startups
startups sakal
नाशिक

स्वातंत्र्यदिनापासून स्टार्टअप यात्रा; युवकांसाठी 1 लाखापर्यंतची पारितोषिके

प्रशांत बैरागी : सकाळ वृत्तसेवा

नामपूर (जि. नाशिक) : तरुणांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागामार्फत राज्यात १५ ऑगस्टपासून महाराष्ट्र स्टार्टअप व नावीन्यता यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी राज्यातील सहा विभागांमध्ये स्टार्टअप, उद्योजकता, नावीन्यता, युनिकॉर्न याविषयी मोठ्या प्रमाणात प्रचार, प्रसिद्धी व जनजागृती केली जाणार असून, नवसंकल्पना घेऊन येणाऱ्या युवक-युवतींना प्रशिक्षण, तसेच त्यांच्या संकल्पनांचे सादरीकरण करण्याची संधी मिळणार असून, उत्तम संकल्पना सादर करणाऱ्या १३४ युवकांना दहा हजार रुपयांपासून एक लाख रुपयांपर्यतची पारितोषिकेही दिली जाणार आहेत. (Latest Marathi News)

स्टार्टअप कंपन्यांमध्ये अमेरिका, चीनपाठोपाठ भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो.

देशात स्टार्टअपला अच्छे दिन आले असून, २०२२ मध्येही स्टार्टअप कंपन्यांचा आलेख वाढला आहे. २०२२ च्या पहिल्या तिमाहीत जानेवारी ते मार्चदरम्यान तब्बल १४ स्टार्टअप कंपन्यांना युनिकॉर्नचा दर्जा मिळाला आहे. जानेवारी ते मार्च ही सलग तीसरी अशी तिमाही ठरली आहे, की या काळात स्टार्टअप कंपन्यांनी दहा अब्ज डॉलरपेक्षा अधिक भांडवल उभारले आहे.

मुंबई, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक आणि पुणे अशा सहा विभागांत स्टार्टअप यात्रेचा स्वातंत्र्यदिनी प्रारंभ होणार आहे. तळागाळातील व ग्रामीण, दुर्गम भागातील नवउद्योजकांचा आणि नावीन्यपूर्ण कल्पनांचा शोध घेणे, नवउद्योजकांना प्रोत्साहन, तज्ज्ञ मार्गदर्शन, निधी आणि आवश्यक पाठबळ पुरविणे, तसेच राज्याची उद्योजकता व नावीन्यपूर्ण परिसंस्था बळकट करणे असा या स्टार्टअप यात्रेचा उद्देश आहे.

स्टार्टअप यात्रेतील मोबाईल व्हॅन राज्यातील प्रत्येक तालुक्यातील शाळा, महाविद्यालये, आयटीआय, लोकसमूह एकत्रित होणाऱ्या जागा आदी ठिकाणी जाऊन उद्योजकता आणि स्टार्टअपविषयी जनजागृती करेल. नावीन्यपूर्ण कल्पना असलेल्या नागरिकांची नोंदणी करून त्यांना माहिती देण्यात येईल. यात्रेमध्ये जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर आणि सादरीकरण सत्रांचेही आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये स्थानिक उद्योजकांची व्याख्याने होतील. त्याचबरोबर नवीन संकल्पना घेऊन येणाऱ्या नागरिकांना त्यांच्या संकल्पनांचे शासकीय अधिकारी, उद्योजक यांच्यासमोर सादरीकरण करण्याची संधी मिळेल.

कृषी, शिक्षण, आरोग्य, शाश्वत विकास, स्मार्ट पायाभूत सुविधा आणि गतिशीलता, ई-प्रशासन आणि इतर अशा विषयांतील नवनवीन संकल्पना, स्टार्टअप्सना पारितोषिके दिली जाणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील सादरीकरण सत्रातील उत्तम १० कल्पनांचे राज्यस्तरीय तज्ज्ञ समितीसमोर अंतिम सादरीकरण होईल. राज्यस्तरावर एकूण २६ विजेत्यांची निवड केली जाईल. त्याचबरोबर जिल्ह्यांमध्ये उत्तम तीन विजेत्यांची निवड केली जाईल. २५ हजार, १५ हजार व १० हजार अशी पारितोषिके देण्यात येतील.

विभागस्तरावर सहा सर्वोत्कृष्ट नवउद्योजक व सहा सर्वोत्कृष्ट महिला उद्योजिका यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाईल. राज्यस्तरावर १४ विजेत्यांना पारितोषिके दिली जातील. यामध्ये प्रथम पारितोषिक एक लाख रुपये, तर द्वितीय पारितोषिक ७५ हजार रुपये आहे. याशिवाय विजेत्या संकल्पनांना आवश्यक पाठबळ देण्यात येणार आहे. उपक्रमामध्ये ग्रामीण भागातील तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र देशात अव्वल

स्टार्टअप रँकिंग २०२१ मध्ये महाराष्ट्र राज्य टॉप परफॉर्मर श्रेणीमध्ये आले आहे. देशातील १०४ युनिकॉर्नपैकी २४ युनिकॉर्न्स म्हणजे २३ टक्के युनिकॉर्न्स महाराष्ट्रातील आहेत. युनिकॉर्न म्हणजे अशी कंपनी जिचे मूल्यांकन एक बिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजे सात हजार ९०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. देशातील दोन लाख १३ हजार स्टार्टअप्सपैकी ३६ हजार ८०० म्हणजे १८ टक्के स्टार्टअप्स महाराष्ट्रातील आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान २५ ते ३० स्टार्टअप्स असून, अगदी दुर्गम अशा गडचिरोली जिल्ह्यात ३२, तर नंदुरबार जिल्ह्यात ३७ स्टार्टअप्स आहेत. मुंबई महानगरात १४ हजार ७००, तर पुण्यामध्ये आठ हजार ६०० स्टार्टअप्स आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT