यवतमाळ : जिल्ह्यातील 980 ग्रामपंचायतीसाठी होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नामनिर्देशनपत्रासोबत जोडाव्या लागणाऱ्या कागदपत्रांवरून उमेदवारांचा गोंधळ उडाला आहे. शपथपत्र, हमीपत्र, स्वयंघोषणापत्रासाठी साधा कागद की मुद्रांक वापरावा यावरून संभ्रम आहे. त्यातच नवीन बॅंक खाते बंधनकारक असल्याने खाते काढण्यासाठी इच्छुकांची गर्दी आता बॅंकेकडे वळली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानंतर संबंधित कार्यालयामध्ये इच्छुक उमेदवारासाठी माहितीपत्रक लावण्यात आले. त्यामध्ये नामनिर्देशनपत्रासोबत जोडावयाच्या कागदपत्रांची यादी आहे. त्या यादीत शपथपत्र, स्वंयघोषणापत्र तसेच हमीपत्राचा उल्लेख आहे. यातील कोणता पुरावा साध्या कागदावर तर कोणता मुद्रांकावर हवा याबाबत स्पष्ट केलेले नाही. त्यामुळेच उमेदवारांमध्ये गोधळांची स्थिती आहे. काही उमेदवार शंभर रुपयांच्या मुद्रांकावर शपथपत्र सादर करीत आहे.
या दोन्ही पद्धतीत कोण चूक कोण बरोबर असा प्रश्न आता समोर येत आहे. छाननीमध्ये कोणाचा अर्ज बाद होईल, हेही यामुळे स्पष्ट होऊ शकत नाही. नामनिर्देशनपत्रासोब ग्रामपंचायतीची कर, पाणीपट्टी थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र, शौचालय नसल्याचे प्रमाणपत्र, कंत्राटदार नसल्याचे प्रमाणपत्र, दोनपेक्षा अधिक अपत्य नसल्याचे प्रमाणपत्र, विवाहित महिलेला माहेर आणि सासरच्या नावाची एकच व्यक्ती असल्याचे प्रतिज्ञापत्र, कोणताही गुन्हा दाखल किंवा शिक्षा झाली नसल्याचे प्रमाणपत्र मुदतीत उपलब्ध करून देणे, नावे असलेली संपत्ती, मालमत्तेचे घोषणापत्र आदी कागदांचा समावेश आहे.
त्यातच राखीव जागेवर लढणाऱ्या उमेदवारांना समितीपुढे सादर करण्यासाठी वंशावळीचे प्रतिज्ञापत्र, दावा केलेल्या जातीचे पुरावे, शौचालय प्रमाणपत्र ग्रामपंचायतीच्या ठरावसह जोडायचे आहे. ही कागदपत्र जमा करताना उमेदवारांची चांगलीच धावपळ होत आहे. त्यातच सलग तीन दिवस सुटी आली आहे. यानंतर केवळ चार दिवस उमेदवारांना नामांकन दाखल करण्यासाठी मिळणार आहे. आधी ऑनलाइन व नंतर तहसील कार्यालयात अर्ज सादर करावा लागणार आहे. त्यामुळे आतापासूनच उमेदवारांची धावपळ सुरू आहे.
सातवी उत्तीर्णतेची अट
पाच मार्च 2020 च्या अधिनियमानुसार जानेवारी 1995 नंतर जन्मलेल्या व्यक्तीला निवडणूक लढण्यासाठी सातवी उत्तीर्ण असल्याची अट आहे. त्यामुळे सातवा वर्ग उत्तीर्ण नसेल तर संबंधिताला निवडणूक लढता येणार नाही.
जात वैधता प्रमाणपत्रासाठी दिलासा
आरक्षित प्रवर्गातून लढणाऱ्यांना जातवैधता प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव सादर केल्याची पोच बंधनकारक आहे. 25 ते 27 सलग तीन दिवस सुटी असल्याने कार्यालय बंद राहणार आहे. त्यामुळे उमेदवारांची अडचण होण्याची शक्यता होती. उमेदवारांना अडचण होऊ नये म्हणून सुटीच्या दिवशी तीनही दिवस जात वैधता कार्यालयात प्रस्ताव स्वीकारले जाणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.