wang chi
wang chi

58 वर्षांपासून भारतात राहतोय चिनी सैनिक, दोन देशांमधील संघर्षावर म्हणाला...

बालाघाट (मध्य प्रदेश), ता. 18 : भारत-चीनमध्ये झालेल्या 1962 मधील युद्धात मी चुकून भारतीय सीमेत दाखल झालो. तेव्हापासून मी येथेच स्थायिक झालो. तिरोडी गावाने मला भरपूर प्रेम दिले. एवढे प्रेम की माझे लग्न पण येथेच झाले आणि मी संसारही केला, हे बोल आहेत गेली 58 वर्षे भारतात राहणाऱ्या चिनी सैनिकाचे. वांग छी असे त्यांचे नाव. 

भारत-चीनमधील वाढत्या तणावावरही त्यांनी खेद व्यक्त केला. दोन्ही देशांनी वाद न वाढविता बंधुभावाने राहावे, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. भारत-चीनमधील 1962 च्या युद्धादरम्यान चुकून ते भारतीय सीमेत दाखल झाले. भारतीय सैन्याने त्यांना ताब्यात घेऊन तब्बल सात वर्षे विविध कारागृहांत ठेवले. त्यानंतर त्यांना मध्य प्रदेशमधील बालाघाट जिल्ह्यातील तिरोडी गावात राहण्याचे आदेश पोलिसांनी दिले. त्यांना दरमहा शंभर रुपये पेंशन देण्यात येत होती. 

वांग छी यांनी सुरवातीला गावातील इंदरचंद जैन यांच्याकडे पिठाच्या गिरणीवर काम केले. त्यांच्या कामावर जैन यांचा पूर्ण विश्‍वास होता. 1974 मध्ये जैन यांनी वांग यांचा गावातील एका मुलीशी विवाह करून दिला. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. भारतीय मुलीशी विवाह केल्यामुळे सरकारने त्यांची पेंशन बंद केली. त्यानंतर काही पैसे जमवून त्यांनी गावात किराणा दुकान खोलले आणि आपल्या संसाराचा गाडा हाकला. या कालावधित त्यांनी चीनमध्ये परत जाण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले होते. 2013 मध्ये त्यांनी आपल्या परिवारासह चीनला जाण्यासाठी व्हिसा तयार केला होता. 2017 आणि 2018 मध्ये ते दोन वेळा चीनला जाऊन आले आहेत. 2 मार्च 2020 ला त्यांनी चीनला जाण्यासाठी व्हिसा काढला; मात्र लॉकडाउनमुळे त्यांना जाता आले नाही.

वांग यांचा मुलगा विष्णू म्हणाला, "बाबांना आपल्या परिवारासह चीनला जायची इच्छा आहे. चीनला माझे तीन काका आहेत. तेथे शेती आहे. इंदरचंद जैन यांनी बाबांना बहादूर असे नाव ठेवले आहे. त्याच नावाने ते गावात प्रसिद्ध आहेत. आमचा जन्म भारतातच झाला आहे. माझ्या मोठ्या भावाचे वयाच्या 25 व्या वर्षी निधन झाले. बहिणीचे लग्न झाले आहे. बाबांव्यतिरिक्त इतर सर्वांना भारतीय नागरिकता मिळाली आहे. एवढ्या वर्षांत गावाने आम्हाला भरभरून प्रेम दिले. कोणतीही तुच्छ वागणूक आम्हाला मिळाली नाही. सध्या सीमेवर चाललेला वाद लवकर संपला पाहिजे. दोन्ही देशांतील नागरिकांनी बंधुभावाने राहावे, हीच इच्छा आहे.

वागं छी म्हणाले की, मला तिरोडी गावाने खूप मदत केली. एवढे प्रेम दिले की मी लग्न करून माझा संसार केला. घर झाले. स्वतःचा व्यवसाय करून सुखात जगत आहे. त्यामुळे दोन्ही देशांनी आपसातील वाद मिटवून गुण्यागोविंदाने राहावे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com