मायणी (जि. सातारा) : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या माध्यमातून वितरित करण्यात येणाऱ्या धान्यावर डल्ला मारून येथील स्वस्त धान्य दुकानदार काळाबाजार करत असून, त्याची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शिधापत्रिकाधारकांतून होत आहे. याबाबतचे निवेदन जनता क्रांती दलाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास सकट यांनी खटावच्या तहसीलदारांना दिले आहे.
येथे ग्राहक संघामार्फत रास्त भाव धान्य दुकान चालवण्यात येते. दुकानाचे चालक मनमानी करून शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वाटप करत नाहीत. ग्राहकांची फसवणूक करतात. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या माध्यमातून प्रतिव्यक्ती पाच किलो धान्य (गहू व तांदूळ) वितरित करण्याचे शासनाचे आदेश आहेत. मात्र, दुकानचालक प्रत्येक व्यक्तीऐवजी प्रत्येक शिधापत्रिकेला केवळ पाच किलो धान्याचे वितरण करत आहे. त्याबाबत विचारणा केल्यास थातुरमातुर व उडवाउडवीची उत्तरे देत आहे.
गेल्या एप्रिल महिन्यापासून लोकांची फसवणूक सुरू आहे. त्यासंदर्भात लोकांनी मिळणाऱ्या धान्याची ऑनलाइन माहिती घेतली. खात्री करण्यासाठी तक्रारदारांच्या खात्याची ऑनलाइन प्रिंट काढली असता, देय व प्रत्यक्ष वितरित केलेले धान्य यामध्ये तफावत आढळून येत आहे. एप्रिल महिन्यापासून संबंधित दुकानदाराने गोरगरिबांच्या धान्याचा हजारो रुपयांचा काळाबाजार केला आहे. त्यासंबंधी अनेकदा पुरवठा शाखेकडे दूरध्वीद्वारे तक्रार करून पाठपुरावा केला. मात्र, संबंधित अधिकारी दखल घेत नसल्याची तक्रार केली जात आहे. दरम्यान, गोरगरिबांच्या तोंडचा घास हिसकावून घेत काळाबाजार करणाऱ्या दुकानदारावर प्रशासनाने कारवाई न केल्यास संविधानिक मार्गाने आंदोलन करू, असा इशारा विकास सकट यांनी दिला आहे.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.