रांची : भारतीय जनता पक्षाने झारखंडमध्ये सत्ता गमावली हे स्पष्ट झाले असतानाच आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे महत्वाचे नेते आणि मुख्यमंत्री रघुबर दास यांचा पराभव झाला आहे. रघुबर दास यांच्या पराभवाबरोबर भारतीय जनता पक्ष हा झारखंडमध्ये दुसऱ्या स्थानावर फेकला गेला असून मुख्यमंत्र्यांचा पराभव हा भाजपसाठी मोठा झटका आहे.
भाजपने हा पराभव मान्य केला असून रघुबर दास हे जमशेदपूर पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. १९९५ पासून ते या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. त्यांचा या मतदारसंघात एकदाही पराभव झालेला नाही. त्यांचा पराभव भाजपचेच बंडखोर उमेदवार सरयू राय यांनी केला आहे. सरयू राय हे जमशेदपूर पश्चिम मतदारसंघाचे आमदार आहेत.
झारखंडमध्येही पराभव; काय चुकलं भाजपचं?
रघुवर दास यांनी झारखंड या राज्याचा डिसेंबर २०१४ मध्ये मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला होता. दास हे झारखंडचे पहिले गैर आदिवासी मुख्यमंत्री होते. डिसेंबर २०१४ मधील झारखंड विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवले व रघुवर दास ह्यांची मुख्यमंत्रीपदासाठी निवड करण्यात आली होती. दरम्यान, १९९५ सालापासून आमदार असणारे दास डिसेंबर २००९ ते मे २०१० दरम्यान झारखंड राज्याचे उपमुख्यमंत्रीही होते.
झारखंडमध्ये काँग्रेस आघाडीचा धुरळा; तर भाजपचा पालापाचोळा
दरम्यान झारखंड विधानसभेच्या निकालाचे चित्र स्पष्ट झाले आहे. पहिल्या कलानंतर झारखंड भाजपच्या हातून निसटल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. राज्यातील ८१ जागांसाठी मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरू झाली. सुरूवातीच्या काळातच भाजप पिछाडीवर पडलेली पाहायला मिळाली. पहिल्या कलानंतर काँग्रेसने आघाडीने बहुमतासाठी लागणारा ४१ जागांचा आकडा पार केला आहे. दुपारी चार वाजता काँग्रेस आणि मित्रपक्ष ४४ जागांवर आघाडीवर आहेत तर भाजपा २७ जागांवर आघाडीवर आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.