
Periodic Table: 'डार्विनचा सिद्धांत'नंतर आता 'आवर्त सारणी' पुस्तकातून गायब! NCERTनं कायमचा हटवला धडा
नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून शैक्षणिक पुस्तकांमधून महत्वाच्या संशोधनासंबंधीचे धडे हटवण्याचा कार्यक्रम सुरुच ठेवला आहे. NCERTनं नुकताच चार्ल्स डार्विनच्या उत्क्रांतीवादासंबंधीचा धडा इयत्ता नववी आणि दहावीच्या पुस्तकातून हटवला होता. त्यानंतर आता आवर्तसारणीबाबतचा धडा दहावीच्या पुस्तकातून हटवला आहे.
यामुळं आता पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत. इंडिया टुडेनं याबाबत वृत्त दिलं आहे. (After Darwin evolution theory NCERT removes periodic table from Class 10 textbooks)
नॅशनल काऊन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अॅण्ड ट्रेनिंगनं (NCERT) खरंतर यापूर्वीच अर्थात कोविडच्या महामारीदरम्यान तर्कशुद्धतेच्या नावाखाली आवर्तसारणीचा धडा हटवला होता. त्यावेळी त्यांनी स्पष्टीकरण देताना हा बदल तात्पुरता असल्याचं म्हटलं होतं.
पण आता NCERTनं आता हे धडे कायमचे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बराच काळ हे अतिमहत्वाचे संशोधनपर धडे शालेय अभ्यासक्रमातून वगळ्याबद्दल संशोधक आणि शिक्षकांनी काळजी व्यक्त केली होती. (Latest Marathi News)
NCERTनं केलेल्या नव्या बदलानुसार आता दहावीनंतर बारावीचं शिक्षण घेताना जे विद्यार्थी रसायनशास्त्र (केमिस्ट्री) हा विषय निवडतील. त्यांच्याच अभ्यासक्रमात या आवर्तसारणीचा समावेश असेल.
पण अकरावी आणि बारावीच्या पुस्तकांमध्ये हा बदल होईपर्यंत दहावीच्या विद्यार्थ्यांना आवर्तसारणीचा धडा शिकता येईल, असंही सांगण्यात आलं आहे. भारतात इयत्ता दहावी हे शाळेचं शेवटचं वर्ष असतं त्यामुळं या वर्षात मुलांना विज्ञानाचा विषय हा कम्पलसरी विषय असतो. (Marathi Tajya Batmya)
धडे वगळ्यामागं तर्कशुद्धविचार?
NCERTनं आवर्तसारणीसंबंधीचा पाचव्या क्रमांकाचा धडा आणि डार्विनच्या उत्क्रांतीवादाच्या सिद्धांताचा ९ व्या क्रमांकाचा धडा अभ्यासक्रमातून वगळण्याचा निर्णय घेतला होता. या धड्यांमध्ये जीवनाचा उगम अर्थात पृथ्वीचं जीवन, मानवी उत्क्रांती आणि वंशावळ यांचा समावेश आहे.
पण हे धडे वगळण्याच्या निर्णयामागील विशिष्ट तर्क स्पष्टपणे सांगितलेला नसला तरी, NCERTनं सुरू केलेल्या अभ्यासक्रमाच्या तर्कशुद्धीकरण प्रक्रियेचा हा भाग असल्याचं सांगितलं जात आहे.
कोविडच्या काळात वगळले धडे
कोविडच्या काळात शिक्षण क्षेत्रात मोठा अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळं NCERTनं डिसेंबर 2021 ते जून 2022 या कालावधीत अभ्यासक्रम तर्कशुद्धीकरणाचा नवा कार्यक्रम हाती घेतला. त्यानुसार, विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचं ओझं कमी करणं आणि दूरस्थ शिक्षणाकडं वळण्यासाठी अभ्यासक्रमात कपातीचा निर्णय घेण्यात आला होता.
याचा भाग म्हणून इयत्ता 6 ते 12साठी सुमारे 30 टक्के अभ्यासक्रम हटविण्यात आला. याअंतर्गतच आवर्त सारणी आणि डार्विनच्या सिद्धांताशी संबंधित विषयांसह काही विषय तात्पुरते वगळण्यात आल्याचं NCERTनं स्पष्ट केलं होतं.