Uddhav Thackeray esakal
नाशिक

Lok Sabha Election Result 2024 : ...म्हणून उद्धव बदनाम होऊनही विजयी

Lok Sabha Election : लोकसभा निवडणूक ज्या टोकाला जाऊन लढली गेली, त्याआधी शिवसेनेला येनकेन प्रकारे बाधित करण्याचे काम अनेक यंत्रणांद्वारे केले गेले; पण ठाकरे यांच्या ताकदीवर मंगळवारी शिक्कामोर्तब झाले.

सकाळ वृत्तसेवा

सुदर्शन सारडा : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : हिंदुत्वाच्या रक्षणासाठी शिवसेना हे नाव घेत बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या चार अक्षरांभोवती अधिराज्य निर्माण केले, त्या वलयावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाच शिक्का मतदारांनी मारला. लोकसभा निवडणूक ज्या टोकाला जाऊन लढली गेली, त्याआधी शिवसेनेला येनकेन प्रकारे बाधित करण्याचे काम अनेक यंत्रणांद्वारे केले गेले; पण ठाकरे यांच्या ताकदीवर मंगळवारी शिक्कामोर्तब झाले. (Lok Sabha Election Result 2024)

वर्ष २०१९ पूर्वी उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाबरोबर युती करीत निवडणूक लढली, तेव्हाच्या राजकीय वातावरणात अपेक्षेपेक्षा ३० जागा सेनेला कमी मिळाल्या आणि साहजिकच त्याचे खापर भाजपवर फोडत वैचारिक धागे झुगारून महाविकास आघाडी सत्तेत बसली. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे प्रमुख म्हणून जनतेला आपलेसे करण्याचा प्रयत्न केला. कोविड काळातही ते घरातून बोलतात म्हणून अनेकदा टीकाही झाली.

पण मतदारराजाला ते आपुलकीचे वाटत होते. त्यानंतर राजकीय भूकंप होऊन एकनाथ शिंदे यांनी ४० जणांना एकत्र करीत केलेली सामूहिक बंडखोरी फोडाफोडीच्या इतिहासात लिहिली गेली. आपण कष्टाने मोठे केलेले पक्षचिन्ह गेल्यावर त्यांनी मशाल निशाणी मनात रुजवत जनतेत जाण्याचे पसंत केले.

खरे तर बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे पिता-पुत्र दोन टोकाच्या स्वभावाचे असतानाही उद्धव यांनी जो संयम उराशी बाळगून सर्व मुद्द्यांचा तोफगोळा संजय राऊत यांच्याकडे सोपविला, तेथेच त्यांनी लोकांच्या मनात घर केले. सत्ता आणि पैसा या पलीकडे जाऊन उद्धव यांनी ज्या मुद्द्यांना स्पर्श करीत वारंवार टीका झेलली, तीच त्यांच्या पथ्यावर पडत गेली. उद्धव ठाकरे यांचे प्रमाणित भाषण हे अनेकांना आपलेसे करून गेले. त्यामुळेच आपल्याच कुटुंबातील व्यक्ती तर बोलत नाही ना, असा होराही निर्माण झाला. (latest marathi news)

त्यांच्या विरोधकांकडून अनेकदा जहरी टीका होत असूनही उद्धव यांनी टीकाकारांची किंमत ठरवली होती, अन् हीच खरी त्यांची जमेची बाजू ठरली. त्यांच्यातला राजकीय संयम इतका काही घट्ट होता, की खुद्द नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी त्यांना ड्युप्लिकेट पार्टी म्हणत हिणवलं. पण, ती ठाकरेंच्या मनाला लागण्याऐवजी शिवसैनिकांच्या मनाला अधिक बोचली.

त्यात महाविकास आघाडी म्हणून सर्वच प्रमुख नेत्यांनाही उद्धव ठाकरे हे भावले, ते अनपेक्षितपणे लोकांच्या मनात जाऊन बसले आणि त्याचाच परिपाक म्हणून ‘मविआ’च्या सभांमध्ये शेवटचं भाषण उद्धव ठाकरे यांचं होऊ लागलं. खरी-खोटी शिवसेना हा मुद्दा एखाद्या राज्यस्तरीय नेत्याच्या मुखी अधिक शोभून दिसला असता; परंतु मोदी-शहा यांनी तो मांडल्याने राजकीय नियतीच ठाकरेंच्या बाजूने होती, हे स्पष्ट झालं आहे.

गंभीर आजारपणातही त्यांनी दोन वेळा केलेले राज्यव्यापी दौरे आणि त्यानंतर पाच टप्प्यांत प्रचाराचे अचूक नियोजन सगळ्यांच्या पथ्यावर पडलं. उद्धव ठाकरे यांच्याभोवती सहानुभूती होती म्हणून आज काँग्रेसने एका जागेवरून ही मुसंडी मारली, हेही कुणी नाकारू शकणार नाही. ते जिथे गेले, तिथे सर्वांचे हात हातात घेऊन ‘हम सब एक है’चा नाराही प्रभावी ठरला. त्याचे प्रत्यंतर अमर काळे यांच्या विजयावरून जाणवेल.

नारायण राणे, राज ठाकरे यांनी केलेल्या ‘जय महाराष्ट्र’पासून बाळासाहेब ठाकरे यांचे निर्वाण ते एकनाथ शिंदे यांचे बंड असे कितीतरी आघात झेलून ते तितक्याच ताकदीने उजळून निघाले, हेही खरे. म्हणूनच उद्धव ठाकरे संपता संपत नव्हते, तेव्हा ते बदनाम केले गेले. त्यातही ते बदनाम झाले नाहीत, म्हणून संपविण्याचा कट शिजला; परंतु मंगळवारच्या राज्यातील एकूण निकालावरून तो कट शिजविणारा ओटा उखडून गेला, हेही खरे आहे.

‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो’ न बोलता त्याला देशभक्तीची किनार देऊनही सर्वच भागातला ‘अस्सल शिवसैनिक’ हा ठाकरे यांच्याच पाठीशी होता, हे स्पष्ट झाले. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांचे संयमी नेतृत्व ‘मविआ’ची एकनिष्ठता कायम ठेवण्यासाठी सर्वांत प्रभावी ठरले, हे त्यांचे विरोधकही नाकारू शकत नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case: ''संतोष देशमुख प्रकरणातल्या आरोपींनी राबवलं ऑपरेशन डी-टू'', उज्वल निकमांनी घेतलं थेट पाकिस्तानचं नाव

Trip Locations : गुगलवर वर्षभरात सर्च झालीत टॉप 5 ठिकाणे, दोन दिवसांची सुट्टी घेऊन प्लॅन करा ट्रीप, खर्चही एकदम कमी

Latest Marathi News Live Update : वर्ध्यात सामान्य रुग्णालयात आग, सुदैवाने कुणालाही इजा नाही

ICC Rankings: वर्ल्ड कप स्टार दीप्ती शर्मा नंबर १! ऑस्ट्रेलियान खेळाडूला धक्का; पण, स्मृती मानधनाने गमावला ताज

नियती इतकी निर्दयी कशी? अपघात आई-वडिलांचं छत्र हरवलं, निरागस लेकरांनी एकमेकांना सावरलं; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT