सीएनजीच्या दरात प्रतिकिलो 8 रुपयांची कपात करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. त्याशिवाय, स्वयंपाकांसाठी वापरण्यात येणाऱ्या पीएनजी गॅसच्या दरात 5 पाच रुपये प्रति एससीएमची कपात करण्यात आली आहे.
मागच्या २४ तासांमध्ये कोरोनाचे नवीन ९२६ रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात ४ हजार ४८७ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
आशिष देशमुख यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आलेली आहे. काँग्रेसच्या शिस्तपालन समितीकडून ही नोटीस धाडण्यात आलीय. नोटिशीमध्ये त्यांना तीन दिवसांमध्ये उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले. देशमुख यांनी पटोलेंबद्दल वादग्रस्त विधान केलेलं होतं.
टायर झिजलेल्या वाहनांना समृद्धी महामार्गावर जाण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. अपघात रोखण्यासाठी आरटीओंनी असा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या आमदारांचा अयोध्या दौरा निघाला आहे. आज ठाण्यातील कार्यकर्ते अयोध्येला निघाले असून एकनाथ शिंदे ठाणे स्थानकात दाखल झाले आहेत.
सातारा : कराडजवळ सहापदरीकरणाचं काम सुरू झालं असून कोल्हापूर नाक्यावरील पूल काही दिवसांपूर्वीच पाडण्यात आला. या कामामुळं कोल्हापूर, पुणे, सांगलीकडं होणारी वाहतूक विलंबानं सुरु आहे. त्यातच आता शनिवार आणि रविवार अशी जोडून सुट्टी असल्यामुळं आज शुक्रवारपासूनच (ता. 7) रस्त्यावर वाहनांच्या लांबलचक रांगा पहायला मिळाल्या. खंडाळा घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प होत आहे. शनिवार-रविवार अशी जोडून सुट्टी असल्यामुळं लोक फिरायला जायचा प्लान आखत आहेत, त्यामुळं पुढील दोन दिवस पुणे-बंगळुरु महामार्ग (Pune-Bangalore Highway) ठप्प होण्याची शक्यता आहे.
बॉलीवूड अभिनेत्री अमीषा पटेल विरोधात रांचीच्या एक सिव्हील कोर्टाने वॉरंट जारी केलं आहे. अमीषा आणि तिचा बिझनेस पार्टनर क्रुनाल विरोधात फसवणूक आणि चेक बाउन्स प्रकरणी गुरुवारी वारंट जारी केलं आहे. तक्रार दाखल करणारे अजय कुमार सिंह झारखंडचे चित्रपट निर्माते आहेत. त्यांनी अमीषा पटेल आणि तिच्या पार्टनरविरोधात केस दाखल केली होती.
भारतीय जनता पार्टीनं सावरकर गौरव यात्रेचं आयोजन केलं असल्यानं या यात्रेचा निषेध माजी आमदार लक्ष्मण माने यांनी केला असून साताऱ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारी एक दिवसीय लक्षणीय उपोषण आंदोलन सुरू केलं आहे. सावरकर हे राष्ट्रभक्त नसून राष्ट्रद्रोही होते, असं माने यांनी सांगत सावरकरांनी शिवरायांबद्दल अवमानकारक लेखन केलं असून सावरकरांनी ब्रिटिशांना 6 पत्रं लिहली होती. ते ब्रिटिशांची 60 रुपये पेन्शन घेत असल्याची टीका लक्ष्मण माने यांनी सावरकरांवर केली आहे.
बिहार विधान परिषद निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकत भाजप मोठा पक्ष ठरला आहे. ७५ सदस्य संख्या असलेल्या विधान परिषदेत भाजपच्या आता २४ जागा झाल्या आहेत. तर जेडीयूची २४ जागांवरून २३ अशी घसरण झाली आहे. ५ जागांसाठीच्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालात भाजपने एक जागा कायम ठेवली आहे. तर एक जागा जिंकली आहे.
