Mahashivratri 2024 : हिंदू धर्मात अनेक पौराणिक गोष्टी सांगितल्या जातात. समुद्रातून अमृत बाहेर काढलं होतं ती गोष्टही तुम्ही ऐकली असेलच. देव आणि दानवांच्यात अमृत मिळवण्यासाठी झालेले युद्ध, त्यात मोहिनी रूप घेतलेले श्री विष्णू आणि विष प्राशन केलेले महादेवांची गोष्ट आहे.
त्यावेळी समुद्र मंथनातून बाहेर पडलेलं अमृत कलश आजही आपल्याला पहायला मिळतो. तो नदीमध्ये अदृश्य स्वरूपात आहे. तो कोणत्या मंदिरात आहे. याबद्दल आपण माहिती घेऊयात.
समुद्र मंथन केल्यावर त्यातून अनेक माणके, हिरे मोती बाहेर पडले. जेव्हा अमृताचा कलश बाहेर आला. तेव्हा तो घेऊन दानव पळू लागले आणि तो कलश मिळवण्यासाठी देवही त्यांच्या पाठी पळू लागले. तेव्हा सर्व देव भगवान विष्णूंकडे गेले. अमृताचा कलश परत मिळवावा, तो चुकीच्या हातात जाऊ नये अशी याचना सर्व देवांनी विष्णूंना केली.
तेव्हा भगवान विष्णू मोहिनी या एक सुंदर स्त्रीचे रूप घेऊन त्या ठिकाणी गेले. मोहिनी रूपावर राक्षस भाळले अन् त्या स्त्रीला त्यांनी अमृत कलश देऊन टाकला. नेवासे गावात हे अमृत वाटपाचे काम सुरू केले. मोहिनीने अमृत वाटपाला सुरूवात केली. तेव्हा सर्वात आधी देवांना अमृत वाटप केलं जात होते. अन् राक्षसांना भलतच काहीतरी दिल जात होतं.
ही गोष्ट राक्षस असलेल्या राहूच्या लक्षात आली. तेव्हा त्याने देवांचे रूप घेऊन तो तिथे पंगतीत जाऊन बसला. आणि जेव्ह अमृत त्याच्या हातात आले तेव्हा तो पिण्यासाठी तोंडाला लावणार तोच भगवान श्री कृष्णींनी सुदर्शन चक्राने त्याचे शीर धडापासून वेगळे केले.
राहूचं शीर उडवल्यानंतर देव-दानवांच्यात पुन्हा युद्ध सुरू झालं. या भांडणात हे अमृत प्रवरा नदीमध्ये सांडलं. प्रवरा नदीत सांडल्यानंतर अमृत प्रवाहीत व्हायला लागलं. तेव्हा महादेवांनी काळभैरव देवांना आदेश दिला की, हे काळभैरवा तुम्ही पुढे जाऊन नदीत एक कुंड बनवून त्यामध्ये हे अमृत साठवून ठेव.
भगवंत काळभैरवही आदेशाचे पालन करत प्रवरानदीच्या प्रवाहात पुढे गेले. अन् त्यांनी महादेवांचे नाव घेत त्रिशुलाने नदीत एक कुंड तयार केला. राक्षसही त्या ठिकाणी येत होते. तेव्हा काळभैरवांनी सांगितले की, अमृत तुझ्या पोटात लपवून ठेव अन् त्यावरून प्रवाहीत हो. देवांचा आदेश प्रवरा नदीनेही ऐकला अन् तिने ते अमृत लपवून ठेवले.
आजही हे अमृत कलश महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासे गावात आहे. इथे नदीवर असलेल्या काळभैरवाच्या मंदिराखाली हा कलश आहे. त्यावरच पाण्यात हे मंदिर उभारण्यात आलं आहे. आजही श्री काळभैरव त्या कलशाचे रक्षण करतात.
तसेच या अमृताच्या रक्षणासाठी आणि राक्षसांना थांबवण्यासाठी काळभैरवांनी अष्टभैरवांनाही अवाहन केले होते. अष्टभैरवांच्या आठ मूर्तीही इथे या मंदिरात पहायला मिळतात.