Hanuman Jayanti : मारुती सुझुकी ही आज देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आहे. भारतात मारुती या नावाने त्याची सुरुवात झाली. पण फार कमी लोकांना माहित आहे की या कंपनीचे पहिले व्यवस्थापकीय संचालक माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी होते. या कंपनीच्या स्थापने मागची गोष्टही खूप रंजक आहे. आणि त्याहून विशेष काय असेल तर संजय गांधी यांनी वायुपुत्र हनुमान म्हणून मारुती हे नाव निवडलेलं..
खरं तर, डून स्कूलमधून बाहेर पडल्यानंतर संजय गांधी 1964 च्या सुरुवातीला यूकेला गेले आणि तेथे रोल्स रॉयसमध्ये इंटर्नशिप करू लागले. त्यानंतर 1966 मध्ये भारतात आल्यानंतर त्यांनी देशातील सर्वसामान्यांसाठी कार बनवण्याचं ठरवलं. त्यांनी दिल्लीतील गुलाबीबाग इथे एक वर्कशॉप देखील काढले, जिथे त्यांनी कारची बेस फ्रेम स्वतः बनवली. त्यानंतर पुढील दोन वर्षांत त्यांनी आणखी तीन प्रोटोटाइप तयार केले.
भारतातील सर्वसामान्य लोकांसाठी कार बनवण्याची कल्पना खरं तर होती इंदिरा गांधी यांची. आणि त्यांनीच संजय गांधीना ही कल्पना सांगितली. संजय गांधींच्या सूचनेच्या आधारे इंदिरा गांधींनी मंत्रिमंडळात कार उत्पादनासाठी सरकारी कंपनी स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला. यानंतर 4 जून 1971 रोजी 'मारुती मोटर्स लिमिटेड' नावाची कंपनी स्थापन करण्यात आली आणि संजय गांधी यांना एमडी म्हणून जबाबदारी देण्यात आली.
पण मारुती हे नाव कसं सुचलं?
तर डॉ. श्याम नंदन किशोर हे हिंदीचे अभ्यासक होते. त्यांनीच श्रीमती इंदिरा गांधींना हे नाव सुचवले होते. इंदिराजी रेल्वेमंत्री ललित नारायण मिश्रा यांच्याशी बोलत होत्या. अचानक त्यांनी ललित बाबूंना संजयच्या छोट्या कारचं नाव सुचवण्यास सांगितलं.
डॉ. किशोर हे देखील ललित बाबूंसोबत त्यावेळी होते. ललित बाबू म्हणाले की किशोर जी हे हिंदीचे मोठे पंडित होते. त्यांच्यापेक्षा चांगलं नाव कोणी सुचवूच शकत नाही. किशोर यांनी देखील वेळ न दवडता मारुती हे नाव सुचवलं. आणि विशेष म्हणजे इंदिराजींना देखील ते नाव आवडलं.
आता गाडीच नाव तर सुचलं पण संजय गांधी किंवा कंपनीच्या कोणत्याही सदस्याला गाड्या बनवण्याचा अनुभव नाही, असे अनेक प्रश्नही तेव्हा उपस्थित झाले होते. करारानुसार, सरकारने मारुतीला देशात प्रतिवर्षी 50,000 परवडणाऱ्या कार तयार करण्याची परवानगी दिली होती.
संजय गांधी यांनी ही कार बनवण्यासाठी फॉक्सवॅगन या जर्मन कार उत्पादक कंपनीशी बोलणीही केली होती, पण मारुती फोक्सवॅगनसोबत करार करू शकली नाही. यानंतर मारुतीचा प्रकल्प रखडला. मात्र, संजय गांधी यांच्या मारुती कंपनीला परवाना देण्यास विरोधकांकडून जोरदार विरोध होत होता.
संजय गांधींवर पुस्तक लिहिणारे विनोद मेहता यांनी त्यांच्या 'द संजय स्टोरी' या पुस्तकात म्हटले आहे की, '1971 मध्ये पाकिस्तानसोबतच्या युद्धात विजय मिळवल्यानंतर आणि बांगलादेशच्या स्वातंत्र्यानंतर मारुतीला कार बनवण्याचा सरकारी परवाना मिळाल्याची घटना सर्वजण विसरले.'
आणीबाणीनंतर सत्तेवर आलेल्या जनता पक्षाच्या सरकारने मारुती प्रकल्प बंद पाडला होता. जनता पक्षाच्या सरकारने गांधी कुटुंब आणि मारुती प्रकल्पाच्या चौकशीची जबाबदारी शाह आयोगावर सोपवली होती.
यानंतर 1980 मध्ये इंदिरा गांधी पुन्हा एकदा सत्तेत आल्या, मात्र काही महिन्यांनंतर संजय गांधींचा विमान अपघातात मृत्यू झाला. अशाप्रकारे संजय गांधी यांचे मारुती कार पाहण्याचे स्वप्न अधुरेच राहिले. मात्र, संजयच्या मृत्यूनंतर मारुती मोटर्स लिमिटेडने 'सुझुकी' या जपानी कार उत्पादक कंपनीसोबत करार केला.
डिसेंबर 1983 मध्ये संजय गांधी यांच्या निधनानंतर मारुती मोटर्सने त्यांची कार मारुती 800 लाँच केली. अशाप्रकारे संजय गांधी यांचे कार बनवण्याचे स्वप्न पूर्ण झाले आणि मारुती सुझुकीची पहिली कार भारतीय बाजारपेठेत दाखल झाली. खुद्द इंदिरा गांधींनीही पहिल्या मारुती 800 ग्राहकाला कारच्या चाव्या देण्यासाठी गुडगाव प्लांटला भेट दिली होती. यावेळी त्यांच्यासोबत राजीव गांधीही उपस्थित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.