वर्धा : शेतकऱ्यांसाठी यंदाचे वर्ष जरा अडचणीचेच निघाले आहे. प्रारंभी उत्तम दिसत असलेले सोयाबीन खोडकिडीने नष्ट झाले. यामुळे शेतकऱ्यांची आशा कपाशीवर होती. आता शेतात कपाशीचे बोंड फुटून शेत पांढरे दिसत आहे. पण, हा कापूस वेचण्यासाठी मजूर मिळत नसल्याचे शेतकऱ्यांची पंचाईत झाली आहे. शिवाय ढगाळ वातावरण दिसत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे.
सोयाबीनवर शेतकऱ्यांची बरीच आशा असते. परंतु यंदा जिल्ह्यात आलेल्या सततच्या पावसामुळे सोयाबीन किडीने हल्ला चढविला. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी उभ्या पिकात जनावरे सोडली; तर काहींनी रोटावेटर फिरविले. ज्या शेतात सोयाबीन उभे आहे, अशांना एकरी दोन ते तीन पोत्याचा उतारा येते अथवा नाही, अशी चिंता त्यांना सतावत आहे. यामुळे काढणीकरिता लागणारा खर्चही निघणार अथवा नाही, अशी चिंता शेतकऱ्यांना पडली आहे.
उशिरा आलेल्या पावसामुळे कपाशीचे चांगले उत्पादन होण्याची शक्यता आहे. काही भागात कपाशीची बऱ्यापैकी वाढ झाली आहे; तर काही भागात अतिपावसामुळे झाडांची वाढ खुंटली आहे. असे असले तरी या झाडांना बोंड पकडली असून त्यातून कपाशी फुटली आहे. शेतात कापूस दिसू लागल्याने शेतकऱ्यांकडून सीता दही पूजन करण्यात येत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांकडून कापूस वेचणे सुरू झाले आहे. काही ठिकाणी मजूर मिळत नाही, यामुळे अडचणी निर्माण होत आहे.
कापूस खरेदीबाबत सीसीआय आणि पणन महासंघाने अद्याप त्यांचे धोरण स्पष्ट केले नाही. यामुळे शेतकरी घरात कापूस ठेवावा की तो मिळेल त्या भावात काढायचा अशा विवंचनेत आहेत. कापूस खरेदीकरिता नोंदणी सुरू असली; तरी जिल्ह्यात वा राज्यात कापूस खरेदी करणाऱ्या यंत्रणेकडून किती केंद्र सुरू होणार, या संदर्भात संभ्रमावस्था आहे. याचा लाभ गावव्यापारी घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोयाबीन गेल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या व्यापाऱ्यांकडून आमिष देत त्यांची लुबाडणूक होणे अटळ असून शासनाने या संदर्भात निर्णय घेण्याची मागणी होत आहे.
काही दिवसांमध्ये कापूस वेचणीला सुरुवात होणार आहे. मात्र कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांना मजूर मिळणे मुश्कील झाले आहे. कापूस वेचणीची मजुरी दिवसाला ५०० रुपयांपर्यंत मजूर मागत असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. आधी बाहेरगावाहून मजूर येत होते. आता कोरोनामुळे मजूर येत नाही. त्याचा लाभ आत्ता गावातील मजुरांनी घेतला आहे.
उत्पादन खर्च वाढत असल्याने कापूस उत्पादक शेतकरी संकटास सापडला आहे. त्याच्यासमोर उत्पादन खर्च करण्याचा कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे त्याच्या मालाला सरकारने योग्य भाव देणे आवश्यक आहे. कापसाला सात हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला तर शेतकऱ्यांचा प्रश्न सुटेल, अन्यथा शेतकऱ्यांवर गंभीर संकट येईल, यात शंका नाही, असे मत शेतकरी व कामगार नेते राजानंद कावळे यांनी व्यक्त केले.
(संपादन : दुलिराम रहांगडाले)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.