विदर्भ

प्रदूषणाच्या कचाट्यात पांगोली पांगळी! पुराचा धोका वाढला

मुनेश्वर कुकडे/ राहुल हटवार

गोंदिया : एखाद्या गावाच्या मध्यातून वाहणारी नदी त्या परिसराची जीवनदायिनी असते. आपल्या अवतीभवतीचा परिसर अंगाखांद्यावर खेळवत ती साऱ्यांनाच सुजलाम् सुफलाम् करते. गोंदिया शहरातून वाहणारी पांगोली नदीही त्यापैकीच एक. परंतु स्थानिकांना हे वैभव टिकवता आले नाही. किंबहुना साऱ्यांनीच तिला ओरबाडण्याचेच काम केले. परिणामी आज ती आपल्या अस्तित्वाच्या अखेरच्या घटका मोजत आहे. नदी काठावर आणि नदीला मिळणाऱ्या नाल्याच्या परिसरात गोंदिया शहरालगत मोठमोठे राइस मिल्स, लाखवरील प्रक्रिया उद्योग उभे राहिले. या कारखान्यातील दूषित पाणी चोवीस तास नदीत सोडले जाते. त्यामुळे आता हे पाणी जनावरेसुद्धा पीत नाहीत. या प्रदूषित पाण्याने जमीन पडीक होत असल्याने शेतीसाठीही उपयोग होऊ शकत नाही.

नदीकाठच्या जमिनी पडिक झाल्याने त्या शेतकऱ्यांनी विकायला काढल्या. त्या जमिनी कारखानदारच विकत घेत आहेत. त्यामुळे भविष्यात प्रदूषणात वाढच होणार हे नक्की. आज पांगोली नदी आपल्या अस्तित्वाच्या खुणा शोधत आहे. प्रशासनाने वेळीच जागे होऊन नदीच्या पुनरुज्जीवनासाठी पुढाकार घेतला नाही तर तिचे गटार होण्यास वेळ लागणार नाही. स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि गोंदियावासीयांनी एकत्र येऊन पांगोलीला वाचविले पाहिजे. अन्यथा भावी पिढी पांगोलीच्या मारेकऱ्यांना माफ करणार नाही.

गोरेगाव तालुक्यातील तेढा गावातील सरोवरातून पांगोली नदीचा उगम झाला. गोंदिया तालुक्याला लागून असलेल्या खातिया गावाजवळ छिपिया येथे मध्य प्रदेश राज्यातील बालाघाट सीमारेषेवरील वाघ नदीत ती मिळते. गोंदिया व गोरेगाव या दोन्‍ही तालुक्यातील जवळपास ६० किलोमीटर क्षेत्र तसेच आमगाव तालुक्यातील जवळपास १५ किलोमीटर क्षेत्र या नदीने व्यापले आहे. गोंदिया, गोरेगाव तालुक्यांतील शेकडो शेतकरी नदीच्या पाण्यावर शेती पिकवतात. आमगाव तालुक्यातील काही गावांनाही या पाण्याचा लाभ होतो. यातून शेकडो कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालत असतो. मात्र, आजघडीला या नदीची अवस्‍था बिकट आहे. नदीत मोठ्या प्रमाणात निर्माल्य, मूर्ती विसर्जन केले जाते. एवढेच नव्हे तर नदीकाठावरील स्मशानभूमीत जळालेल्या मृतदेहांची राख नदीतच टाकण्यात येते. नदीच्या उगमापासून वाघ नदीतील विलयापर्यंत तिच्यात मोठ्या प्रमाणात विषारी रसायने मिसळली जात असल्याने ती प्रदूषित झाली आहे.

