नाशिक : कोरोनाचा संबंध चिकनशी जोडणाऱ्या सोशल मीडियातील अफवेमुळे राज्यातील पोल्ट्री व्यवसाय संकटात सापडला आहे. या व्यवसायाच्या खेळत्या भांडवलासंबंधी केंद्र सरकारला विनंती करावी, असे साकडे गुरुवारी (ता. 12) राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांना पोल्ट्री फार्मर्स व ब्रीडर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी घातले. त्यावेळी पुढील आठवड्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी चर्चा करण्याची ग्वाही श्री. पवार यांनी दिली.
चर्चेतून पोल्ट्री व्यावसायिकांच्या प्रश्नावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल
असोसिएशनचे सचिव उद्धव अहिरे यांनी याबाबतची माहिती दिली. असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (ता. 11) मंत्रालयात पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली. गुरुवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये श्री. केदार, आमदार रोहित पवार यांच्यासमवेत श्री. पवार यांची असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. श्री. पवार यांच्याकडे पोल्ट्री व्यवसायातील अडचणी मांडल्या. व्यवसाय अडचणीत आल्याने खेळते भांडवल संपले आहे. त्यामुळे थकीत कर्जाचे मध्यम मुदतीत रूपांतर करावे आणि नवीन कर्जपुरवठ्यासाठी बॅंकांनी 4 टक्के व्याजदर आकारावा, अशी मागणी श्री. पवार यांच्याकडे करण्यात आली, असे सांगून श्री. अहिरे म्हणाले, की केंद्रीय अर्थमंत्र्यांशी चर्चेवेळी राज्यासह देशातील पोल्ट्री व्यावसायिकांच्या प्रतिनिधींना बोलविण्यात येईल. चर्चेतून पोल्ट्री व्यावसायिकांच्या प्रश्नावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही श्री. पवार यांनी स्पष्ट केले.
केदार यांनी दिली निर्णयाची माहिती
श्री. केदार यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीतील निर्णयाची माहिती श्री. पवार यांना दिली. वीजबिलमाफी आणि पुढील वीजबिलाची शेतीच्या दराने आकारणी याविषयीचे पत्र ऊर्जामंत्र्यांना लिहिण्यात आले आहे. तसेच ग्रामपंचायत कर आणि महसुलातील सवलत याबद्दल कार्यवाही करण्यात येत आहे. बर्ड फ्लूच्या धर्तीवर पोल्ट्री व्यावसायिकांना मदत करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पोल्ट्री व्यावसायिकांवरील आपत्ती ही राष्ट्रीय असल्याने अनुदानातील भार उचलावा, अशी विनंती केंद्र सरकारला करण्यात येणार आहे, अशी माहिती श्री. केदार यांनी या वेळी दिल्याचे श्री. अहिरे यांनी सांगितले. असोसिएशनचे अध्यक्ष सी. वसंतकुमार, उपाध्यक्ष श्रीकृष्ण गांगुर्डे, राजेंद्र थोरात, नबाजी काळभोर, पांडुरंग सांडभोर, डॉ. प्रसन्न पेडगावकर, श्याम भगत आदी चर्चेत सहभागी झाले होते.
तेराशे कोटींचे थकीत कर्ज
पोल्ट्री व्यवसायावर कोसळलेल्या मंदीमुळे 650 कोटींचा फटका बसला असून, आणखी तेवढा दणका पुढील काळात बसणार आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यवसायाला तेराशे कोटींचा दणका बसणार असून, तेवढी रक्कम थकीत जाणार आहे. या थकीत कर्जाचे मध्यम मुदतीच्या कर्जात रूपांतर करण्याची विनंती श्री. पवार यांना करण्यात आल्याचे श्री. अहिरे यांनी सांगितले.
राज्यात पोल्ट्री व्यवसाय छोट्या शेतकऱ्यांच्या हातात आहे. त्यांचा हा व्यवसाय संपविण्याची चाल बहुराष्ट्रीय कंपन्यांनी खेळली आहे. छोट्या शेतकऱ्यांच्या व्यवसायात बहुराष्ट्रीय कंपन्या संधी शोधत असल्याने त्यांनी अधिकची मंदी आणली आहे. त्यास चाप लावावा, अशी विनंती शरद पवार यांना करण्यात आली आहे. - श्रीकृष्ण गांगुर्डे, उपाध्यक्ष, पोल्ट्री फार्मर्स व ब्रीडर असोसिएशन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.