मुख्यमंत्री मुंबईचे असल्याने मंत्रालयात आता दररोज कामकाज सुरू राहणार

Uddhav-Thackeray
Uddhav-Thackeray

मुंबई - राज्याला गेल्या २५ वर्षांनंतर मुंबईतील मुख्यमंत्री लाभल्याने मंत्रालय आता आठवडाभर कार्यरत राहणार आहे.

शिवसेना-भाजप युतीचे सरकार १९९५ मध्ये सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्रिपदावर मनोहर जोशी विराजमान झाले होते. जोशी यांचे मूळ गाव रायगड जिल्ह्यातील असले, तरी त्यांची संपूर्ण कारकीर्द मुंबईत राहिल्याने ते मुंबईचे मुखमंत्री असल्याचे मानले जात होते. युतीच्या सत्तेत शेवटच्या सहा महिन्यांसाठी जोशी यांच्याऐवजी नारायण राणे यांना मुख्यमंत्री करण्यात आले होते. राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीचे आहेत आणि आजपर्यंत त्यांनी ग्रामीण भागाची नाळ सोडलेली नाही.

राज्यात १९९९ मध्ये सत्तांतर झाले आणि काँग्रेस आघाडीची सत्ता आली. आघाडीच्या १५ वर्षांच्या सत्तेत विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली. विलासराव देशमुख हे लातूरचे, शिंदे सोलापूर येथील, अशोक चव्हाण नांदेडचे आणि पृथ्वीराज चव्हाण कऱ्हाड येथील आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा कारभार करताना या माजी मुख्यमंत्र्यांनी आपला मूळ मतदारसंघ किंवा जिल्हा संपर्क कायम ठेवला होता. 

मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत त्यांना मंत्रालय, मूळ जिल्हा आणि मुख्यमंत्री या नात्याने राज्यभरातील पक्षीय आणि शासकीय कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी त्यांना राज्यभर दौरे करावे लागत होते.

आघाडीच्या काळात आठवड्याच्या प्रत्येक बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक होत असे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि सर्व मंत्री मंगळवार, बुधवार आणि जास्तीत जास्त गुरुवारपर्यंत एक-दोन मंत्री उपस्थित राहत असे. म्हणजेच, मंत्री आठवड्यातील सरासरी तीन दिवस उपस्थित असत. अन्य दिवशी मुख्यमंत्री किंवा मंत्री उपस्थित नसल्याने कामकाज संथ गतीने होत होते. त्यामुळे मंत्रालयातील वर्दळही अन्य दिवशी रोडावलेली असे. 

युतीचे सरकार २०१४ मध्ये पुन्हा सत्तेवर आले आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. फडणवीस नागपूर येथील असल्याने त्यांना अनेकदा नागपूर, विदर्भ आणि राज्यभरात दौरे करावे लागत होते. फडणवीस यांच्या कालखंडात मंगळवारी मंत्रिमंडळ बैठक होत असे. त्यामुळे बुधवारपासूनच मंत्रालय ओस पडत असल्याचे पाच वर्षे चित्र होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com