हैदराबाद : तेलंगण विधानसभा निवडणुकीसाठी दोन दिवसांवर मतदान आलेले असताना राज्यातील प्रादेशिक पक्षांसह राष्ट्रीय पक्ष रणनीती आखत आहेत. हैदराबादच्या नऊ जागांवर लढणाऱ्या एमआयएम पक्षाला दोन जागांवर कडवी लढत मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. नामपल्ली आणि मलकपेट येथे एमआयएमच्या उमेदवारांना बरीच मेहनत करावी लागणार आहे.
दरम्यान, एमआयएम पक्षांच्या आमदारांची संख्या फारशी नसली तरी मुस्लिम समुदायावर या पक्षाचा पगडा राहिल्याने विधानसभेत विशेषत: जुन्या हैदराबादच्या भागात ओवेसी यांच्या पक्षाला नेहमीच महत्त्व राहिले आहे. ओवेसी यांनी विधानसभेत ‘मामू’ (केसीआर) यांच्याविरुद्ध एमआयएम निवडणूक लढवत असल्याचे सांगत असताना ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होऊ शकतात, असेही भाकीत केले.
आयोगाने तेलंगण सरकारच्या रयतु योजनेचे निधी वितरण थांबविण्याबद्दल ओेवेसी यांनी आक्षेप घेतला. ते म्हणाले, काँग्रेसने या निधी वाटपाबद्दल घेतलेला आक्षेप चुकीचा असून ती एक सक्रिय योजना आहे आणि ती अनेक वर्षांपासून सुरू आहे. काँग्रेसला शेतकऱ्यांचे कल्याण नकोय, असा आरोप ओवेसी यांनी केला. भाजपच्या संकल्पपत्रावर देखील ओवेसी यांनी हल्लाबोल केला.
‘एमआयएम’चे महत्त्व
तेलंगण आणि विशेषत: हैदराबादच्या राजकारणात ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाला विशेष स्थान आहे. या पक्षाने मुस्लिम समुदायाचे प्रतिनिधित्व करत असल्याचे चित्र समोर आणले आहे. एमआयएमकडून अनेक जागा लढण्याचा दावा केला जात असला तरी तेलंगणाच्या विधानसभेत एमआयएमची आकडा उल्लेखनीय राहिलेला नाही. हैदराबाद शहरातील चारमिनार, चंद्रयानगुडा, नामपल्ली, याकुतपुरा, बहादुरपुरा, मलकपेट आणि कारवा येथून लढणाऱ्या एमआयएमने यावेळी आणखी दोन जागा राजेंद्रनगर आणि ज्युबली हिल्स येथे मैदानात शड्डू ठोकला आहे. तेलंगणाच्या राजकारणात एवढ्या कमी जागा असूनही ओवेसी यांच्या पक्षाला महत्त्व कशामुळे आहे, हे जाणून घेण्यासाठी सामाजिक समीकरण जाणून घ्यावे लागेल. २०११ च्या जनगणनेनुसार राज्यात १३ टक्के मुस्लिम समुदाय असून बृह्ननहैदराबाद भागात मुस्लिम समुदायाची संख्या ४३.४५ टक्के आहे. त्याचवेळी राज्यातील ४५ जागांवर मुस्लिम मतदारांत निकालाचा कौल ठरविण्याची क्षमता आहे.
नामपल्लीत काँग्रेसचे आव्हान
हैदराबादच्या सात जागांवर हुकूमत गाजवणाऱ्या ओवेसी यांना नामपल्ली आणि मलकपेट येथे काँग्रेसकडून जबरदस्त आव्हान मिळत आहे. नामपल्लीत फिरोज खानकडून (काँग्रेस उमेदवार) धक्का दिला जाऊ शकतो. नामपल्लीत बीआरएसचे नेते केटीआर यांची रॅली घेण्यामागचे हेच कारण सांगितले जात आहे. अर्थात हैदराबाद येथे एमआयएम अजिंक्य राहण्यामागे जुन्या हैदराबादेतील बोगस मतदान देखील कारणीभूत असल्याचे बोलले जाते. अनेक मृतांची नावे मतदारयादीत असल्याचे स्थानिक मतदारांकडून सांगितले जात आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.