Central Government New System
Central Government New System esakal
विज्ञान-तंत्र

Central Government New System : चोरी झाल्यानंतर लगेच मिळणार मोबाईल, केंद्र सरकार आणतंय नवीन सिस्टीम; जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

सध्याच्या काळात अन्न, वस्त्र आणि निवाऱ्यानंतर मोबाईल ही मानवाची महत्त्वाची गरज झाली आहे. आपल्या फोनशिवाय आपण घरातून बाहेर पडण्याचा विचारही करू शकत नाही. इतरांशी संवाद साधण्याव्यतिरिक्त आपली बँकेची कामे, प्रवासाची तिकिटे, हॉटेल बुकींग, यूपीआय व्यवहार अशी कित्येक कामे आपण स्मार्टफोनच्या मदतीने करतो.

त्यामुळे स्मार्टफोन हा आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झाला आहे. मात्र, हाच स्मार्टफोन जर हरवला किंवा चोरी झाला तर? आपल्या बँकेपासून आपली सगळी माहिती चोरांच्या हातात आयतीच मिळू शकते. त्यामुळेच, चोरीचे मोबाईल लवकरात लवकर शोधण्यासाठी केंद्र सरकारने नवीन सिस्टीम तयार केली आहे.

सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर (CEIR) असं या सिस्टीमचं नाव आहे. हरवलेले किंवा चोरी झालेले मोबाईल फोन शोधण्यासाठी तयार करण्यात आलेलं हे एक रीजनल पोर्टल आहे. केंद्राच्या टेलिमॅटिक्स विभागाने ही सिस्टीम तयार केली आहे.

महाराष्ट्रासह दिल्ली आणि कर्नाटकात याची चाचणी घेण्यात आली होती. ठाणे पोलिसांनी जानेवारी ते एप्रिल या काळात या सिस्टीमच्या मदतीने तब्बल ७११ मोबाईल शोधले. या मोबाईल्सची एकूण किंमत १.२८ कोटी रुपये होती. यानंतर आता १७ मे रोजी ही सिस्टीम देशभरात लाँच करण्यात येईल.

असं काम करेल CEIR

CEIR मुळे नेटवर्क ऑपरेटरला हरवलेला किंवा चोरी झालेला मोबाईल फोन ब्लॉक करण्याची सुविधा मिळेल. तुमचा मोबाईल चोरी झाल्यानंतर, किंवा हरवल्यानंतर तुम्हाला ऑपरेटरला सांगून तो ब्लॉक करायचा आहे. असा ब्लॉक केलेला मोबाईल वापरण्याचा कोणी प्रयत्न केल्यास त्याची माहिती सरकारला मिळेल. अशा प्रकारे तुमच्या मोबाईलचा शोध लागेल. मोबाईल मिळाल्यानंतर पुन्हा पोर्टलवर जाऊन तुम्ही तो अनब्लॉक करू शकता, जेणेकरून तुम्हाला तो वापरता येईल.

IMEI बदलता येणार नाही

मोबाईल गहाळ झाल्याची माहिती देताना वापरकर्त्याला फोनचा आयएमईआय नंबर सांगणे गरजेचे आहे. टेलिकॉम कंपन्यांकडे आयएमईआय नंबरची एक यादी आधीपासून असेल. IMEI ब्लॉक केल्याची विनंती केल्यानंतर २४ तासांमध्ये तो फोन ब्लॉक केला जातो. मोबाईल ब्लॉक झाल्यानंतर संपूर्ण देशभरात कुठेच त्याचा वापर करता येत नाही. जर मोबाईल चोरणाऱ्या व्यक्तीने फोनचा आयएमईआय नंबर बदलण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्याबद्दल लगेच सरकारला माहिती मिळेल.

फोन हरवल्यावर काय कराल?

फोन हरवल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल करावी लागेल. या तक्रारीची एक सॉफ्ट कॉपी तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. त्यानंतर हरवलेल्या मोबाईलमध्ये जे सिम कार्ड होते, त्याच नंबरचे डुप्लिकेट सिम तुम्हाला तुमच्या ऑपरेटरकडून घ्यावे लागेल. सोबतच जर मोबाईल खरेदीच्या पावतीची सॉफ्ट कॉपी किंवा फोटो तुमच्याकडे असणे गरजेचे आहे.

CEIR कसे वापराल?

IMEI नंबर ब्लॉक करण्यासाठी CEIR वेबसाईटवर जाऊन तुम्हाला एक रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा लागेल. यावेळी तुम्हाला त्यातील सिम कार्डचा नंबर, आयएमईआय नंबर, मोबाईलचा ब्रँड, मॉडेल, खरेदीची पावती, मोबाईल कुठून हरवला, पोलीस तक्रारीची प्रत, मोबाईल कुणाच्या नावावर आहे त्या व्यक्तीचे ओळखपत्र अशा गोष्टी भराव्या लागतील.

यानंतर येणारा ओटीपी सबमिट करून तुम्ही फॉर्म भरू शकाल. फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला एक 'रिक्वेस्ट आयडी' मिळेल. हा आयडी सांभाळून ठेवणे गरजेचे आहे. तुमच्या रिक्वेस्टचे स्टेटस पाहण्यासाठी आणि फोन मिळाल्यानंतर तुमचा आयएमईआय नंबर अनब्लॉक करण्यासाठी हा आयडी तुम्हाला वापरावा लागणार आहे.

या व्यतिरिक्त तुम्ही पोलिसांना देखील मोबाईल ब्लॉक करण्याची विनंती करू शकता. पोलिसांनी जर आधीच हा नंबर ब्लॉक करण्याची रिक्वेस्ट सबमिट केली असेल, तर तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला 'रिक्वेस्ट ऑलरेडी एक्झिस्ट' अशा आशयाचा मेसेज मिळेल.

मोबाईल मिळाल्यानंतर काय कराल?

तुमचा मोबाईल मिळाल्यानंतर तो वापरण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला आयएमईआय अनब्लॉक करावा लागेल. यासाठी CEIRच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अनब्लॉक रिक्वेस्ट टाकावी लागेल. त्यासाठीचा फॉर्म भरल्यानंतर काही वेळामध्ये तुमचा आयएमईआय अनब्लॉक होईल.

जर तुमचा फोन पोलिसांनी ब्लॉक केला असेल, तर अनब्लॉक करण्यासाठी देखील तुम्हाला पोलिसांशी संपर्क साधावा लागेल. तुमचा फोन मिळाल्याशिवाय कृपया अनब्लॉक रिक्वेस्ट करू नका, अन्यथा तुमच्या फोनचा गैरवापर केला जाऊ शकतो. या सिस्टीममुळे हरवलेल्या किंवा चोरीच्या मोबाईलचा गैरवापर कमी होऊन, ते मोबाईल शोधण्याची प्रक्रियाही वेगवान होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीव दे म्हटलं म्हणून एखाद्याने खरंच जीवन संपवलं तर काय? हायकोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Instagram Algorithm : इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल; ओरिजिनल कंटेंट होणार प्रमोट.. मात्र यूजर्सचं टेन्शन वाढणार!

Namrata Sambherao: "महाराष्ट्राची लाडकी नमा..."; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरनं नम्रता संभेरावला लिहिलं खास पत्र

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : कुर्ल्यातील भाभा हॉस्पिटलमध्ये कामबंद आंदोलन

SCROLL FOR NEXT