नाशिक / येवला : शेतकऱ्यांच्या तोंडचा घास कधी हिरावला जाईल हे सांगता येत नाही, तसेच त्याच्या पदरात कधी भरभरून पडेल याचाही नेम नाही. यंदाही मक्याबाबत असेच झाले असून, अनपेक्षितपणे प्रथमच रब्बी हंगामातील मका शासकीय आधारभूत खरेदी योजनेंतर्गत खरेदीचा निर्णय केंद्र सरकारने घेतला अन् बाजारात भाव घसरत असताना शेतकऱ्यांना क्विंटलमागे ५०० ते ६०० रुपयांचा वाढीव भाव मिळाला. या खरेदीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुमारे पाच कोटींची लॉटरी लागल्यागत किंमत मिळाली.
योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ
गेल्या वर्षी लष्करी अळीचा हल्ला होऊनही शेतकऱ्यांनी दमदार उत्पन्न घेतले. स्टार्स व पोल्ट्रीसाठी सर्वत्र जोरदार मागणीमुळे खरीप हंगामात विक्रमी दोन हजारांवर बाजारभाव मिळाल्यामुळे खरिपात शासनाच्या खरेदी योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली होती. भाव तेजीत असताना डिसेंबरनंतर मात्र कोरोनाचा उद्रेक वाढला आणि पोल्ट्री उद्योगाविषयी गैरसमज निर्माण होऊन अचानक मागणी घटली. महिनाभरातच मक्याचा भाव ११०० ते १३०० पर्यंत घसरल्याने खरिपाच्या मक्यात कोट्यवधींचे नुकसान झाले.
याचमुळे रब्बीची खरेदी...
मुदतीत नावनोंदणी व खरेदी न झाल्याने मार्केटिंग फेडरेशनचेही खरेदीचे उद्दिष्ट विस्कळित झाल्यामुळे प्रथमच जिल्ह्यात या वर्षी रब्बी हंगामातही मका खरेदी झाली अन् त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला. आजही खासगी बाजारात मक्याला सरासरी एक हजार २०० रुपयांचा भाव मिळतोय. त्या तुलनेत शासकीय खरेदीचा दर एक हजार ७६० रुपये असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात नावनोंदणी करून रब्बी हंगामात मका विक्रीची संधी साधली. जिल्ह्यातील आठ खरेदी केंद्रांवर दोन हजार ७६६ शेतकऱ्यांची ८८ हजार २८८ क्विंटल मका खरेदी झाली आहे. खरेदी झालेल्या मक्याला खासगी बाजाराच्या तुलनेत ५०० ते ६०० रुपये अधिक दर मिळाल्याने शेतकऱ्यांना पाच कोटींचे वाढीव उत्पन्न मिळाले आहे.
...तर मातीमोल विक्री
जिल्ह्यात तब्बल सात हजार ५८४ शेतकऱ्यांनी मका विक्रीसाठी नावनोंदणी केली. मात्र केवळ दोन हजार ७६६ शेतकऱ्यांची खरेदी झाली आहे. चार हजार ५२८ शेतकरी मका विक्रीपासून वंचित राहिले असून, त्यांच्याकडे अंदाजे सुमारे दीड लाख क्विंटलच्या आसपास मका शिल्लक आहे. यामुळे पुन्हा मका खरेदीला मुदतवाढ द्यावी, अशी विनंती राज्य सरकारने केंद्राकडे केली आहे. शिल्लक मका खरेदी न झाल्यास या शेतकऱ्यांना खासगी बाजारात सरासरी एक हजार २०० रुपये दराने मका विक्री करावी लागेल, असे झाले आहे. जिल्ह्यातील साडेचार हजार शेतकऱ्यांना सुमारे आठ कोटींचा चुना लागण्याची भीती आहे.
हेही बघा > अरेच्चा! तर हे रहस्य आहे काय मालेगावमधून कोरोना संपुष्टात येण्याचं?...भन्नाट व्हिडिओ एकदा पाहाच!
आकडे बोलतात...
- जिल्ह्यातील एकूण खरेदी ः ८८,२८८ क्विंटल
- शासकीय हमीभाव ः १,७६० रुपये
- खासगी बाजारभाव ः १०५० ते १३०० (सरासरी १,२०० रुपये)
- हमीभाव व बाजारभावातील फरक ः ५५० ते ६०० रुपये
- शेतकऱ्यांना फायदा ः सुमारे ५ कोटी
रिपोर्टर - संतोष विंचू
(संपादन - ज्योती देवरे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.