सातारा : सातारा हे महाराष्ट्र राज्यातील एक महत्वाचे शहर. हे शहर 16 व्या शतकात स्थापित झाले. साताऱ्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभला असून शूरवीरांची राजधानी म्हणूनही शहराला ओळखले जाते. याच शहरात अनेक वीर महारथी होऊन गेली, त्यांच्याच पराक्रमाचा जाज्वल्य इतिहास आजही सातारकर अभिमानाने सांगतात. इतिहासातील अनेक ठेवा या शहरवासियांनी मोठ्या धैर्याने जपून ठेवला असून त्याचे जतन सुरु आहे.
बारामोटेची विहीर त्याच इतिहासाचा एक भाग. बारा मोटा असलेली विहीर ही एक वास्तुकलेचा अप्रतिम नमुना असलेली ऐतिहासिक वास्तू सातारा जिल्ह्यात आहे. ह्या विहिरीतून पाणी उपसण्यासाठी एकावेळी 12 मोटा लावल्या जात. सातारा शहरापासून पुण्याकडे येण्याच्या रस्त्यावर साधारण 12 कि.मी वर लिंब फाटा लागतो आणि तेथून उजवीकडे आत गेल्यावर 3 कि.मी. वर लिंब गाव आहे. ह्या गावाच्या दक्षिणेला 2 कि.मी. अंतरावरील शेरीची वाडी या ठिकाणी कृष्णा नदीच्या तीरावर ही बारामोटेची विहीर आहे. पुण्याहून साताऱ्याला येताना आधी लिंब गावाचा फाटा लागतो, तर साताऱ्याकडून जाताना आधी नागेवाडी गावाचा फाटा लागतो. त्यामुळे लिंब आणि नागेवाडी अशा दोन्ही मार्गाने या विहिरीपर्यंत जाता येते.
या विहीरीचं सर्व बांधकाम हेमाडपंती आहे आणि याची खूण म्हणजे विहीर बांधताना दगड एकमेकांना जोडण्यासाठी चुना सिमेंट अशा कोणत्याही गोष्टीचा वापर केला नाही. संपूर्ण दगडातून अतिशय कोरीव शिल्प उभं केलं आहे. लिंब गावात कृष्णा नदीचा बांधीव घाट आपटे, ठाकूर या सरदारांचे वाडे अजूनही वासे टिकवून आहेत. गावाला नदीकाठ असल्यामुळे गौतम, अगस्त्य, परशुराम ऋषी यांच्या वास्तव्याचे दाखले मिळतात. रामेश्वर, कोटेश्वर, भार्गवरामाचं अतिप्राचीन मंदिर त्याची स्थापत्य शैली पाहण्यासारखी आहे. अशा ह्या सुंदर बारामोटेच्या विहिरीचा इतिहास पाहता, सुमारे शके 1719 ते 1724 ह्या दरम्यान श्रीमंत वीरूबाई भोसले यांनी ह्या विहिरीचे बांधकाम केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू, म्हणजेच संभाजी महाराजांचे पुत्र, शाहू महाराज ह्यांच्या कारकिर्दीमध्ये हे बांधकाम करण्यात आले. लिंब गावाच्या आसपास सुमारे 300 झाडांची आमराई होती. ह्या आमराईसाठी आणि परिसरातील रहिवाशांच्या सोयीसाठी ह्या विहिरीची रचना केली गेली असावी, असा अंदाज आहे.
या ऐतिहासिक विहिरीचा व्यास 50 फूट आणि खोली 110 फूट असून आकार अष्टकोनी आणि शिवलिंगाकृती आहे. येथे मोडी लिपीतील एक शिलालेखही आहे. जमिनीखालील महालात ही विहीर असून महालाच्या मुख्य दरवाजावर कलाकुसर केलेली आहे. आतील बाजूस शरभाची दगडी मूर्ती आहे. महालात विविध चित्रे कोरली आहेत. गणपती, हनुमान, कमलपुष्पे अशी अनेक शुभशिल्पे तर दिसतातच, मात्र त्यांसोबत विशेष म्हणजे हत्तीवर आणि घोड्यावर विराजमान झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प देखील ह्या खांबावर कोरलेले दिसते. विहिरीला प्रशस्त असा जिना आणि चोरवाटा आहेत. विहिरीवर 15 थारोळी आहेत. ह्या चोरावाटांतून वर आले की 12 मोटांची जागा, दरबाराची आणि सिंहासनाची जागा बघायला मिळते. ही विहीर सुंदर स्थापत्यशास्त्रचे उत्तम उदाहरण आहे. या विहीरीमुळे येथील परिसराला एकप्रकारचा लौकिक प्राप्त झाला आहे. सातारा जिल्ह्यात असा बराच ऐतिहासिक ठेवा जतन केला असून त्याचे संवर्धण मोठ्या प्रमाणात सुरु आहे.
या ऐतिहासिक विहिरीला आपण कसे जाल?
सातारा शहरापासून पुण्याकडे येण्याच्या रस्त्यावर साधारण 12 कि.मी वर लिंब फाटा लागतो आणि तेथून उजवीकडे आत गेल्यावर 3 कि.मी. वर लिंब गाव आहे. सातारा शहरातल्या लिंब गावात स्थानिक बसनं आल्यानंतर रिक्षा, जीप अशा कोणत्याही वाहनानं विहीरीवर पोहोचता येते. लिंब आणि नागेवाडी अशा दोन्ही मार्गाने या विहिरीपर्यंत जाता येते. 2011-2012 पासून पर्यटनस्थळांमध्ये विहीरीची नोंद झाली आणि या ठिकाणी स्थानिक छोट्या उद्योगांचा विकास होऊ लागला आहे. या ठिकाणी उसाची गुऱ्हाळं, लिंबू सरबताचे ठेले, वडापावच्या गाड्या, जेवणाची सोय, पार्किंगची व्यवस्था उपलब्ध असून या विहिला आपण नक्की भेट दिलीच पाहिजे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.