जळगाव : मरणोत्तर ‘देहदान’ तशी नवी कल्पना. परंतु, ती आता काळाची गरज झाली आहे. नेत्रदान, मूत्रपिंड दान यानंतर ‘देहदान’ या विषयावर सखोल, चर्चात्मक विचार करण्याची वेळ आली आहे.
देहदानाचा खरा उपयोग होतो. तो वैद्यकीय महाविद्यालयातील शरीररचना शास्त्र विभागातील विद्यार्थ्यांना. (100 applications for organ donation and actually 5 organ donation jalgaon news)
मात्र जळगाव शहरासह जिल्ह्यात दरवर्षी अनेक नागरिक देहदानाचे अर्ज भरून देतात. मात्र गेल्या दोन वर्षात ‘देहदानाद्वारे केवळ ५ मृतदेह जिल्हा रुग्णालय व शासकीय रुग्णालयात (जिएमसी) आले आहेत.
भावी डॉक्टर या दान केलेल्या देहाचे विच्छेदन करून शास्त्रोक्त माहिती मिळवितात. शव विच्छेदनाद्वारे मिळणाऱ्या अनुभवाचा उपयोग त्यांना रुग्णांवर निदान, उपचार, शस्त्रक्रिया करण्यासाठी होतो. शरीर रचना शास्त्राचा अभ्यास हा वैद्यकीय व्यवसायाचा पाया आहे.
काही ठिकाणी मृत शरीरातील काही अवयवांचा जिवंत व्यक्तीत रोपण शस्त्रक्रियेसाठी उपयोग होतो. तसेच शवविच्छेदनासाठी या विद्यार्थ्यांना बेवारस मृतदेहांवर अवलंबून राहावे लागते. पण, त्यांचे प्रमाण अत्यल्प असते. त्यामुळे विद्यार्थ्यांची गरज पूर्ण होत नाही.
त्यामुळे एका मृतदेहावर वाजवीपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शवविच्छेदन करावे लागते. दरवर्षी प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयास सरासरी १५ ते १९ मृतदेह लागतात. ही गरज पूर्ण होणे कठीण होते. अपघाती मृत्यू किंवा नैसर्गिक मृत्यू यांच्यावर उत्तरीय तपासणी करावी लागते.
त्यामुळे त्यांचा उपयोग शवविच्छेदनासाठी होत नाही. त्यामुळे मृतदेहाचा तुटवडा जाणवतो. ही गरज भरून काढण्यासाठी व समाजाचे उतराई होण्यासाठी मरणोत्तर देहदानाच्या चळवळीस गती मिळणे आवश्यक आहे.
देहदान चळवळीस जळगाव जिल्ह्यातून अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. काही ज्येष्ठ नागरिक व समाजसेवक स्वतःहून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपलब्ध असलेले मरणोत्तर देहदानासंबंधीचे इच्छापत्र भरून देतात.
असे मृतदेह स्वीकारण्याचे सर्व अधिकार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास असतात. यास कोणतीही न्यायालयीन किंवा पोलिस परवानगी लागत नाही. परंतु, मृतदेहाबरोबर नैसर्गिक मृत्यूचा दाखला रजिस्टर डॉक्टरांचा किंवा नगरपालिकेचा असणे आवश्यक आहे.
मृतदेह हा संबंधित महाविद्यालयात नेण्याची व्यवस्था फक्त सहा तासांत व्हावयास पाहिजे. अशा मृतदेहात मानेच्या शिरेवाटे फॉर्मोलिन, ग्लिसरीन टाकून मृतदेह अनेक महिने सुरक्षित ठेवता येतो. मृत्यूनंतर देह पुरून किंवा जाळून नष्ट करतात. त्याऐवजी जर त्याचा उपयोग भावी पिढीला शिक्षणासाठी व विज्ञानाच्या प्रगतीसाठी झाला, तर ते खऱ्या अर्थाने पुण्याचे काम आहे.
"जिल्हा शासकीय रूग्णालय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या दोन वर्षात केवळ पाच जणांनी देहदान केले आहे. देहदान केलेल्या व्यक्तीचा कुटुंबीयांना त्याची माहिती नसते. देहदान का करावे ? याची माहिती नसते. आम्ही देहदानाबाबत नेहमीच जनजागृती करतो." - डॉ. अब्दुर राफे (जीएमसी)
देहदान न करण्याची कारणे अशी
* देहदान करण्याबाबत कुटूंबिंयाना माहिती नसणे
* देहदान केलेल्या व्यक्तीचा मृत्यू इतर ठिकाणी होणे
* देहदानाचे महत्व न पटणे
* जनजागृतीचा अभाव
असे मृत्यूचे कारण असल्यास देहदान स्वीकारले जात नाही.
गुप्तरोग (एड्स, सिफीलीस), रक्तातील जंतुसंसर्ग (सेप्टीसेमिया), रक्ताची कावीळ (हिपॅटायटीस-ब्री), संक्रमीत क्षयरोग (ऑक्टिव्ह टी.बी.), धनुर्वात (टिटॅनस), मेडिको-लिंगल केसेस (एम.एल.सी.).
देहदानासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (०२५७- २२३२३९०), डॉ. अब्दुर राफे अब्दुल वहीद शरीररचनाशास्त्र विभाग (९९६०३७५०६६), उमेश पाटील, प्रयोगशाळा तंत्रज्ञ (९९६००६५६१६) यांच्याशी साधावा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.