यवतमाळ : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी सोमवारपर्यंत (ता.15) रात्रीची संचारबंदी कायम ठेवली आहे. या काळात आठवडी बाजार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या शहरी व ग्रामीण क्षेत्रात उपाययोजना प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी नियम लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी रात्रीची संचारबंदी 15 मार्चपर्यंत वाढविली आहे. शनिवार सायंकाळी पाच वाजेपासून सोमवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत जिल्ह्यात संपूर्ण संचारबंदी घोषित केली आहे. शनिवार ते सोमवार दूध व दुग्धजन्य पदार्थ हे जीवनावश्यक, अत्यावश्यक सेवा सातही दिवस सुरू ठेवण्यास परवानगी आहे. दूध डेअरीसाठी सकाळी सहा ते रात्री नऊपर्यंत वेळ निश्चित करण्यात आली आहे. उर्वरित सर्व बाजारपेठ पाच दिवस सकाळी नऊ ते पाच या वेळेत सुरू ठेवण्याचे आदेश आहे. संचारबंदीच्या कालावधीमध्ये जिल्ह्यातील सर्व दवाखाने, औषधी दुकाने, पेट्रोलपंप, गॅस वितरण इत्यादी अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. लग्न सभारंभाकरीता 35 व्यक्तींना वधू वरासह परवानगी देण्यात आली आहे. मात्र, तहसीलदार तसेच मुख्याधिकाऱ्यांची परवानगी बंधनकारक आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.