नाशिक/मुंढेगाव : देवळे (ता. इगतपुरी) येथील नागरिकांना १५ दिवसांपासून नदीचे पाणी पिण्याची वेळ आली आहे. दिवसभर शेतात कष्ट करुन आल्यावर पाण्यासाठी महिलांना वणवण फिरावं लागत आहे. अन् तरीही या विषयावरून ग्रामपंचायत आणि पाणीपुरवठा विभागाकडून कानाडोळा केला जात आहे. हात झटकून या दोघांमध्येच जुंपल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र या प्रकरणात नागरिकांचे हाल होत आहे.
दूषित रासायनिक गटारीचे पाणी थेट नदीपात्रात
नागरिकांना ग्रामपंचायत आणि पाणीपुरवठा विभागाच्या टोलवाटोलवीमुळे तब्बल १५ दिवसांपासून नागरिकांना दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. पाणीपुरवठा विभागाने पाहणी केली; मात्र हा विषय ग्रामपंचायतीचा असल्याचे सांगून हात झटकले, तर ग्रामपंचायतीने पाणीयोजनाच अजून पंचायतीने ताब्यात घेतली नसल्याने जबाबदारी पाणीपुरवठा विभागाचीच असल्याचे सांगून अंग काढून घेतले. या दोन्ही यंत्रणाच्या उदासीनतेमुळे नागरिकांवर मात्र दूषित पाणी पिण्याची वेळ आली म्हणून नागरिकांनी कूपनलिकेची सोय केली. मात्र ती नादुरुस्त झाल्याने पाणी मिळेनासे झाले आहे. दारणा नदीच्या पातळीत वाढ झाल्याने विविध भागातील दूषित रासायनिक गटारीचे पाणी नदीपात्रात मिसळू लागल्याने दारणेकाठच्या गावांत दूषित पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दारणेकाठच्या गावातील प्रश्न ऐरणीवर...
देवळे (ता. इगतपुरी) येथील नागरिकांना साथीचे आजार वाढल्याच्या तक्रारी आहेत. यावर 'दूषित पाण्यामुळे साथीचे आजार, दारणेकाठच्या गावातील प्रश्न ऐरणीवर' या मथळ्याखाली 'सकाळ'ने बातमी प्रसिद्ध केली होती. बातमीची तातडीने दखल घेत पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता अजित सूर्यवंशी व संबंधित अधिकाऱ्यांनी आणि ग्रामपंचायत देवळे (ता. इगतपुरी) येथील सरपंच ज्ञानेश्वर उघडे, ग्रामसेवक तुषार रजपूत यांनी तातडीने संबंधित विषयाची दखल घेत विहिरीची पाहणी केली. मात्र या विषयावरून ग्रामपंचायत आणि पाणीपुरवठा विभागाने हात झटकून या दोघांमध्येच जुंपल्याचे चित्र पाहायला मिळाले.
कूपनलिका नादुरुस्त...
पाणीपुरवठा विभाग आणि ग्रामपंचायतीच्या टोलवाटोलवीमुळे दूषित पाणी प्यावे लागते म्हणून ग्रामस्थांनी गावातील एकमेव कूपनलिकेहून पाणी भरणे सुरू केले, तर आता कूपनलिकेचा हातपंप तुटल्याने महिलांना पाणी मिळणे अवघड झाले आहे.
हेही वाचा > थरारक! बायकोच्या चारित्र्यावर होता नवऱ्याला संशय...मध्यरात्रीच केला 'असा' अंगावर काटा आणणारा प्रकार
पाणी योजनेला तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. २०११ च्या शासन निर्णयनुसार तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला असल्यास योजना आहे त्या स्थितीत बंद करून ग्रामपंचायतीने हस्तांतरित करावी. त्यानंतर उर्वरित कामाचे मूल्यांकन करून जिल्हा परिषदेकडे वर्ग करावी. - अजित सूर्यवंशी, शाखा अभियंता, पाणीपुरवठा विभाग, इगतपुरी
विहिरीचे व टाकीचे काम हे अर्धवट असल्याने आम्ही ती ताब्यात घेतली नसल्याने दुरुस्ती व कोणतीही उपाययोजना करू शकत नाही आणि जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही योजना ताब्यात घेणार नाही. - ज्ञानेश्वर उघडे, सरपंच, देवळे
नळाला गढूळ पाणी येत असल्याने महिलांना घोटी-सिन्नर हा वर्दळीचा मार्ग ओलांडून अर्धा ते एक किलोमीटर दूर जाऊन हातपंपावरून पाणी आणावे लागत होते. मात्र हातपंपही तुटल्याने येथील नागरिकांना दारणा नदीचे दूषित पाणी पिण्याची वेळ आली असल्याने येथील नागरिक चांगलेच संतप्त आहेत. - विमल तोकडे, पंचायत समिती सदस्य
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.