचानक त्याचे डोके दुखू लागले. गावातील लोकांनी त्याला एका खासगी रुग्णालयात नेले. मुंबई प्रवासाची "हिस्ट्री' सांगितली की त्याला दुसऱ्या रुग्णालयात जाण्यास सांगितले. तेथून बाहेर पडतानाच त्याचा मृत्यू झाला. हृदयविकाराच्या झटक्यासारखाच हा प्रकार होता, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तरीही त्याला वडूजमधील मोठ्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे तेथून त्यांना वडूज ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.
मृत्यू झाला असल्याने या ठिकाणीच स्वॅब घ्या, आम्ही अंत्यसंस्कार करतो, अशी विनंती तेथील डॉक्टरांना ग्रामस्थांनी केली. परंतु, त्यांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात न्यावा लागेल असे सांगितले. त्यामुळे नाईलाजाने त्यांना मृतदेह घेऊन जिल्हा रुग्णालयात यावे लागले. या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांच्या परवडीला सुरवात झाली. कोरोना संशयिताचा अहवाल आला नाही किंवा एखाद्याचा या कालावधीत मृत्यू झाला तर, त्याच्या घशातील स्त्रावाचे नमुने घेऊन अंत्यसंस्कार करण्याची पद्धत जिल्ह्यात सुरू आहे. अहवालाची वाट पाहात मृतदेहच तीन-तीन दिवस अंत्यसंस्कारशिवाय ठेवण्याचा प्रकार आजवर कधी घडला नव्हता. काळजी म्हणून प्रशासन संबंधितावर कोरोना निर्देशानुसार अंत्यसंस्कार करत होते. त्यामुळे स्वत: काही करता आले नाही तरी, किमान अंत्यसंस्कार झाले यातच नातेवाईक समाधानी असायचे. मात्र, यावेळी विपरितच घडले.
शुक्रवारी (ता. पाच) सायंकाळी मृतदेह घेऊन नातेवाईक साताऱ्यात आले. घशातील स्त्रावाचे नमुने घेण्यात आले. परंतु, अहवाल आल्याशिवाय मृतदेह देणार नाही, अशी भूमिका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घेतली. उद्या म्हणजे शनिवारी (ता. सहा) दुपारी दोनपर्यंत अहवाल येईल, असे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे शुक्रवारची रात्र दहा ते 12 ग्रामस्थांनी अक्षरशः जागून काढली. शनिवारी दुपारीही त्यांना मृतदेह देण्यात आला नाही. रात्री साडेआठ वाजता अहवाल येईल, असे त्यांना सांगण्यात आले. साडेआठलाही मृतदेह मिळाला नाही. त्यामुळे शनिवारची रात्रही त्यांना अखेर तळमळत काढावी लागली. या कालावधीत ते वैद्यकीय अधिकाऱ्यांना अंत्यसंस्कार तरी करा, अशी सारखी विनवणी करत होते. परंतु, त्यांची कोणी दखल घेतली नाही.
दोन दिवस खायला-प्यायला नाही, झोप नाही. अंगावरच्या कपड्यांनिशी राहावे लागल्यामुळे वैतागून मृतदेह जिल्हा रुग्णालयात तसाच ठेवून ग्रामस्थांनी गावाची वाट धरली. तोपर्यंत गावातही ग्रामस्थ, आप्तेष्ट ताटकळलेच होते. मृत व्यक्तीच्या घरच्यांची अवस्था तर फारच बिकट झाली होती. बायकोने तर अंगच टाकले. तिला वडूजमधील रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. नातेवाईक व ग्रामस्थ रविवारी दुपारी पुन्हा साताऱ्यात आले तरी, मृतदेहाचा पंचनामा झालेला नव्हता. राजकीय नेत्यांनी फोनाफोनी केल्यानंतर प्रांताधिकाऱ्यांनी सांगितल्यावर हालचाल सुरू झाली. परंतु, तोपर्यंत रुग्णालय प्रशासनाला याचे कसलेही सोयरसुतक नव्हते. तीन दिवस मृतदेह तसाच सडत ठेवण्याच्या प्रकाराचेही त्यांना काहीही वाटले नाही. अखेरीस तीन दिवसांनी मृतदेह नेऊन ग्रामस्थांना अंत्यसंस्कार करावे लागले.
कोरोना संसर्गाच्या कालावधीत जिल्हा रुग्णालयातील एक-एक अजब किस्से समोर येत आहेत. वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचेही योग्य नियोजन होत नाही. त्यांची ओरड सुरू आहे. कोरोनाबाधिताच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाईकांना योग्य ती मदत व साथ देण्याचे काम होत नाही. त्यामुळे प्रशासनातील नियोजन व माणुसकीशून्य भाव अनेकदा समोर आले आहेत. त्यानंतरही या रुग्णालयातील थक्क करणारे कारनामे थांबायचे नाव घेत नाहीत. जाणीव नसलेल्या या प्रशासनाच्या कारभाराचा आणखी एक नमुना आज (रविवारी) समोर आला आहे. रुग्णालयाच्या बेफिकीरी कारभारामुळे गेले तीन दिवस अत्यंसंस्काराविना मृतदेह जिल्हा रुग्णालयात पडून आहे. तर, नातेवाईक अन्नपाण्याविना दोन रात्र रुग्णालयाच्या बाहेर तडफडत आहेत. कोरोना रुग्ण व त्यांच्या सोयीसाठी प्रशासन काय-काय करत आहे, याचा डिंडोरा जिल्हा प्रशासन पिटत आहे. परंतु, जिल्हा रुग्णालयाच्या कारनाम्यांवर कोणतीच कारवाई किंवा उपाययोजना होताना दिसत नाहीत. त्यामुळे जिल्ह्याची काळजी घेणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्षात सर्वसामान्य माणसाला काय भोगावे लागतेय, याची दखल नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे "जिल्हाधिकारी साहेब काही तरी करा...' असे म्हणण्याची वेळ आली आहे.
जे चाललेय, ते न बघण्यासारखेरुग्णालयात सर्वांवर ताण आहे, हे आम्हाला माहीत आहे. परंतु, सध्या तिथे जे चाललेय ते न बघण्यासारखे आहे. रुग्णांना कोणत्याही सुविधा व्यवस्थित मिळत नाहीत. काय करायचे, कुठे जायचे, याची साधी माहितीही मिळत नाही. गेले दोन दिवस आम्ही आमचे आणि इतर रुग्णांचे हाल पाहात आहे. यावर तातडीने तोडगा निघाला पाहिजे, असे एका ग्रामस्थाने "सकाळ'शी बोलताना सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.