गुंतवणूक करताना लक्षात घ्या 'या' टिप्स

गुंतवणूक करताना लक्षात घ्या 'या' टिप्स

गुंतवणूक करताना फक्त पैसा गुंतवून संपत्ती निर्माण होत नाही तर ती योग्य गुंतवणूक प्रकारात योग्य प्रमाणात करूनच होत असते. गुंतवणूक करताना परतावा आणि जोखीम या दोन महत्त्वाच्या मुद्द्यांना गुंतवणूकदारांनी लक्षात घेणे आवश्यक असते. त्यामुळे गुंतवणूक तज्ज्ञ नेहमीच वैविध्यपूर्ण गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. म्हणजेच एकाच गुंतवणूक प्रकारात गुंतवणूक न करता विविध प्रकारात (अॅसेट क्लास) गुंतवणूक करणे.

कारण प्रत्येक गुंतवणूक प्रकारात असणारी जोखीम वेगवेगळी असते आणि त्यानुसारच मिळणारा परतावादेखील वेगवेगळा असतो.

त्यामुळेच चांगला गुंतवणूक पोर्टफोलिओ बनवण्यासाठी  इक्विटी, डेट, सोने आणि रिअल इस्टेट या चारही ऍसेट क्‍लासचे योग्य प्रमाणात मिश्रण असायला हवे. गुंतवणूक करताना नेमक्या कोणत्या बाबी लक्षात घ्याव्यात ते पाहूयात,

१. बदलत्या काळात संपत्ती व्यवस्थापन हे प्रत्येकासाठी आवश्यक झाले आहे. त्यामुळेच प्रत्येक गुंतवणूकदाराने याबाबत सजग असले पाहिजे. संपत्ती व्यवस्थापन ही फक्त श्रीमंतांसाठीचीच बाब आता राहिलेली नाही. छोट्या स्वरुपात गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येकानेदेखील गुंतवणुकीचे योग्य व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. गुंतवणुकीच्या विविध प्रकारांचा समावेश आपल्या पोर्टफोलिओत करणे गरजेचे आहे. 

२. चांगला गुंतवणूक पोर्टफोलिओ बनवताना आपले वय, उत्पन्न, गरजा, उद्दिष्ट आणि जोखीम घेण्याची क्षमता लक्षात घेणे महत्त्वाचे असते. यासाठी आर्थिक सल्लागारांची मदत घेणे योग्य ठरते. त्यातूनच आपण योग्य आर्थिक नियोजन करू शकतो. पोर्टफोलिओमध्ये इक्विटी म्हणजे शेअर्स किंवा म्युच्युअल फंड, बॅंक मुदतठेवी, बॉंड्‌स, एनसीडी, सोने आणि रिअल इस्टेट अशा वेगवेगळ्या गुंतवणूक प्रकाराचा समावेश करणे श्रेयस्कर ठरते.

३. गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ तयार करताना फक्त परतावा मिळणाऱ्या बाबीच लक्षात घेणे योग्य नाही. यात विम्याचाही समावेश अत्यंत महत्त्वाचा आहे. विमा हा आपल्या आणि आपल्या कुटुंबियांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा असतो. त्यामुळेच प्रत्येकाने पुरेसा आयुर्विमा, आरोग्य विमा आणि अपघात विमा घेणे योग्य ठरते.

४. पोर्टफोलिओ बनवताना आपले वय, आर्थिक उद्दिष्टे, उत्पन्न आणि जोखीम क्षमता लक्षात घ्यायला हवी. तज्ज्ञ आर्थिक सल्लागार या बाबींची योग्य ती सांगड कशी घालायची याचे मार्गदर्शन करू शकतात. असे मार्गदर्शन घेऊन केलेले आर्थिक नियोजन भविष्यातील संपत्ती निर्मितीचा पाया घालते.

५. गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ बनवताना लक्षात घ्यायचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पोर्टफोलिओमधील वैविध्य. विविध गुंतवणूक प्रकारात गुंतवणूक करणे आवश्यक असते. यामुळे आपल्या गुंतवणूकीतील जोखीम कमी होते. कारण एकाच वेळी सर्व गुंतवणूक प्रकारातून चांगला परतावा मिळत नाही. जर गुंतवणुकीत वैविध्य असेल तर परतावा आणि जोखीम यातील संतुलन राखले जाते आणि गुंतवणुकदार अडचणीत येत नाही.

६. गुंतवणूक करताना नेहमी अल्पकालीन आणि दीर्घकालीन गरजा लक्षात घेणे आवश्यक आहे. यानुसार आपली आर्थिक उद्दिष्टे आखत गुंतवणूक केल्यास उत्तम आर्थिक नियोजन होत, भविष्यातील आर्थिक स्थैर्याचा मार्ग खुला होतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com