धक्कादायक : टाटांकडून शेअर ट्रेडिंगसंदर्भात सेबीच्या नियमांचे उल्लंघन, सायरस मिस्त्रींचा आरोप

Tata-and-mistry
Tata-and-mistry

टा-मिस्त्री वादाला नवे वळण
टाटा समूहाचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांनी टाटा समूहावर गंभीर आरोप केले आहेत. टाटा ट्रस्टच्या काही संचालकांनी अनेक वेळा टाटा समूहातील कंपन्यांच्या संचालक मंडळातील अंतर्गत माहिती मागवली होती. सेबीच्या अनपब्लिश्ड प्राईस सेंसिटिव्ह इन्फॉर्मेशन नियमाचे टाटा ट्रस्टच्या काही ट्रस्टींनी उल्लंघन केले आहे, असा खळबळजनक आरोप सायरस मिस्त्री यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात केला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

टाटा समूहातील कंपन्यांची अंतर्गत माहिती टाटा ट्रस्टच्या काही ट्रस्टींना मार्गदर्शनाच्या नावाखाली देण्यामुळे टाटा समूहातील व्यवस्थापकीय कामकाजासंदर्भात गंभीर धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या माहितीचा गैरवापर होऊन टाटा समूहातील कंपन्यांच्या समभागधारकांच्या हितालाही मोठा धोका निर्माण झाला आहे, असे मिस्त्री यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटल्याची माहिती एका इंग्रजी संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

टाटा समूहाच्या चेअरमनपदावरून सायरस मिस्त्री यांची हकालपट्टी करण्यात आल्यानंतर त्यांनी एनसीएलटी आणि सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढाईसाठी धाव घेतली आहे. टाटा समूहाच्या होल्डिंग कंपनीतील सर्वात मोठा समभागधारक म्हणून त्या प्रमाणात आपल्याला समूहाच्या संचालक मंडळात स्थान दिले जावे अशी मागणीही मिस्त्री यांनी केली आहे.

१२ जूनला सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात मिस्त्री यांनी अनेक आरोप केले आहेत. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. टाटा समूहाचे चेअरमन रतन टाटा, नोशीर सूनावाला यांच्यासह इतर टाटा ट्रस्टच्या ट्रस्टींसंदर्भात सेबीद्वारे चौकशी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने द्यावेत अशी मागणीही सायरस मिस्त्री यांनी केली आहे. आपल्या प्रतिज्ञापत्रात मिस्त्रींनी टाटा समूहाच्या कंपन्यांमधील माहिती ट्रस्टींकडून कशी मिळवली जाते आहे याचा उल्लेख केला आहे. या सर्वच गैरप्रकारांसंदर्भात न्यायालयाने नोटीस दिली पाहिजे अशी मागणीही मिस्त्री यांनी केली आहे.

मिस्त्री यांनी गैरप्रकार रोखण्यासाठी पावले उचलली होती, असेही यात म्हटले आहे. टाटा समूहातील सर्व गैरप्रकारांसाठी टाटा ट्रस्टच्या ट्रस्टींना जबाबदार धरण्याची वेळ आली आहे. कंपन्यांच्या विविध बाबींमध्ये या ट्रस्टींची लुडबुड, मार्गदर्शनाच्या नावाखाली लाभ घेत जबाबदारी मात्र झटकण्याचे प्रकार टाटा ट्रस्टच्या ट्रस्टींकडून केले जात असल्याचा आरोप मिस्त्री यांनी अधोरेखित केला आहे.

टाटा समूहाच्या कामकाजावर बारीक लक्ष ठेवत त्याची निगराणमी केली पाहिजे अशी मागणीही मिस्त्री यांनी केली आहे. अनेक महत्त्वाचे आणि गंभीर निर्णय हे फारसा विचार न करता घेतले जात आहेत. त्यामुळे टाटा समूहावर परिणाम करू शकणाऱ्या निर्णयांवर बारकाईने लक्ष ठेवण्याची पद्धती विकसित करण्याची गरज आहे, असे मिस्त्री यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

आपल्याला टाटा समूहाच्या चेअरमनपदावरून दूर सारताना टाटा सन्सच्या ट्रस्टीजचा आपल्यावर विश्वास नसल्याचे कारण देण्यात आले होते, मात्र प्रत्यक्षात ते खरे नाही, असा दावाही मिस्त्री यांनी केला आहे. २४ ऑक्टोबर २०१६ ला सायरस मिस्त्री यांनी टाटा सन्सच्या चेअरमन पदावरून दूर सारण्यात आले होते. मिस्त्री यांना त्यांच्या निराशाजनक कामगिरीमुळे आणि त्यांच्यामुळे टाटा सन्सला तोटा होत असल्याचे कारण त्यावेळी टाटा समूहाकडून देण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com