Yeola Market
Yeola Market esakal
नाशिक

६४ वर्षांची परंपरा मोडीत; येवल्यात शेतकरीहिताचा ऐतिहासिक निर्णय

संतोष विंचू

येवला (जि. नाशिक) : अमावास्या आली की बाजार समितीला सुटी... असे समीकरण गेल्या ६४ वर्षांपासून येथील बाजार समितीत सुरू आहे. मात्र, आता शेतकरीहितासाठी ही अंधश्रद्धा मोडीत काढण्याचा येथील बाजार समितीच्या प्रशासक मंडळ व व्यापाऱ्यांनी निर्णय घेतला आहे. यामुळे आता अमावास्येला सुटी न घेता येथील लिलाव सुरू राहणार आहेत. मुख्य प्रशासक वसंतराव पवार यांनी या निर्णयाची माहिती दिली. (historic-decision-in-yeola-market-committee-nashik-agriculture-news)

शेतकरीहितासाठी 'हा' निर्णय महत्त्वाचा

पूर्वी ग्रामीण भागात अमावास्येचा दिवस अशुभ मानला जायचा. शेतीची कामे केली जात नव्हती. किंबहुना शेतकरी बैलांच्या खांद्यावर कुठलेही साहित्य ठेवत नसायचे. त्यामुळे अमावास्या असली, की बाजार समितीत बैलगाडीतून शेतमाल विक्रीला येतच नसायचा. त्यातूनच अमावास्येला लिलाव बंदची संकल्पना पुढे आल्याचे सांगितले जाते. पुढे बैलगाड्यांची जागा ट्रॅक्टर व रिक्षा या साधनांनी घेतली. परंतु बंदची प्रथा मात्र कायमच राहिली होती. या निर्णयावर जिल्हाभर अनेकदा टीकाही झाली. या सर्व पार्श्‍वभूमीवर आता शेतकऱ्यांसह व्यापारीही अमावास्येला शुभ-अशुभ मानत नसल्याने शेतकरीहितासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

शेतकऱ्यांसह शेतकरी संघटनामधून स्वागत

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व परवानाधारक, खरेदीदार व्यापाऱ्यांची मुख्य प्रशासक श्री. पवार, सचिव कैलाश व्यापारे व प्रशासकासोबत संयुक्त बौठक घेण्यात आली. बाजार समितीची स्थापना १९५५ मध्ये झाली असून, प्रत्यक्ष कामकाज १९५७ मध्ये सुरू झालेले आहे. तेव्हापासून आजपर्यंत दर अमावास्येला बाजार समितीत कांदा, मका व भुसार मालाचे लिलाव बंद राहत होते. परंतु शेतकरी बांधवांची कांदा विक्रीची निकड विचारात घेऊन व शेतकरी बांधवांच्या अनेक दिवसांच्या मागणीचा विचार करून बाजार समितीने मागील ६४ वर्षांची परंपरा मोडीत काढून यापुढे प्रत्येक अमावास्येला इतर बाजार समित्यांप्रमाणे शेतमाल लिलाव चालू ठेवण्याबाबत बैठकीत सर्वानुमते निर्णय घेतला आहे.


या निर्णयामुळे शेतकऱ्यांची अमावास्येच्या दिवशी शेतमाल विक्रीची अडचण दूर होणार असून, या दिवशीही कांदा व इतर भुसारा मालाची विक्री करता येणार आहे. तसेच, कृषी उत्पन्न बाजार समितीत जास्तीत जास्त दिवस लिलावाचे कामकाज व्हावे, याकरिता प्रयत्न करण्यात येत असून, अमावास्येच्या दिवशी लिलाव चालू राहणार असल्याने वर्षात बारा दिवस वाढीव मिळणार आहे. त्यामुळे दोन ते तीन लाख क्विंटल कांदा विक्री वाढणार असल्याचा विश्‍वास सचिव व्यापारे यांनी व्यक्त केला. या संदर्भात झालेल्या बैठकीस मुख्य प्रशासक वसंत पवार, प्रशासक भानुदास जाधव, सचिव के. आर. व्यापारे, नंदकिशोर आट्टल, व्यापारी सुमीत समदडिया, जयेश ठाकूर, योगेश सोनी, प्रणव समदडिया, शंकर कदम, अर्शद शेख आदी उपस्थित होते. या निर्णयाचे शेतकऱ्यांसह शेतकरी संघटनामधून देखील स्वागत होत आहे.

''अनेक वर्षांची परंपरा असल्याने या बाबत सर्वानुमते चर्चा करून लिलाव सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही तशा सूचना केल्या होत्या. हा निर्णय ऐतिहासिक असून, शेतकरीहिताचा ठरणार आहे. यापुढे नियमितपणे अमावास्येलाही लिलाव सुरू राहतील. शेतकऱ्यांची वर्षानुवर्षाची मागणी पूर्ण करता आल्याचा आनंददेखील आहे.'' -वसंतराव पवार, मुख्य प्रशासक, बाजार समिती

(historic-decision-in-yeola-market-committee-nashik-agriculture-news)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT