कोल्हापुरात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यातील वाद टोकाला पोहोचला आहे. गोकुळ निवडणुकीसाठी भाजपला वगळून मित्र पक्षाच्या पॅनलला पाठिंबा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी घ्यावी, अशी थेट मागणी मंत्री हसन मुश्रीफ समर्थक संचालक युवराज पाटील आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैया माने यांनी केली आहे. यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून भाजप आणि शिवसेना सोडून राष्ट्रवादीचा आणखी कोणता छुपा मित्र आहे का, असा सवाल भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी उपस्थित केला आहे. गोकुळच्या कारभारावरून भाजप समर्थक आमदार शिवाजी पाटील यांनीही मुश्रीफ यांच्यावर केलेल्या आरोपांना अप्रत्यक्ष पाठिंबा दिल्याचे दिसत आहे. भाजप पदाधिकाऱ्यांकडून होत असलेल्या सततच्या आरोपांमुळे मुश्रीफ समर्थकही आक्रमक पवित्रा घेत असल्याने कोल्हापुरातील महायुतीत तणाव वाढण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.