नाशिक : पोटच्या मुलांचा ताबा मिळविण्यासाठी चार महिन्यांपासून मला पायपीट करावी लागत आहे. स्वतःची अल्पवयीन मुलं ताब्यात मिळत नाही, असा कायदा असतो का? पोटच्या मुलांना माझ्याविषयी एवढा तिरस्कार निर्माण करणाऱ्यांनी त्यांच्यात एवढा काय द्वेष भरला याची चौकशी करावी, अशी माझी मागणी आहे. अशी आर्त हाक मातेनी दिली आहे..वाचा एका मातेची संघर्षाची कहाणी..
मातेच्या संघर्षाची कहाणी
श्रीमती यशोदा प्रसाद झोले असे या अभागी महिलेचे नाव आहे. त्या त्र्यंबकेश्वरला गंगाद्वार येथे राहायला आहेत. त्यांनी बालकल्याण समितीकडे त्यांच्या मुलांचा ताबा मिळावा म्हणून दाद मागितली आहे. श्रीमती यशोदा यांना १२ वर्षांची मुलगी आणि दहा वर्षांचा मुलगा आहे. मार्च २०१९ पर्यंत पती व दोन मुलांसह त्यांचे चौकोनी कुटुंब राहायचे. मात्र गेल्या १४ मार्चला त्यांचे पती प्रसाद यांनी आत्महत्या केली. त्यानंतर मुलांसोबत राहण्याची वेळ आलेल्या या महिलेच्या ताब्यातील दोन्ही मुले त्यांच्या चुलत-सासू योगिता झोले यांनी ताब्यात घेतली आहेत. पतीच्या दशक्रिया विधीच्या दिवसापासून चुलतसासूच्या ताब्यातील अल्पवयीन मूल त्यांच्या ताब्यात मिळत नसल्याची तक्रार आहे.
जन्मदात्या आईकडे जाण्यास नकार
चुलतसासूने अल्पवयीन मुलांना फितवल्यामुळेच स्वतःची मुले माझ्याकडे येत नसल्याची या महिलेची तक्रार आहे. त्यासाठी मार्चअखेरच्या आठवड्यापासून त्यांच्या विविध कार्यालयांत चकरा सुरू आहेत. त्र्यंबकेश्वर येथील सामाजिक कार्यकर्त्या ललिता शिंदे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर श्रीमती शिंदे यांनी त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात तेथील पोलिसांच्या हा प्रकार लक्षात आणून दिला. त्यांनी याबाबत तक्रार केली. पोलिसांनी यशोदा यांच्या चुलतसासू व अल्पवयीन मुलांना बोलावून घेत त्यांचे समुपदेशन केले. मात्र, मुलांनी आईविषयी वाईटसाईट आरोप करीत जन्मदात्या आईकडे जाण्यास नकार दिला.
हेही वाचा > कोरोनाचा भयानक काळ...अशातही 'तिने' क्षणाचाही विलंब न लावता दिला पार्थिवाला खांदा! काय घडले वाचा
बालकल्याण समितीकडे दाद
यशोदा यांनी मानव हक्कविषयक काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संघटनेकडे तक्रार केली. तेथील कार्तिक सुरेंदर शेट्टी या पदाधिकाऱ्याने त्र्यंबकेश्वरला यशोदा यांची भेट घेत मुलांना समजाविण्याचा प्रयत्न केला. पण तेथेही त्यांची दोन्ही मुले आईकडे न जाण्याबाबात ठाम राहिली. त्यामुळे अखेर श्री. शेट्टी यांनी बालकल्याण समितीकडे दाद मागण्याचा सल्ला दिल्याने चार महिन्यांनंतर श्रीमती यशोदा यांनी बालकल्याण समितीकडे दाद मागितली आहे.
पोटच्या मुलांना माझ्याविषयी एवढा तिरस्कार
पोटच्या मुलांचा ताबा मिळविण्यासाठी चार महिन्यांपासून मला पायपीट करावी लागत आहे. स्वतःची अल्पवयीन मुलं ताब्यात मिळत नाही, असा कायदा असतो का? पोटच्या मुलांना माझ्याविषयी एवढा तिरस्कार निर्माण करणाऱ्यांनी त्यांच्यात एवढा काय द्वेष भरला याची चौकशी करावी, अशी माझी मागणी आहे. --यशोदा झोले (त्र्यंबकेश्वर)
मातेला मुलांचा ताबा मिळणार का?
त्र्यंबकेश्वर येथील महिला चार महिन्यांपासून तिच्या पोटच्या मुलांचा ताबा मिळविण्यासाठी संघर्ष करीत आहे. पतीच्या निधनानंतर चुलतसासूच्या ताब्यात असलेल्या मुलांचा ताबा मिळावा, अशी महिलेची मागणी आहे. मात्र मुलांनी जन्मदात्रीएवजी चुलतआजीकडे राहण्यास पसंती दिल्याने मानवाधिकार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यात लक्ष घालून बालकल्याण समितीकडे चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे एकाकी राहणाऱ्या मातेला मुलांचा ताबा मिळणार का, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.
संपादन - ज्योती देवरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.