जळगाव : भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर आज उपोषण केले. आता भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजनही आंदोलनाच्या मोडमध्ये असून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा ईशारा त्यांनी जळगावात दिला आहे.
जळगावात पत्रकारांशी बोलतांना गिरीश महाजन म्हणाले कि, आम्ही सत्तेवर आलो कि शेतकऱ्यांना चिंतामुक्त करू असे या सरकारने जाहिर केले होते. मात्र आज शेतकरी "चिंताग्रस्त'झाला आहे. शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे पैसेही शेतकऱ्यांना या सरकारने दिलेले नाहीत. शेतकऱ्यांच्या बांधावर जावून आम्ही 25हजार रूपये हेक्टरी भरपाई देवू असे जाहिर केले होते. मात्र आजपर्यंत एक दमडीही शेतकऱ्यांच्या हातात पडलेली नाही. शेतकरी कर्जमाफी ताबडतोब करू असे सांगितले, परंतु अद्यापही ही कर्जमाफी झालेली नाही, तांत्रिक मुद्यातच ती अडकलेली आहे.
वीजेचा प्रश्न गंभीर
आमचे शासन असतांना राज्यात वीज पुरवठा सुरळीत होत होता. मात्र हे सरकार आल्यापासून राज्यात विजेचा प्रश्न गंभीर झालेला आहे.तब्बल चार-चार तास लोडशेडींग होत आहे. शेतकऱ्यांना ट्रान्सफार्मर मिळत नाही.ट्रान्सफार्मर मिळाले तर त्यासाठी तेल मिळत नाही.त्यामुळे अनेक समस्या आहेत. शेतकऱ्यांना पुरेशी वीज मिळत नसल्यामुळे शेतीपिकांना पाणी मिळत नाही. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
राज्यभर तीव्र आंदोलन
राज्यातील हे शासन अतिशय निष्क्रीय आहे, मराठवाड्यातील प्रश्नासाठी पंकजाताईना उपोषण करावे लागले आहे. आता शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी भारतीय जनता पार्टी राज्यभर तीव्र आंदोलन करणार आहे. शासनाने आठवड्याभरात जर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविले नाहीत. तर राज्यातील प्रत्येक जिल्हयात व तालुक्यात भाजपचे कार्यकर्ते आंदोलन करतील असा ईशाही गिरीश महाजन यांनी दिला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.