अवैध वाळूउपसा; नदीकाठावर वृक्षतोड

शहरातील कचरा मोठ्या प्रमाणात नदीत टाकला जात असल्याने नदीचे पात्र उथळ झाले आहे. नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या वाळू उपसा केला जातो. नदीकाठावर वृक्षतोड करण्यात आल्याने काठ नष्ट होत आहे. काठावर माती साचल्याने नदीची खोली कमी झाली आहे. पात्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. परंतु शासनाचे गाळ उपशाकडे दुर्लक्ष होते. याशिवाय नदीकाठावर राइस मिल, लाख कारखाने, टाइल्स कारखाने आदींना प्रशासनाने मंजुरी दिल्याने कारखान्यातील प्रदूषित पाणी नदीत मिसळते. प्रदूषित पाण्यामुळे शेतीचे नुकसान होत असून, नागरिक व जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

उथळ पात्रामुळे वस्ती धोक्यात

शंभर वर्षांपूर्वीपासून वाहणारी पांगोली नदी गोंदियाची जीवनवाहिनी आहे. पूर्वी नदीच्या पाण्याचा उपयोग शेतीसोबतच पिण्यासाठी केला जायचा. नदीकाठचे शेतकरी शेती पिकविण्यासाठी पांगोलीवर अवलंबून असायचे. वाढत्या अतिक्रमणामुळे नदीपात्र लहान होत गेले. नदीचे रूपांतर नाल्यात झाले. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचून आहे. पात्रात काही भागात दगड आहेत. त्यामुळे पाणी साचून न राहता सरळ मिळेल त्या मार्गाने वाहून जाते. नदी काठावरील झाडेही नष्ट झाली आहेत. पावसाळ्यात अधिक पाऊस झाल्यावर नदीत जमा होणारे पाणी कोणताही अटकाव नसल्याने सरळ गावांत, शेतकऱ्यांच्या शेतात, नागरी वस्तीत शिरते. त्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण होते. जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता निर्माण होते. नदी पात्रात नदीचे पाणी साठवून ठेवण्यासाठी तीन ते पाच किलोमीटर अंतरावर छोटे-छोटे बांध-बंधारे नाहीत.

पांगोली नदी गोंदियाच्या मध्यभागातून वाहणारी मुख्य नदी आहे. अनेक गावे, शेतीला ती सुजलाम सुफलाम करते. परंतु गेल्या काही दिवसांपासून नदीमध्ये प्रदूषण वाढले आहे. नदीचे खोलीकरण व साैंदर्यीकरण करणे गरजेचे आहे. अनेक ठिकाणी बंधारे निर्माण केल्यास शेतजमिनीला सिंचन तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. पर्यटनाला चालना मिळू शकते. परंतु, यासाठी निधीची आवश्यकता आहे. टप्प्याटप्प्याने नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.
जिल्हा परिषद कार्यालयातील अधिकाऱ्यांवर वचक नसल्याने त्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणाचा पांगोली नदी बळी ठरली. भरपूर निधी असताना विकासकामे का केली जात नाहीत, हा प्रश्न आहे. नदीचे खोलीकरण, साैंदर्यीकरण करणे गरजेचे आहे. तसे झाल्यास नदीला पुनरुज्जीवन मिळेल. तिच्या पाण्यावर अवलंबून असलेले शेकडो शेतकरी व अन्य नागरिकांचे जीवनमान उंचावेल. सिंचनाची सोय होईल आणि प्रदूषण टळेल.
- पंकज यादव, नगरसेवक, गोंदिया

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India reaction to Sheikh Hasina death sentence : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या फाशीच्या शिक्षेवर भारताची पहिली प्रतिक्रिया!

Kagal Nagarparishad Election : हसन मुश्रीफ-समरजित घाटगे एकत्र; कागल नगरपरिषद बिनविरोध करण्याचा संकल्प

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अर्ज भरायला जाताना ‘या’ उमेदवारास १०० पोलिसांचा बंदोबस्त; पहाटे ५.३० वाजता उमेदवार नगरपंचायतीत, अनगरची बिनविरोधाची ६५ वर्षांची परंपरा खंडीत

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Crime: सासरा आणि सूनेचं प्रेम जडलं; अडसर ठरणाऱ्या मुलाचा काटा काढला, मात्र एका चुकीनं बाप पोलिसांच्या जाळ्यात अडकला

SCROLL FOR NEXT