constitution of india
constitution of india esakal
नाशिक

संविधानाचे संवर्धनच नव्हे, तर साक्षरताही गरजेची

ब्रिजकुमार परिहार

नाशिक : संविधानाने देशातील नागरिकांना त्यांचे मूलभूत हक्क दिले. त्यांना जगण्याचा अर्थ समजावून सांगितला. स्वातंत्र्य- समता अन् बंधुतेचे मूल्य सांगितले. मात्र या देशात अजूनही संविधान साक्षरता रुजली नाही. परिणामी, मनुवादी शक्ती पुन्हा एकदा माणसाला गुलाम बनविण्याचे कारस्थान रचत आहे; नव्हे तशी सुरवात झाली आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. संविधानाचा अभिमान बाळगण्यापेक्षा संवर्धन कसे करता येईल आणि समाजाला संविधान साक्षर कसे करता येईल, यावर लक्ष दिले पाहिजे. असा सूर मान्यवरांच्या चर्चेतून व्यक्त झाला.

येथील कविवर्य टिळक वाचनालयातर्फे हॉली क्रॉस चर्च, त्र्यंबक नाका येथे संविधानप्रेमी नागरिकांच्या वतीने एक दिवसीय संविधान सन्मान संमेलन शनिवारी (ता. २५) झाले. पहिल्या सत्रात ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, डॉ. हरी नरके, ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे, उद्योजक लोकेश शेवडे, फादर विजय गोन्सालविस व्यासपीठावर होते.

फ्रान्सिस वाघमारे यांनी स्वागत केले. स्वप्ना थोरात यांनी संविधान सरनाम्याचे सामुहिक वाचन घेतले. फादर विजय गोन्सालविस यांनी प्रास्ताविक केले. डॉ. कसबे यांच्या हस्ते उद्‌घाटन व त्यांचे बीजभाषण झाले. त्यात त्यांनी मानवाच्या उत्क्रांतीपासूनचा जवळपास ६० ते ७० हजार वर्षांचा पट उलगडत दाखवून संविधान निर्मितीची प्रक्रिया समजावून सांगितली.

आबासाहेब थोरात यांनी आभार मानले. दुपारच्या सत्रात डॉ. नरके यांनी ‘भारतीय राज्यघटना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर बोलताना संविधान निर्मिती प्रक्रियेतील डॉ. बाबासाहेबांच्या योगदानाबाबत ऊहापोह केला. त्यानंतर श्री. कांबळे यांनी ‘आम्ही भारतीय लोक’ या विषयावर सविस्तर प्रकाशझोत टाकताना, संविधान साक्षरतेची गरज प्रतिपादित केली. प्रा. डॉ. नागार्जुन वाडेकर यांनी आभार मानले. श्री. शेवडे, फादर गोन्साल्व्हीस यांनीही मार्गदर्शन केले.

"भारतात आज जे काही अराजक पद्धतीने राजकारण सुरू आहे, त्याचे मुळ इतिहासात आहे. ते समजून घेतले पाहिजे. म. गांधी, पं. नेहरू, डॉ. आंबेडकर यांचा उदय होण्यापूर्वी या देशावर आक्रमकांची सत्ता राहिली. विशेष म्हणजे ही सत्ता ब्राह्मण आणि क्षत्रियांनीच सांभाळली. भारताला स्वतःचे संविधान मिळाले अन् क्रांती घडली. आता २०१४पासून प्रतिक्रांतीला सुरवात झाली आणि हा देश पुन्हा एकदा अराजकतेकडे निघाला आहे."

-डॉ. रावसाहेब कसबे, ज्येष्ठ विचारवंत

"डॉ. आंबेडकर यांनी राज्यघटनेचा मसुदा तयार केला, तो काही रात्रीतून तयार झाला किंवा त्यांच्या मनात आले अन् त्यांनी लिहून काढले, असे झालेले नाही. त्यासाठी त्यांना वर्षानुवर्षे कष्ट करावे लागले. अनंत अडचणींचा सामना करावा लागला. अक्षरश: एकेक शब्द मंजूर करून घेण्यासाठी तासन्तास चर्चा करावी लागली. भूमिका मांडावी लागली. सद्यःस्थितीत मात्र पुन्हा एकदा हिंदू राष्ट्र निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली आहे. आता राज्यघटना वाचविण्यासाठी माणसं तयार करण्याची वेळ आली आहे. संविधान साक्षरता रुजविण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे."

-डॉ. हरी नरके, ज्येष्ठ विचारवंत

"धर्मसत्ता, धनसत्ता आणि राजसत्ता जेव्हा हातात हात घालून चालायला लागते, तेव्हा ती गुलामगिरीची सुरवात असते. याच धर्तीवर भारतात इतिहासाचे पुनर्लेखन सुरू आहे. प्रत्यक्षात मात्र ‘आम्ही भारतीय लोक’ या तीन शब्दांतच राज्यघटनेचे सार आहे. मात्र, सद्यःस्थितीत राज्यघटनेचीही विभागणीही झाल्याचे दिसून येते. ही विभागणी विरोधक आणि राज्यघटनेचे भक्त (अभ्यासक नव्हे) अशी आहे. पेशव्यांचा इतिहास हा गौरव म्हणून पुढे येतोय. कारण, आपलं वाचन थांबलं आहे. डॉ. आंबेडकर हे केवळ घटनेचे शिल्पकार नसून, ते नवराष्ट्राचे निर्माते आहेत."

-उत्तम कांबळे, ज्येष्ठ साहित्यिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

हसताय ना, हसलंच पाहिजे!

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT