esakal
esakal
नाशिक

Nashik News : वनविभागातर्फे अमृत वनउद्याने! दुर्मिळ-औषधी वनस्पतींची लागवड...

संतोष विंचू

Nashik News : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वनविभागाने विविध धार्मिक स्थळे, आदर्श गावे तसेच विविध शहरांमध्ये पंचायतन वन उद्यान, बेलउद्यान तसेच अमृत वनउद्यानाची निर्मिती करण्याचा ध्यास घेतला आहे. (Cultivation of rare medicinal plants by Forest Department nashik news)

यासाठीचे निकष ठरवून हे उद्याने विकसित करण्यात येतील. यासाठी महसूल व वन विभाग आवश्यक निधी देखील उपलब्ध करणार आहे.

सर्व प्रकारच्या उद्यानांमुळे प्राणवायूची निर्मिती, प्रदूषणाचा ऱ्हास, शीतलतेचे वातावरण होणार आहेच, पण नागरिकांचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्यही सुधारण्यास मदत होणार आहे. विविध वृक्षांच्या लागवडीसह संवर्धनाला देखील प्रोत्साहन मिळणार असल्याने या वनउद्यान योजनेचे स्वागत होत आहे. प्रभावीपणे ही योजना राबवावी अशी अपेक्षाही निसर्गप्रेमी पण होत आहे.

धार्मिक स्थळी बेल उद्यान!

प्रत्येक जिल्ह्यात अनुकूल असणाऱ्या तीर्थस्थळी बेल वनउद्यान साकारले जाणार आहे. राज्यात अशी ७५ धार्मिक स्थळे निवडली जाणार असून तेथे वनविभागाकडून बेल, सीता अशोक, रुद्राक्ष, बोर, पळस, पारिजात, पांढरा चाफा, पांढरी कन्हेर, पांढरा धोत्रा, स्वस्तिक या वृक्ष प्रजातीची लागवड करून बेल वनउद्यान निर्माण केले जाणार आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

यासाठी वन किंवा शासकीय जमीन संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था तसेच महामंडळाच्या उपलब्ध असलेल्या एक ते अडीच एकर क्षेत्रात हे बेल उद्यान साकारले जाईल. पुढील सात वर्षे या उद्यानाचे संरक्षण आणि देखभाल वनविभाग करणार असून त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था, सेवाभावी संस्थाकडे ते हस्तांतरित केले जाणार आहे. या ठिकाणी भेट देणाऱ्या नागरिकांसाठी नैसर्गिक उंचवटे, वृक्षांचे ओंडके, प्रदक्षिणा पद फिरण्यासाठी पायवाटा देखील केल्या जाणार आहे.

७५ शहरात अमृत वनउद्यान!

अमृत महोत्सवी कार्यक्रमांतर्गत अमृततुल्य मानल्या जाणाऱ्या औषधी वनस्पती, दुर्मिळ वनस्पती व इतर महत्त्वपूर्ण वृक्षांची लागवड करून राज्यातील ७५ शहरात अमृत वनउद्यानांची निर्मिती केली जाणार आहे. शहरी भागात स्वातंत्र्याच्या स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी हे उद्यान दीपस्तंभ म्हणून भूमिका बजावेल असा त्यांच्या निर्मितीमागचा हेतू आहे.

एक ते पाच हेक्टर जागेची निवड करून हे उद्यान साकारले जाणार आहे. उद्यान निर्मितीनंतर मनोरंजक देखावे, वृक्षांच्या माहितीसाठी ‘क्यूआर कोड’, पॅगोडा, उंच मनोरा, निसर्गमार्ग, रोपवाटिका, हर्बल गार्डन, पक्षांसाठी घरट्याची निर्मिती, निसर्ग पायवाट या सुविधाही निर्माण केल्या जाणार आहेत.

२५ गावात पंचायतन उद्यान

ग्रामीण भागामध्ये पंचायतन वनउद्यान निर्मिती केली जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील २५ गावांची निवड त्यासाठी केली जाणार आहे. या वनउद्यानात वड, उंबर, पिंपळ, बेल, कडुनिंब व देशी आंबा या वृक्षांची लागवड केली जाणार आहे. स्थानिक नागरिकांचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य व रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासह शासनाच्या हरितकरणाच्या हेतूशिवाय देशी वृक्षांच्या लागवडीस आणि संवर्धनास प्रोत्साहन दिले जाणार आहे.

वनश्री पुरस्कार, वनग्राम पुरस्कार, निर्मलग्राम पुरस्कार, ग्रामस्वच्छता पुरस्कार मिळालेले गावे, स्वयंपूर्ण अर्ज करणारी गावे, औद्योगिक विकास महामंडळाची क्षेत्र असलेली गावे व वृक्षप्रेमी संस्था यातून या २५ गावांची निवड केली जाणार आहे. गावालगत किंवा मध्यवर्ती ठिकाणी वनजमीन, शासकीय जमीन अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या उपलब्ध जमिनीवर हे उद्यान साकारले जाईल.

या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांसाठी विविध सुविधा देखील उपलब्ध केल्या जाणार आहेत. या सर्व उद्यानांसाठी महसूल व वन विभागाकडून निधी दिला जाणार आहे. सामाजिक जबाबदारीसह सीएसआर फंडाच्या माध्यमातून संस्थांकडून देखील यासाठी निर्मितीचा खर्च भागविण्याचा प्रयत्न होणार आहे.

"शहरास ग्रामीण भागात उद्याने साकारण्याची ही कौतुकास्पद संकल्पना आहे. यामुळे पर्यावरण संवर्धन होणार असून सौंदर्यात देखील भर पडणार आहे. याच्या निर्मितीसह देखभालीसाठी पर्यावरण प्रेमी म्हणून आम्ही नक्कीच योगदान देऊ." - माधव पिंगळे, पर्यावरण व वृक्षप्रेमी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT