
एका रिपोर्टमध्ये फेसबुक आणि भाजपची भारतात युती असल्याचं म्हटलं आहे. यामध्ये त्यांनी भारतात भाजप नेत्यांनी फेसबुकवर केलेल्या पोस्ट आणि त्याकडे फेसबुकने केलेलं दुर्लक्ष यांचा आलेख मांडला आहे.
फेसबुक पडलं तोंडावर; भाजप नेत्यांच्या वादग्रस्त पोस्ट काढून टाकल्या
वॉशिंग्टन - अमेरिकेतील वर्तमानपत्र वॉल स्ट्रिट जर्नलने त्यांच्या एका रिपोर्टमध्ये फेसबुक आणि भाजपची भारतात युती असल्याचं म्हटलं आहे. यामध्ये त्यांनी भारतात भाजप नेत्यांनी फेसबुकवर केलेल्या पोस्ट आणि त्याकडे फेसबुकने केलेलं दुर्लक्ष यांचा आलेख मांडला आहे. एकीकडे ट्विटरने कारवाई केली पण फेसबुकने मात्र काहीच हालचाल केली नसल्याचंही रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, वॉल स्ट्रिट जर्नलने फेसबुकला याबाबत विचारल्यानंतर फेसबुकने काही पोस्ट डिलिट केल्या आहेत. मात्र यामध्ये हेट स्पिचचा रूल लागू करून कारवाई करणं टाळल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
तेलंगणातील नेते टी राजा सिंग यांनी फेसबुकचा वापर करून अनेक हेट स्पीच दिली. त्यातील एकामध्ये असाही उल्लेख केला होता की, जे मुस्लिम गायी मारतात त्यांना हिंदूंनी तसंच मारलं पाहिजे. यासोबत त्यांनी एक फोटोही शेअर केला होता. याविरोधात कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला होता. तसंच अमेरिकेत रिचर्ड स्पेन्सरवर जशी बंदी घातली तशी कारवाई करण्याबाबत चर्चा झाली होती. फेसबुकने टी राजा सिंग यांच्या काही पोस्ट डिलिट केल्या तसंच जेव्हा वॉल स्ट्रिट जर्नलने आक्षेप घेतला होता तेव्हा असंही सांगितलं होतं की, सिंग यांचे अकाउंट अधिकृत आणि व्हेरिफाइड काढून घेण्यात येईल.
हे वाचा - भारतात फेसबुकची भाजपशी अघोषित 'युती'; अमेरिकेतील वर्तमानपत्राचा धक्कादायक रिपोर्ट
फेसबुकची देशांनुसार पॉलिसी
फेसबुकने अमेरिका आणि इतर देशांच्या तुलनेत जर्मनीत कठोर भूमिका घेत हेट स्पीचविरोधात पॉलिसी लागू केली आहे. दुसरीकडे सिंगापूरमध्ये फेक न्यूज बाबत नोटिफिकेशन देण्याचा ऑप्शन दिला जाईल असंही म्हटलं आहे. तर व्हिएतनाममध्ये सरकार आणि कंपनीमध्ये असलेल्या अडचणींवर तोडगा काढत काही पॉलिसी तयार केल्या. फेसबुकसाठी भारत मोठी बाजारपेठ आहे. एक अब्जपेक्षा जास्त लोकसंख्या असलेला भारत एकमेव असा देश आहे. चीनची लोकसंख्या भारतापेक्षा जास्त असली तरी तिथं फेसबुकवर बंदी आहे. फेसबुक त्यांचा उद्योग भारतात विस्तारण्यासाठी देशातील टेलिकॉम ऑपरेटर्ससोबत भागिदारी करून मोठी गुंतवणूक करत आहे.
दास यांच्या भूमिकेबाबत शंका
दास यांनी 2011मध्ये फेसबुकमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्या भारतात, दक्षिण आणि मध्य आशियाच्या पब्लिक पॉलिसी विभाग प्रमुख होत्या. फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर कोणता कंटेंट असावा हे त्या ठरवतात असं एका माजी फेसबुक कर्मचाऱ्याने सांगितलं. दास यांची टीम भाजप नेत्यांनी मुस्लिमांनी कोरोना पसरवला किंवा लव्ह जिहाद सारख्या पोस्ट केल्या तरी त्याकडे दुर्लक्ष करत असे असा दावाही कर्मचाऱ्याने केल्याचं वॉल स्ट्रीट जर्नलने म्हटलं आहे. निवडणुक संदर्भातील प्रकरणांमध्ये दास यांच्याकडून भाजपधार्जिणी भूमिका घेतली जात होती, असाही आरोप कर्मचाऱ्यांनी केला.
हे वाचा - भारताच्या स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानच्या वेबसाईटवर 'जय श्रीराम'!
गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात निवडणुकांच्या आधी फेसबुकने एक मोठा निर्णय घेतला. त्यानुसार पाकिस्तान लष्कराशी संबंधित आणि काँग्रेसशी संबंधित पेजेस काढून टाकली होती. पण त्यामध्ये भाजपबाबत फेक न्यूज असल्यानं पेजेस काढून टाकली ही माहिती उघड केली नव्हती असाही खळबळजनक खुलासा कर्मचाऱ्यांनी केला आहे.
अनंतकुमार हेगडेंची पोस्ट केली डिलिट
भाजपचे आणखी एक नेते अनंतकुमार हेगडे यांनीही मुस्लिमांविरोधात एक पोस्ट केली होती. त्यामध्ये कोरोना जिहाद असं मह्टलं होतं. फेसबुकच्या नियमानुसार ही पोस्ट डिलिट होणं गरजेचं होतं. त्याविरोधात कारवाई व्हायला हवी होती मात्र तसं झालं नाही. दुसरीकडे ट्विटरने मात्र हेट स्पीच असल्याचं सांगत कारवाई केली होती. ट्विटरवने हेगडे यांचं अकाउंट सस्पेंड केलं होतं. फेसबुकने यावर कोणतीच अॅक्शन गेतली नाही तेव्हा वॉल स्ट्रीट जर्नलकडून विचारणा करण्यात आली. तेव्हा त्यातील काही पोस्ट काढून टाकण्यात आल्या.
हे वाचा - कमला हॅरिस यांच्यापेक्षा भारतीयांचं माझ्यावर जास्त प्रेम- डोनाल्ड ट्रम्प
कपिल मिश्रांचा व्हिडिओ हटवला
फेब्रुवारीमध्ये भाजप आमदार कपिल मिश्रा यांनी थेट पोलिसांनाचा थेट वॉर्निंग दिली होती. त्यात त्यांनी म्हटलं होतं की, पोलिसांनी जर नागरिकत्व कायद्याला विरोध करणाऱ्या आंदोलकांविरुद्ध कारवाई केली नाही तर माझे समर्थक ते काम करतील. हा मेसेज व्हायरल झाल्यानंतर मेसेजनंतर मोठा हिंसाचार झाला होता. मार्क झुकरबर्ग यांनीही मिश्रा यांच्या पोस्टचा उल्लेख केला. मात्र, त्यावेळी नाव घेतलं नव्हतं. कंपनीने नंतर व्हिडिओ पोस्ट डिलिट केली होती.
दरम्यान, या कारवाईनंतर मिश्रा यांनी ते हेट स्पीच नव्हतं. तसंच मला किंवा भाजपला फेसबुकने प्राधान्य दिलं असाही प्रकार झाला नाही असे सांगितले. फेसबुकने गुरुवारी मिश्रा यांच्याही काही पोस्ट वॉल स्ट्रिट जर्नलच्या कमेंटनंतर हटवल्या. मिश्रा यांनी व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर पुढच्या महिन्याभरात त्यांच्या फेसबुक पेजच्या फॉलोअर्समध्ये प्रचंड वाढ झाली होती. संबंधित पोस्टवर तात्काळ कारवाई केली असती तर फेसबुकच्या भूमिकेबाबत संशय निर्माण झाला नसता.
Edited By - Suraj Yadav