आफताब अमीन पुनावाला आणि श्रद्धा वालकर ही दोन नावं आता नवीन राहिलेली नाहीत. देशाच्या घराघरातून, गल्लीबोळातून ही नावं सर्रास ऐकू येतील. ज्या क्रूरतेनं आफताब पुनावालाने श्रद्धाचा खून केलाय, ते निश्चितच अमानवी आणि अमान्य आहे. त्या आफताबला शिक्षा होईलही, पण तुमच्या-माझ्यात लपलेल्या आफताबचं करायचं काय?
काय आहे श्रद्धा वालकर हत्याकांड?
श्रद्धा वालकर हत्याकांड (Shraddha Murder Case) आता सगळ्या देशाला माहित आहे. श्रद्धाचा लिव्ह इन पार्टनर आफताब अमीन पुनावाला याने रागाच्या भरात तिची हत्या केली आणि त्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. हे तुकडे त्याने विविध भागांमध्ये टाकले, जेणेकरून जंगली श्वापदं हे तुकडे खातील आणि सगळे पुरावे नष्ट होतील. पण हा गुन्हा फार काळ लपून राहिला नाही आणि दिल्ली पोलिसांनी आफताबला अटक केली आणि हे भयंकर सत्य समोर आलं. प्रत्येक तरुण मुलामुलीचे पालक या घटनेने हादरले. पण तरुणाईत मात्र या प्रकरणाबद्दल कमालीची असंवेदनशीलता दिसून आली.
हीच असंवेदनशीलता आपल्या सर्वांसमोरील एक चिंतेचं कारण आहे. उदाहरण सांगते, बसस्टॉपवर उभी असताना शेजारी महाविद्यालयीन मुलामुलींचा घोळका उभा होता. घोळक्यात एक मुलगा आणि एका मुलीत लाडीक भांडणं सुरू होती, त्यात मुलगा तिला म्हणाला, "त्या आफताबने ३५ तुकडे केले, मी ३६ करीन बरं का! माझं ऐकलं नाहीस तर...", या वाक्यावर त्या मुलीसह सात आठ जणांच्या त्या घोळक्याने हसून, टाळ्या देऊन प्रतिक्रिया दिली. हे केवळ एक उदाहरण आहे. खालील मीम्स पाहा -
तुमच्या माझ्यातल्या अशा आफताबचं काय?
हे मीम्स पाहिल्यानंतर माझ्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहिला. देशातल्या एका तरुणीचा निर्घृणपणे खून होतो, तिच्याच वयाचा एक तरुण हा खून करतो. हे इतकं संवेदनशील प्रकरण आणि तरुणाई अशा पद्धतीने त्याची चेष्टा करते? आफताबची विकृती आपल्यातही आलीये की विकृती आधीच होती, फक्त सोशल मीडियामुळे ती समोर आलीये? केवळ एक आफताब समोर आला, तुमच्या माझ्यातल्या अशा आफताबचं काय?
तज्ज्ञ काय म्हणतायत?
याविषयी सोशल मीडिया तसंच डिजीटल माध्यमांच्या अभ्यासक मुक्ता चैतन्य यांच्याशी चर्चा केली. ही विकृती पूर्वीपासूनच आपल्यात होती, फक्त सोशल मीडियामुळे ती व्यक्त करण्यासाठी प्लॅटफ़ॉर्म उपलब्ध झाला आहे. चूक माध्यमाची नाही, माध्यमं ही तटस्थ असतात. ती वापरणाऱ्या माणसाच्या वृत्तीनुसार, ती माध्यमं वापरली जातात. माणसांना आजकाल बोलण्याचं तारतम्य, सद्सद्विवेकबुद्धी नाही, आणि त्यामुळे अशा पद्धतीने असंवेदनशीलपणे मजकूर पोस्ट केला जात आहे, असं मत मुक्ता चैतन्य यांनी व्यक्त केलं आहे.
