Nashik Rain Crisis : तालुक्यात यंदा सरासरीच्या निम्माही पाऊस न झाल्यामुळे खरीप हंगाम वाया गेला आहे. दर वर्षी जुलैअखेर खरिपाच्या पेरण्या होणे अपेक्षित असते. मात्र, पावसाने हुलकावणी दिल्याने अवघ्या ५० टक्के पेरण्या झाल्या आहेत.
पावसाअभावी मका, सोयाबीनसह चाऱ्यासाठी पेरणी केलेले ज्वारीचे पीक अक्षरश: करपले आहे. (Barely sprouted withered due to lack of rain Kharif season wasted in Sinnar taluka nashik)
सिन्नर तालुक्यात जूनमध्ये सरासरीच्या ४७ टक्के, जुलैत ६१, तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अवघा दहा टक्के पाऊस झाला. कोरडवाहू क्षेत्र सर्वाधिक असलेल्या पूर्व भागातील पावसाचे प्रमाण नगण्य राहिल्यामुळे चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
यंदाच्या हंगामात सुरवातीपासूनच पावसाने दडी मारली. अधिक पावसाचे मानले जाणारे सिन्नर, पांढुर्ली, डुबेरे, सोनांबे, नायगाव या कृषी मंडलांमध्ये जेमतेम पाऊस झाला. देवपूर, वावी, शहा, नांदूर, वडांगळी, पांगरी, गोंदे या मंडलांमध्ये पाऊसच नसल्यामुळे संपूर्ण तालुक्याची चिंता वाढली आहे.
तालुक्यातून वाहणारी सर्वांत मोठी देव नदी अद्याप प्रवाहित झालेली नाही. भोजापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अपेक्षित पाऊस न पडल्याने धरण निम्म्यापेक्षा रिकामे आहे. १५ ऑगस्टपर्यंत तालुक्यातील सर्वच लहान-मोठी धरणे, बंधारे, साठवण तलावांमध्ये आश्वासक साठा असतो. सर्वत्र नदी-नाल्यांना पाणी वाहत असते.
यंदा परिस्थिती विषम असून, खरीप हंगाम संपूर्णतः वाया गेला आहे. सिंचन सुविधा असलेल्या भागात खरीप पिकांचे अपेक्षित उत्पन्न निघणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. कारण वातावरण बदलाचा परिणाम पिकांवर झाल्याचे पाहायला मिळते.
पूर्व भागात सुरवातीपासूनच परिस्थिती प्रतिकूल आहे. यापूर्वीही दुष्काळाचे सर्वाधिक चटके पूर्व भागाला बसले आहेत. चारा आणि पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवायला सुरवात झाली आहे.
दुग्धव्यवसाय असलेल्या शेतकऱ्यांसमोर जनावरे सांभाळायची कशी, असा प्रश्न उभा ठाकला आहे. शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज बघून जनावरे बाजारात न्यायला सुरवात केली. घरासमोर बांधलेल्या जनावरांची उपासमार होण्यापेक्षा ती विकलेली बरी, अशी मानसिकता शेतकऱ्यांची झाली आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
कृषी विभागाकडून प्राप्त आकडेवारीनुसार सिन्नर तालुक्यात यंदा खरिपाच्या अवघ्या ५१.१२ टक्के पेरण्या झाल्या आहेत. त्यात भातलागवड ३५ टक्के, बाजरी ६.६७ टक्के, मका ६३.१५ टक्के, सोयाबीन ९९.२५ टक्के, कापूस ४.५० टक्के, तूर ९.४३ टक्के, मूग २३ टक्के, उडीद १३ टक्के याप्रमाणे पेरणी झाली.
जूनमध्ये झालेल्या पावसावर पेरण्या झाल्या. त्यानंतर पावसाने दडी मारल्याने पिकांना ताण पडला आहे. सर्वच ठिकाणी पिके करपली आहेत. या पिकांचा चाऱ्यासाठीही उपयोग होणार नाही, अशी परिस्थिती आहे.
"विशेषकरून पूर्व भागात खरिपाच्या पेरण्या झाल्याच नाहीत. ज्या ठिकाणी पेरण्या झाल्या, तेथे पिकांची अवस्था दयनीय आहे. जनावरे या पिकांना तोंड लावणार नाहीत. सरकारने सिन्नर तालुक्यात कोरडा दुष्काळ घोषित करावा. पीकविमा नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्यावी. कारण आता पाऊस पडला, तरी पेरण्या होणे शक्य नाही."
-बाबासाहेब कांदळकर, सामाजिक कार्यकर्ता
"पाऊस नसल्याने चारापाण्याचा प्रश्न अवघड बनला आहे. पशुधनाचे हाल होत आहेत. चारा विकत घेणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. ज्या भागात चारा मिळतो, तिथल्या शेतकऱ्यांना उद्याची चिंता आहे. परिणामी, अधिक किंमत मोजूनही पुरेसा चारा मिळत नाही. पूर्व भागातील गावांमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या ग्रामसभेत चारा डेपो, चारा छावण्या सुरू करण्याचे ठराव करून ते तहसीलदारांना सादर करण्यात येतील."-रामनाथ कर्पे, संचालक, खरेदी-विक्री संघ, सिन्नर
"तालुक्यातील पर्जन्यमान, खरीप हंगामातील पेरणी अहवालासोबतच पंचायत समिती स्तरावरून टंचाई आराखडा शासनास सादर केला आहे. ज्या गावांमध्ये पाणीप्रश्न भेडसावेल, तिथे टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाईल. पशुधनास पाणी आणि चाऱ्याबाबत अद्याप कोणतीही मागणी आलेली नाही. मागणी येईल, त्यानुसार शासनाकडे पाठपुरावा करून आवश्यक ती मदत करण्यात येईल. भविष्यात शासनाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे सोयी-सुविधा पुरविण्याचे नियोजन केले जाईल." -सुरेंद्र देशमुख, तहसीलदार, सिन्नर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.