सातारा : स्वच्छतेबाबत पालिकेस पुरस्कार मिळाल्याने नगरविकास आघाडीला पोटशूळ झाला असून, त्यांनी हा पुरस्कार मॅनेज केल्याचा आरोप केला आहे. नविआने केलेला आरोप स्वच्छ सर्वेक्षणात योगदान देणाऱ्या सर्व सातारकर आणि पालिका कर्मचारी, अधिकाऱ्यांचा अपमान आहे. या अपमानाबद्दल नविआने सातारकरांची माफी मागावी आणि स्वच्छ सर्वेक्षणाचा अभ्यास करून अकलेचे तारे तोडण्याचा सल्ला उपाध्यक्ष मनोज शेंडे यांनी पत्रकाद्वारे नाव न घेता नगरसेवक अमोल मोहिते, अविनाश कदम यांना दिला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आज नविआचे नगरसेवक अमोल मोहिते, अविनाश कदम यांनी सातारा पालिकेस स्वच्छ सर्वेक्षणात मिळालेल्या देशव्यापी पंधरा क्रमांकाच्या पुरस्काराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत साविआवर आरोप केले होते. या आरोपांना शेंडे यांनी पत्रकाद्वारे प्रत्युत्तर दिले आहे. शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये सातारा पालिकेस राज्यात चौथा, तर देशात पंधरावा क्रमांक मिळाला आहे. हा सन्मान सर्व सातारकरांनी दिलेल्या योगदानाचा आहे.
सर्वांनी दिलेल्या योगदानामुळेच हा पुरस्कार मिळाला असून, तो पुरस्कार नगरविकास आघाडीच्या डोळ्यात खुपत आहे. पुरस्कार मॅनेज केल्याचा आरोप करणाऱ्यांनी सर्व सातारकरांचा अपमान केला आहे. पालिकेच्या सभा शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून बोलाविण्यात आल्या असून, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले हे सक्रिय असतात.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.