नागपूर : एकीकडे पेट्रोल, डिझेलची दरवाढ कायम असतानाच दुसरीकडे खाद्य तेलासह हरभरा, तूर डाळीचे भावही सतत वाढत आहेत. गेल्या दोन महिन्यांत शेंगदाणा, सोयाबीनसह पामतेलाचे भाव हे लिटरमागे ७ ते १५ रुपयांनी वाढले आहेत. कोरोनाच्या संकटामुळे पुन्हा टाळेबंदी जाहीर केल्यानंतर किरकोळ दुकानदारांनी गेल्या आठवड्यात खरेदी केलेला माल आता संपू लागला आहे. त्याचा फायदा घेण्यासाठी काही किरकोळ व्यापाऱ्यांकडून जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ केल्याची माहिती पुढे आली आहे. कोरोनाच्या संकटामुळे आधीच सर्वसामान्य नागरिक त्रस्त असतानाच आता महागाईचा फटकाही सहन करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
कोरोना विषाणूची दुसरी लाट थोपविण्यासाठी २१ मार्चपर्यंत लॉकडाउन लागू केला. जीवनावश्यक वस्तूंची बाजारपेठ बंद करण्याचे आदेश दिले. त्यामुळेच गेल्या आठवड्यात किरकोळ दुकानदारांनी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी घाऊक बाजारात गर्दी केली होती. चार दिवसापासून घाऊक बाजार बंद असल्याने किरकोळ व्यापाऱ्यांकडील माल संपण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी, काही व्यापाऱ्यांकडून त्याचा फायदा घेण्यासाठी अधिकचे दर आकारण्यास सुरुवात केली. त्याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसू लागला आहे. काही दुकानदार माल संपल्याचे सांगू लागले आहेत. त्यामुळे ग्राहकांनाही जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी एका दुकानातून दुसऱ्या दुकांनामध्ये भटकंती करावी लागत आहे. त्यात ज्येष्ठ नागरिकांपासून ते लहान मुलांचा समावेश आहे. त्यातूनही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो असेही काही ग्राहकांचे म्हणणे आहे. प्रशासनाने मागील वर्षी कोरोनाचा उद्रेक झाला असताना काही अटींवर घाऊक बाजार सुरू ठेवण्याची परवानगी दिली होती. तशीच परवानगी आताही दिल्यास मालाची टंचाई जाणवणार नाही. सोबतच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिरावेल. पुरवठाही सुरळीत सुरू होण्यास मदत होईल असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात जीवनावश्यक वस्तूंची घाऊक बाजारपेठ सुरू होती. आता मात्र, जीवनावश्यक वस्तूंचा घाऊक बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे किरकोळ व्यापाऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंची टंचाई जाणवणार आहे. त्यामुळे काही व्यापारी याचा फायदा घेऊन भाववाढ करू शकतात.
-शिवप्रसाद सिंग, उपाध्यक्ष नागपूर इतवारी होलसेल किराणा मर्चंट असोसिएशन.
किरकोळ बाजारपेठा सुरू असताना घाऊक बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे किराणा, धान्यांसह जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा शहरात जाणवू लागला आहे. त्यामुळे प्रशासनाने जीवनावश्यक असलेल्या किराणा, धान्यांच्या घाऊक बाजारपेठा दिवसातून कमीत कमी चार ते पाच तास सुरू ठेवाव्यात. अथवा ऑड आणि इव्हन पद्धतीने सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.