सध्या देशात निवडणुकीची तयारी जोरदार सुरू आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी राजस्थानमध्ये काँग्रेसवर निशाणा साधत काँग्रेस सत्तेवर आल्यास लोकांच्या मालमत्तेची मुस्लिमांमध्ये वाटणी करेल, असे म्हटले आहे. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी 2006 मध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या एका वक्तव्याचा उल्लेख केला होता. मनमोहन सिंग म्हणाले होते की, देशाच्या मालमत्तेवर मुस्लिमांचा पहिला हक्क आहे, असा दावा पंतप्रधान मोदींनी केला आहे.
पीएम मोदींच्या या वक्तव्यानंतर आता पुन्हा एकदा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे २००६ मधील ते वक्तव्य चर्चेत आले आहे. अकराव्या पंचवार्षिक योजना आणि विकासावर चर्चा करण्यासाठी माजी पंतप्रधानांनी 9 डिसेंबर 2006 रोजी राष्ट्रीय विकास परिषदेच्या (NDC) 52 व्या बैठकीला संबोधित केले होते. यादरम्यान, त्यांनी आपल्या भाषणात समाजातील सर्व मागासलेल्या आणि अल्पसंख्याक घटकांना विकासात समान वाटा मिळावा यासाठी त्यांच्या सक्षमीकरणाबद्दल बोलले होते.
राष्ट्रीय विकास परिषदेच्या बैठकीला संबोधित करताना मनमोहन सिंग म्हणाले होते की, आमचा सामूहिक प्राधान्यक्रम अतिशय स्पष्ट आहे. कृषी, सिंचन आणि जलसंपदा, आरोग्य, शिक्षण, ग्रामीण पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय, अल्पसंख्याक, महिला आणि मुले यांच्या उत्थानासाठीचे कार्यक्रम हे आमचे प्राधान्य आहेत. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी नव्याने योजना तयार करण्याची गरज आहे. अल्पसंख्याकांना, विशेषत: मुस्लिमांना विकासात समान सहभाग मिळावा यासाठी नवीन योजना कराव्या लागतील. संसाधनांवर त्यांचा पहिला हक्क असायला हवा.
ते म्हणाले होते की, नियोजन आयोग अशा कार्यक्रमांचा निश्चितपणे आढावा घेईल, ज्यांचा आता काहीही संबंध नाही. परंतु आगामी काळात केंद्राची संसाधने वाढतील आणि राज्यांच्या जबाबदाऱ्या वाढतील या वस्तुस्थितीपासून आपण सुटू शकत नाही.
पुढे ते म्हणाले होते की, 11 वी पंचवार्षिक योजना अशा टप्प्यावर सुरू होत आहे. जेव्हा आपल्या देशाच्या आर्थिक क्षमतेमुळे आपल्या संस्थापकांची स्वप्ने साकार करणे शक्य झाले आहे. समृद्ध आणि न्याय्य भारताचे स्वप्न. एक भारत जो सर्वसमावेशक आहे. असा भारत जो प्रत्येक नागरिकाला त्यांच्या कार्यक्षेत्रात लक्षणीय प्रगती करण्याची संधी देतो. ते स्वप्न 11 व्या पंचवार्षिक योजनेने नक्कीच पूर्ण होईल. ते
त्यावेळीही मनमोहन सिंग यांच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता. यानंतर 10 डिसेंबर रोजी पंतप्रधान कार्यालयाकडून (पीएमओ) स्पष्टीकरण जारी करण्यात आले होते. या स्पष्टीकरणात पंतप्रधानांनी अल्पसंख्याकांच्या सक्षमीकरणाबाबत बोलल्याचं म्हटलं होतं. मात्र ते चुकीच्या संदर्भात मांडण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (रविवारी) राजस्थानमधील बांसवाडा येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना काँग्रेस सत्तेत आल्यास लोकांच्या संपत्तीचे मुस्लिमांमध्ये वाटप करेल, असे म्हटले होते. ते म्हणाले की, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारने देशाच्या मालमत्तेवर पहिला हक्क मुस्लिमांचा असल्याचे म्हटले होते.
ही शहरी-नक्षलवादी मानसिकता माझ्या माता-भगिनींचे मंगळसूत्रही सोडणार नाही, असे पंतप्रधान मोदींनी सभेत सांगितले. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात म्हटले आहे, माता-भगिनींकडील सोन्याचा हिशोब घेऊ,नंतर ती संपत्ती अल्पसंख्याकांमध्ये वाटून टाकू, काँग्रेस सरकार सत्तेवर असताना त्यांनी देशाच्या मालमत्तेवर पहिला हक्क मुस्लिमांचा असल्याचे म्हटले होते.याचा अर्थ ते संपत्ती गोळा करून कोणाला वाटणार? ज्यांना जास्त मुले आहेत त्यांच्यामध्ये ही मालमत्ता वितरीत केली जाईल.
ते घुसखोरांना संपत्ती वाटून देतील, तुमच्या कष्टाचे पैसे घुसखोरांना देणार का? तुम्हाला हे मान्य आहे का?, असंही त्यांनी म्हचलं आहे. पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
पंतप्रधान मोदींचे हे दोन्ही दावे खोटे असल्याचे म्हटले जात आहेत. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात हिंदू-मुस्लीम असा उल्लेख नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. यासोबतच, पक्षाने एक तथ्य तपासणी(Fact Cheak) देखील शेअर केलं आहे ज्यात हे स्पष्ट केले आहे की, मनमोहन सिंग यांनी कधीही देशाच्या संसाधनांवर मुस्लिमांचा पहिला हक्क असल्याचे म्हटले नाही.
मनमोहन सिंग यांचे वक्त्यावर भाजप नेते वारंवार टीका करत आहेत, ते 18 वर्षांपूर्वी केलेल्या विधानाशी संबंधित आहे. 9 डिसेंबर 2006 रोजी मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान म्हणून राष्ट्रीय विकास परिषदेला संबोधित केले होते. त्यांनी इंग्रजीत भाषण केले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.