तसंच पूर्वी केवळ दोन चार माणसांमध्ये अशी मूर्खपणाची विधानं किंवा असंवेदनशील टिप्पण्या केल्या जायच्या. पण आता सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म उपलब्ध झाल्याने जाहीरपणे हे बोललं जातं. कोणता विषय गंभीर आहे, कोणत्या विषयाची गंमत केली तरी चालेल, यामध्ये एक पुसटशी रेषा आहे, त्याची मर्यादा लक्षात घेण्याची समज आज सोशल मीडिया युजर्समध्ये राहिलेली नाही आणि म्हणून श्रद्धा खून प्रकरणावर होणाऱ्या या मीम्समुळे, असंवेदनशील पोस्ट्समुळे 'हे चालतं' ही वृत्ती वाढीस लागत आहे, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली आहे.
पण मग सोशल मीडिया युजर म्हणून आपण काय भूमिका घ्यावी?
मुक्ता चैतन्य यांनी सद्सद्विवेकबुद्धीचा वापर करून सोशल मीडिया वापरण्याचा सल्ला दिला आहे. अशा प्रकारे असंवेदनशील पोस्ट्स, मीम्स, फोटो दिसल्यास आपण काय करू शकतो, याविषयी त्यांनी सल्ला दिला आहे. श्रद्धा खून प्रकरण हे एक उदाहरण आहे. इतरही काही खुनाची, बलात्काराची प्रकरणे असतील किंवा गंभीर गुन्हे असतील, अशा विषयांवर भाष्य करताना किंवा वाचताना खालील गोष्टी लक्षात घ्याव्यात -
१. आपली तरुण मुले, घरातले, संपर्कातले सोशल मीडिया युजर्स या सगळ्यांना प्रकरणाचं गांभीर्य समजावून सांगा. सातत्याने चर्चा व्हायला हवी.
२. अशा प्रकरणाची चेष्टा करणारा कोणताही मजकूर फॉरवर्ड करू नका. जिथून हा मजकूर आलेला आहे, त्यालाही खडसावून सांगा.
३. आपल्याला या गोष्टी आवडत नाहीत, हे सातत्याने नोंदवत राहा. ज्याप्रमाणे वाईट गोष्टींचा परिणाम होतो, त्याप्रमाणे अशा विचारांचाही चांगला परिणाम होऊ शकतो. त्यामुळे विरोध नोंदवत राहा.
४. संवेदनशील प्रकरणांवर आक्षेपार्ह किंवा असंवेदनशील पद्धतीने भाष्य करणं हा गुन्हा आहे, हे लक्षात घ्या. माहिती तंत्रज्ञान कायदा समजून घ्या आणि समजावून सांगा. अशा प्रकारचा आशय तुम्ही फॉरवर्ड जरी केलात, तरी तुम्ही त्याच्याशी सहमत आहात, असं मानलं जातं आणि तुमच्यावर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.
५. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम अशा प्रत्येक सोशल मीडियाचे काही ठराविक नियम आहेत. नियमांत न बसणारी पोस्ट असेल आणि आपण ती रिपोर्ट केली, तर या प्लॅटफॉर्म्सला ती पोस्ट हटवावी लागते. त्यामुळे अशा प्रकारचा आक्षेपार्ह असंवेदनशील मजकूर हटवण्यासाठी तो रिपोर्ट करा.
श्रद्धा वालकर खून प्रकरण हे एक उदाहरण आहे, या खून प्रकरणाच्या अनुषंगाने तुमच्या आमच्या सारख्या अनेकांचा असंवेदनशील चेहरा समोर आला आहे. केवळ असे मीम्स बनवण्यातच नव्हे, तर तुम्ही-मी कधीतरी असा एखादा मीम पाहून आपण हसले असू, हसत हसत शेजाऱ्याला ते मीम दाखवलं असेल, जवळच्या मित्र मैत्रिणीला फ़ॉरवर्ड केलं असेल. त्यामुळे आफताब ही विकृती कुठे ना कुठे तरी, कमी जास्त प्रमाणात आपल्यातही दडलेली आहे. आता आपल्याला ही विकृती कायमची मुळापासून उखडून टाकायची आहे, जेणेकरून पुन्हा कोणत्याही श्रद्धावर छिन्नविच्छिन्न होण्याची वेळ येणार नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.