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षाचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांना एका ओळीत राजीनामा पत्र पाठवून त्यांनी काँग्रेस सोडल्याच्या काही आठवड्यांनंतर ही घटना घडली. किरण रेड्डी यांनी संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या उपस्थितीत भाजपचे सदस्यत्व घेतलं. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ते म्हणाले, मी काँग्रेस पक्ष सोडेन याची कल्पनाही केली नव्हती, पण आता परिस्थिती अशी झाली आहे की मला पक्ष सोडावा लागला आहे.
सोलापूरमधील माढ्याचे माजी आमदार विनायकराव पाटील यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूरच्या भिसे महाविद्यालयात प्राचार्य पदाच्या भरतीत बनावट कागदपत्रे दिल्याच्या आरोपाप्रकरणी कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिसे महाविद्यालयाचे सभासद राजाभाऊ जयवंत सुसलादे यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रार दिली आहे.
केरळमधील कोझिकोडमधील एलाथूरजवळ चालत्या ट्रेनमध्ये एकाने आपल्या सहप्रवाशाला पेटवून दिले होते. यामध्ये जळलेल्या व्यक्तीसोबतच आठ सहप्रवासी जखमी झाले होते. यातील तिघांचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेत केंद्रीय गुप्तचर यंत्रणा आणि महाराष्ट्र एटीएसच्या संयुक्त पथकाने कारवाई करत महाराष्ट्रातील रत्नागिरीतून संशयित आरोपी शाहरुख सैफी याला ताब्यात घेतले होते. यानंतर त्याला कोर्टासमोर हजर केले असता त्याला १४ दिवसांची न्यायालयीने कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान त्याच्यावर येथील सरकारी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे सध्या दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात तिहार तुरूंगात आहेत. या घोटाळ्यातील मनी लॉड्रिंग प्रकरणी सिसोदिया यांची सीबीआय आणि ईडी चौकशी सुरू आहे. दरम्यान, सिसोदिया यांनी तुरुंगातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून देशवासियांना पत्र लिहले आहे. या पत्रात सिसोदिया यांनी पंतप्रधान कमी शिकलेले असणे देशासाठी अत्यंत धोकादायक असल्याचे म्हणत, पीएम मोदींच्या शिक्षण आणि सुशिक्षितपणावर प्रश्न उपस्थित केला आहे.
गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवाराच्या चाचपणीला सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी भाजप नेते आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानं पुणे लोकसभा मतदारसंघ रिक्त झाला आहे. या जागेवर आता पोटनिवडणुकीसाठी हालचालींना वेग आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपकडून पुणे लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि माजी खासदार संजय काकडे यांच्या नावाची चर्चा आहे.
मुंबईतील मढ परिसरातले अनधिकृत फिल्म स्टुडिओ पाडण्याचं काम सुरू आहे. एक हजार कोटींचे स्टुडिओ बेकायदेशीर असल्याचा निर्णय राष्ट्रीय हरित लवादानं गुरुवारी दिला. आम्ही फक्त तात्पुरतं बांधकाम करण्यास परवानगी दिली होती. मात्र, त्याजागी कायमस्वरुपी स्टुडिओ उभारण्यात आले, असं हरित लवादानं आपलया निर्णयात म्हटले आहे. प्रतीकात्मक कुदळ आणि फावडं घेऊन सोमय्या पाडकामाच्या ठिकाणी पोहोचले. आदित्य ठाकरे आणि मुंबई शहराचे माजी पालकमंत्री अस्लम शेख यांच्या आशीर्वादानंच हे स्टुडिओ उभे राहिले असा आरोप सोमय्यांनी केला आहे.
नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूनं थैमान घालायला सुरुवात केलीये. गेल्या चार दिवसांत कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये 100 टक्के वाढ झाली आहे. आरोग्य मंत्रालयानं सांगितलं की, कोरोनाच्या नवीन रुग्णांचा आकडा 6 हजारांच्या पुढं गेला आहे. गेल्या 24 तासांत कोरोना संसर्गाचे 6,050 रुग्ण आढळले आहेत. काल म्हणजेच, गुरुवारी नवीन रुग्णांची संख्या 5,335 होती.
गाझियाबाद : भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे हिच्या मृत्यू प्रकरणातील (Akanksha Dubey Death Case) मुख्य आरोपी आणि गायक समर सिंह (Singer Samar Singh) याला यूपी पोलिसांनी (UP Police) अटक केलीये. पोलिसांनी काल रात्री गाझियाबादच्या नंदग्राम पोलीस स्टेशन (Nandgram Police Station) परिसरातून समर सिंहला ताब्यात घेतलं. गाझियाबादचे पोलीस डीसीपी निपुण अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, समर सिंहला चार्म्स क्रिस्टल सोसायटी राजनगर येथून ताब्यात घेतलं.
चक्रीय वार्याची स्थिती सक्रिय झाल्याने देशातील काही राज्यांसह महाराष्ट्रात देखील अवकाळीचे सावट निर्माण झाले आहे. दरम्यान, आज (दि. ७) पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, नांदेडला आज ऑरेंज अलर्ट (Weather Forecast देण्यात आला असून, मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्हयात ढगाळ वातावरण असल्याची माहिती देखील भारतीय हवामान विभागाने दिली आहे.
कर्नाटक पोलिसांनी (Karnataka Police) हसन जिल्ह्यातील (Hassan District) 85 वर्षीय महिलेवर झालेल्या बलात्कार प्रकरणाचा छडा लावलाय. पोलिसांनी दोषीला देखील अटक केलीये. 32 वर्षीय मिथुन कुमार असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. हसन जिल्ह्यातील अर्सिकेरे तालुक्यातील यारेहल्ली गावात 2 एप्रिल रोजी ही घटना उघडकीस आली. एका वृद्ध महिलेचा विवस्त्र मृतदेह शेतात सापडला, तिचं डोकं ठेचण्यात आलं होतं.
पुढील दोन ते तीन दिवस राज्यात काही ठिकाणी तुरळक, हलका पाऊस तर काही ठिकाणी विजांच्या गडगडाटसह वादळी पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ के.एस.होसाळीकर यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. त्यांनी दिलेल्या माहिती नुसार पुणे शहरात व जिल्ह्यांत 7, 8, 9 तारखेला विजांच्या कडकडासह शहरात हलक्या पावसाची शक्यता आहे. यात प्रामुख्याने 7 तारखेला सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यात विजांच्या गडगडाटसह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
व्हेनिस : फ्लोरिडाच्या गल्फ कोस्टजवळ (Florida Gulf Coast) गुरुवारी एक विमान (Plane Crash) कोसळलं. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला. स्थानिक पोलिसांनी ही माहिती दिलीये. विमान अपघातात ठार झालेल्यांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. सध्या पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेतले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, विमानानं व्हेनिस विमानतळावरून उड्डाण केलं होतं आणि पश्चिमेकडील मेक्सिकोच्या आखातात ते कोसळलं. व्हेनिसचे पोलीस (Venice Police) अधिकारी अँडी लीसेनरिंग यांनी सांगितलं की, 'घटनास्थळी उपस्थित लोकांनी 911 वर कॉल करून विमान अपघाताची माहिती दिली.'
महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा कहर पाहिला मिळत आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णांमध्ये भर पडत आहे. गेल्या २४ तासांमध्ये राज्यात ८०३ नवे करोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्याच्या घडीला राज्यात ३ हजार ९८७ सक्रिय रूग्ण आहेत. तर एकूण तिन जणाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे आता चिंतेत वाढ झाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 9 एप्रिलला अयोध्या दौरा करून प्रभू रामचंद्राचं दर्शन घेणार आहेत. या दौऱ्यावेळी मुख्यमंत्री शिंदे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.