आजकाल मोबाईल, संगणक, आणि एखाद्या परीक्षेची नावनोंदणी या सर्वातील महत्त्वाची कामे करण्यासाठी पासवर्ड विचारलाच जातो. कारण काही गोष्टी गुपित ठेवण्यासाठी महत्त्वाच्या असतात. त्यामुळे अनेकजण पासवर्ड ठेवतातच. सध्या सायकलपासून ते कारपर्यंत आणि दारापासून ते दोरीपर्यंत सगळ्या गोष्टी कुलूपबंद असणं आवश्यक झालंय. कुलुपांची गरज वाढत चाललीय हे खरं. सगळीच कुलुपं डोळ्यांनी दिसतात असे नाही. काही अदृश्य कुलुपं पण आहेत. हजार अवगुणांना लावता येणारं कुलूप आणि असंख्य सद्गुणांची दार उघडणारी किल्ली आपल्यापासून दूर नाही. जगभर कुलूप आणि किल्ली या जोडीचा इतिहास, संचार आणि प्रसार खूप रंजक आहे. पूर्वीचे राजवाडे, महाल, जुने वाडे यांची दरवाजे ही खूप मोठी असायची. त्याला मोठीचं कुलूप लावावी लागत असतं. परंतु आता मोठ्या कुलूपांची जागा लहान कुलूपांनी घेतली आहे. जेव्हांपासून कुलूप आणि किल्लीची संकल्पना अस्तित्वात आली तेव्हांपासून अगदी आजतागायत त्याची गरज जरादेखील कमी झालेली नाही. उलट त्याचा आवाका दिवसेंदिवस वाढतच गेलेला आहे. फक्त त्याचे क्षेत्र बदलले आहे. स्वरूप बदलले आहे.
भारतातील कुलुपांचा इतिहास...
भारतात कुलुपांचा इतिहास गोदरेज या नावांशिवाय अपूर्णच आहे. गोदरेज कंपनीने मात्र या कुलूपविश्वाची किल्ली अजूनही आपल्याच खिशात ठेवली आहे. खूप जाडजूड लोखंडी कुलूपांपासून ते सुप्रसिद्ध अत्यंत सुरक्षित तिजोऱ्या, काही क्रमांकांवर आधारित कुलुपे, कार्ड स्वाईप करून उघडायची कुलुपे, ज्याची दुसरी किल्ली बनविताच येणार नाही अशी कुलुपे, असा प्रवास करीत करीत आता केवळ बोटांचे ठसे जुळल्यावर उघडणारी स्मार्ट लॉक्स आली आहेत. आधी माणूस निरक्षर होता. सहीऐवजी अंगठा वापरत होता. नंतर तो लेखन शिकला. आता बोटांच्या ठशांवर आधारित कुलुपे म्हणजे माणसाचा उलटा प्रवास सुरु झाला आहे असे दिसून येत आहे.
पूर्वी कुलूप म्हणून याचा वापर केला जायचा...
अगदी पूर्वीच्या काळातील घरांना एखादी साधी लोखंडी कडी किंवा लाकडी पट्टीसुद्धा चालत होती. पूर्वी मोठमोठ्या घरांना, वाड्यांना, गडकिल्ल्यांना आतून मोठमोठे अडसर घातले जात असत. पूर्वीच्या मोठमोठ्या महालातील दरवाजे बंद केल्यावर त्यात एक मोठे लाकूड आडवे घातले जात असे. एरवी ते पूर्णपणे भिंतीतच आत सरकवून ठेवले जाई. या अडसरामुळे जर दरवाजा बाहेरून कुणी धक्के मारून उघडायचा प्रयत्न केला तर तो यशस्वी होत नसे.
लॉकर्सचा बदलता ट्रेंड...
सध्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे मोबाईलपासून ते कॉम्पुटरपर्यंत सर्वांना पासवर्ड आले आहेत. म्हणजेच आभासी कुलूप आणि आभासी किल्लीच नाही का? मनुष्यांचा स्वभाव लक्षात घेता कुलूप किल्लीची गरज जगाच्या कानकोप-यांपर्यंतच कायम राहणारच आहे. अवाढव्य विस्ताराची सूत्रे छोट्याशा चावीच्या रूपाने आपल्या खिशात हवीत. हा विचार, कुलूप आणि किल्ली यांच्यात सतत होत गेलेल्या प्रगतीला कारणीभूत असावा. अनेक कुलुपांचा आकार हा काहीसा हृदयाच्या आकारासारखा असल्याने कुलूप आणि किल्ली या जोडीला जगभरातून वेगळेच स्थान प्राप्त झाले आहे. म्हणून आजही कुलूला खूप महत्त्वाचे स्थान आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.