नवी दिल्ली - देशात नोव्हेंबर अखेरपासून कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी आतापर्यंत शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये 11 बैठका झाल्या. मात्र तरीही काहीच मार्ग निघालेला नाही. दरम्यान, कृषी कायदे मागे घ्यावेत या मागणीवर ठाम असलेल्या शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढली. यावेळी आंदोलक लाल किल्ल्यावर गेल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. तसंच काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळणही लागलं होतं.
आंदोलनात झालेल्या हिंसाचार प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असून 200 हून अधिक जणांना ताब्यातही घेतलं आहे. तसंच शेतकऱ्यांना भडकवल्याप्रकरणी दीप सिद्धू आणि लक्खा सिधाना यांच्यावर कारवाईची शक्यता आहे. या ट्रॅक्टर रॅलीवेळी ट्रॅक्टर पलटी झाल्यानं एका तरुणाचा मृत्यू झाला. नवरीत असं तरुणाचं नाव असून त्यानं दोन वेळा आंदोलनात सहभाग घेतला होता. प्रजासत्ताक दिनी तो आंदोलनात सहभागी झाला मात्र घरी परतलाच नाही.
नवरीत दोन वर्षांपूर्वी भारतात परतला होता. आणखी एक वर्षाने तो पुन्हा ऑस्ट्रेलियाला जाणार होता. दरम्यान, शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नवरीत दोनवेळा दिल्लीत दाखल झाला. केंद्राने केलेल्या कृषी कायद्याविरोधात त्यानं आंदोलनात सहभाग घेतला. ते रद्द करण्याच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीवेळी ट्रॅक्टर पलटी झाला. त्यातच नवरीतचा मृत्यू झाला. नवरीतच्या मृत्यूने त्याच्या कुंटुंबावर मोठा आघात झाला आहे.
उत्तर प्रदेशातील रुद्रपूरजवळच्या रामपूर इथं तो राहत होता. ऑस्ट्रेलियात स्टडी व्हिसावर दोन वर्षे होता. तिथं मनसित कौरशी त्यानं लग्नही केलं होतं. त्याच्या रिसेप्शनसाठी भारतात परतला होता. तो IELTS ची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकला नव्हता. त्यामुळे त्याला गावातच रहावं लागलं. तसंच नवरीतच्या कुटुंबाला माहितीसुद्धा नव्हतं की तो आंदोलनात सहभागी होण्यासाठी जात आहे. नातेवाईकांकडे जातोय असं सांगून तो बाहेर पडला होता.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.