

Jalgaon News : मोहिदे (ता. चोपडा) व होळनांथे (ता. शिरपूर) या दोन गावांना जोडणाऱ्या अनेर नदीवरील पूल धोकादायक बनला आहे. या पुलाला संरक्षणाच्या दृष्टीने आवश्यक असलेले कठडेच नाहीत. त्यामुळे लहानमोठे अपघात होऊन अनेक जण गंभीर जखमी झाले असून काहींचा तर मृत्यू झाल्याच्या घटनना घडल्या आहेत.
या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. हा प्रकार नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळण्यासारखा असल्याचा आरोप मोहिदे (ता. चोपडा) येथील सरपंच शोभाबाई पाटील व स्रीरोग तज्ज्ञ डॉ. पवन पाटील यांनी केला आहे.
मोहिदे व होळनांथे या दोन गावांना जोडणारा हा पूल २००६ मध्ये मंजूर झाला होता. जवळपास परिसरातील २५ गावांशी संबंध येणाऱ्या या पुलाची सद्यःस्थितीत अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. कठडे नसलेल्या या पुलावर जागोजागी लहानमोठे खड्डे पडून लोखंडी सळ्या बाहेर आल्या आहेत. (bridge over aner river become dangerous jalgaon news)
या संदर्भात मोहिदेच्या सरपंच शोभाबाई पाटील व स्री रोग तज्ज्ञ डॉ. पवन पाटील यांनी धुळे येथील सार्वजनिक बांधकाम कार्यालयात दोन तीनदा लेखी तक्रारी केल्या. वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करूनही त्यांच्या तक्रारीची दखलच घेतली जात नसल्याचा अनुभव दोन्हींना आला आहे.
अनेकांचे गेले बळी
रात्री अपरात्री पुलावरून जाताना समोरील वाहनांच्या लाईटांचा प्रकाश डोळ्यांवर आल्याने अनेक जण पुलावरून खाली व नदीत पडल्याच्या दहा ते बारा घटना घडल्या आहेत. यामुळे अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत तर काही जण मृत्यूमुखी देखील पडले आहेत. शुक्रवारी (ता. २४) पहाटे वसंत डुमन पाटील हे पुलावरून जात असताना समोर येणाऱ्या मोटरसायकलच्या हेडलाईटचा प्रकाश त्यांच्या डोळ्यांवर आला.
त्यामुळे त्यांना पुढचा रस्ता न दिसल्याने व पुलास कठडे नसल्याने त्यांच्या तोल जाऊन ते पुलावरून खाली पडून गंभीर जखमी झाले. प्रशासन अजून किती घटना घडण्याची वाट पाहत आहे? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष
अनेर नदीवरील पूल हा दोन तालुक्यांच्या दरम्यान येत असल्याने काम कोण करणार? यामुळे या पुलाची साधी दुरुस्ती देखील करण्यासाठी लोकप्रतिनिधी दखल घेत नाही. विशेष म्हणजे, दोन्ही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडे त्या त्या भागातील नागरिकांनी मागणी करुन त्यांनी दखल घेतली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे किमान सुरक्षिततेच्या दृष्टीने पुलाला कठडे बसविण्यासंदर्भात तरी गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.
धोकेदायक पुलाने घेतलेले बळी
अनेर नदीवरील या पुलाने आतापर्यंत अनेकांचे जीव घेतले आहेत. यात जितेंद्र पाटील (सनपुले), बशीर खाटीक (मोहिदे), जानकीराम पाटील (अजंतीसीम), लता चांभार (मोहिदे), भोई (होळनांथे) या व्यक्ती मयत झालेल्या आहेत. तर रतीलाल खंडू पाटील, शिवाजी पाटील, वसंत पाटील यांच्यासह इतरही अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
"अनेर नदीवरील पुलाला कठडे करावेत, पुलाची तातडीने डागडुजी करुन खड्डे बुजवावेत, यासाठी आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे यापूर्वीच लेखी तक्रार केलेली आहे. संबंधित अधिकाऱ्यांना तोंडी देखील सांगितले आहे. मात्र, कोणीही दखल घेतलेली नाही. अजून किती जीव घेणार? लोकप्रतिनिधी यांनीही लक्ष घालावे." - शोभाबाई पाटील, सरपंच ः मोहिदे (ता. चोपडा)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.