गडचिरोली : चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांतील दारूबंदीवरून सध्या रणकंदन माजले असताना मंगळवारी (ता. १३) आयोजित पत्रकार परिषदेत राज्याचे मदत व पुनर्वसन तथा बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोली जिल्ह्यात इतक्या वर्षांपासून दारूबंदी आहे, तर व्यसनमुक्तीसाठी समाजसेवी संस्थांना कोट्यवधी रुपयांचा सरकारी निधी कशाला हवा, असा सवाल करीत दारूबंदी उठविण्याचे खंबीर समर्थन केले.
या पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी, अॅड. राम मेश्राम, युवक कॉंग्रेसचे कुणाल पेंदोरकर उपस्थित होते. केंद्र सरकारने लादलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात कॉंग्रेसच्या वतीने गुरुवारी (ता. १५) व्हर्चुअल सभा व रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. याची माहिती दिल्यानंतर पत्रकारांनी दारूबंदीसंदर्भात प्रश्न विचारताच विजय वडेट्टीवार आपल्या बेधडक शैलीत सुनावले.
सविस्तर वाचा - हा स्वतःचे अपयश दुसऱ्याच्या माथी मारण्याचा प्रयत्न; खासदार नवनीत राणांवर गंभीर आरोप
ते म्हणाले की, कायद्याने आदिवासींना दारूबंदी केलेली नाही. आदिवासी व्यक्ती दारू निर्माण करू शकतो व पिऊ शकतो. तो फक्त विक्री करू शकत नाही. मग आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात ही दारूबंदी फक्त गैरआदिवासींसाठीच आहे काय, असा प्रश्न त्यांनी केला. दारूबंदीमुळे बालगुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूतस्करी होत आहे, नक्षलवाद्यांशी लढण्यात व्यस्त असलेल्या पोलिसांचा शक्ती याकामी व्यर्थ घालविण्यात येत आहे.
जिल्ह्यात भेसळ दारू येत असल्याने आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. शिवाय दारूबंदी असलेल्या या जिल्ह्यात ड्रग्ससारखे अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणात वापरले जात आहेत. दारूबंदीची एवढी हौस असेल, तर चंद्रपूर, गडचिरोली, वर्धाच कशाला संपूर्ण महाराष्ट्रात दारूबंदी करून दाखवावी.
एकीकडे दारूबंदीचे फायदे सांगायचे व दुसरीकडे दारूचे व्यसन सोडविण्यासाठी सरकारकडे कोट्यवधी रुपये मागायचे. हे मागील सरकारने खपवून घेतले, तरी हे सरकार अशा कामांना आता पैसे देणार नाही, असेही त्यांनी निक्षून सांगितले. समाजसेवकांनी प्रबोधनाच्या माध्यमातून लोकांना दारूपासून परावृत्त करावे, दारूबंदीची जबरदस्ती करण्यात अर्थ नाही. आम्ही जी समिती गठित केली आहे ती या दारूबंदीचे फायदे, तोटे बघून योग्य तो निर्णय देईल, असेही ते म्हणाले.
जनमत काय आहे हे आम्ही जाणतो. लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या भावना आम्हाला माहिती आहेत. कायदे करणे, राबविणे, जनप्रश्न सोडविणे हे लोकप्रतिनिधींचे काम आहे. तथाकथित समाजसेवकांना ही समस्या खरच सोडवावी वाटत असेल तर त्यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरावे, जिंकावे आणि सत्तेच्या माध्यमातून आपल्याला हवे ते कायदे करावे, असाही सल्ला वडेट्टीवार यांनी दिला. कोरोना लॉकडाउनच्या काळात गडचिरोली जिल्ह्यात २०० ट्रकहून अधिक दारू अन्य राज्यातून आली, असेही ते म्हणाले.
संपादन : अतुल मांगे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.