India Vs Ireland 3rd T20 : भारत आणि आयर्लंड यांच्यातील तिसरा आणि अंतिम टी 20 सामना एकही चेंडू न टाकता पावसामुळे रद्द करावा लागला. भारताने पहिले दोन सामने जिंकले असल्याने मालिका 2 - 0 अशी खिशात टाकली. डब्लिंगमध्ये पावसाचा मारा इतका तीव्र होता की साधी नाणेफेक देखील झाली नाही.
याचबरोबर आजच्या सामन्यात भारतीय संघ व्यवस्थापन शाहबाज अहमद आणि जितेश शर्मा यांना टी 20 आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची संधी देण्याची शक्यता होती. मात्र पावसामुळे त्यांच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणावर पाणी फिरले.
भारत आणि आयर्लंड यांच्यातील तिसरा टी 20 सामना आज डब्लिंग येथे खेळवण्यात येणार होता. मात्र नाणेफेकीपूर्वीत पावसाने हजेरी लावल्यामुळे नाणेफेक देखील होऊ शकली नाही. नाणेफेक न झाल्याने दोन्ही संघांनी आपली प्लेईंग 11 देखील जाहीर केली नव्हती.
परंतु, भारताने मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून मालिका आधीच खिशात घातली होती. त्यामुळे आज भारत आपल्या संघात मोठे बदल करणार असे वाटत होते. संघासोबत असलेला अष्टपैलू खेळाडू शाहबाज अहमद आणि विकेटकिपर जितेश शर्मा यांना टी 20 पदार्पणाची संधी मिळेल अशी अपेक्षा होती.
मात्र ही संधी पावसाने हिरावून घेतली. पावसाने उसंत न दिल्याने अखेर पंचांना सामना रद्द करावा लागला. जवळपास 11 महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतलेला भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराहला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला आहे.
भारतीय संघ आता 30 ऑगस्टपासून आशिया कप खेळणार आहे. जवळपास सहा महिन्यांनी आशिया कपमध्ये भारताचा संपूर्ण वनडे संघ उतरणार आहे. ही वर्ल्डकपची रंगीत तालीम असून भारताचा पहिलाच सामना हा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तासोबत 2 सप्टेंबरला होईल.
आशिया कपमध्ये जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा यासोबतच केएल राहुल आणि श्रेयस अय्यर हे दुखापतीतून सावरलेले खेळाडू देखील खेळणार आहेत. त्यांना आपला मॅच फिटनेस सिद्ध करण्याची आशिया कप ही एक सुवर्ण संधी आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.