मुंबई : राज्यात महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला समावून घेण्याबाबतचं निमंत्रणाचं पत्र नुकतेच मविआकडून वंचितचे समन्वयक प्रकाश आंबेडकर यांना पाठवण्यात आलं आहे. पण आता या पत्रावरुन आंबेडकरांनी पटोलेंना धारेवर धरलं आहे. तसेच तुम्ही महाराष्ट्रातील जनतेशी मनाचा खेळ करत आहात, तुमच्या मेंदूत कदाचित लोचा झाला आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. (VBA Prakash Ambedkar harsh criticism of MVA invitation said nana patole playing with people mind)
जनतेच्या मनाशी खेळत आहात
महाविकास आघाडीच्या निमंत्रणाला उत्तर देताना प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी म्हटलं की, तुम्ही महाराष्ट्रातील जनतेशी मनाचा खेळ खेळत आहात किंवा तुमच्या मेंदूमध्ये कदाचित 'लोचा' झाल्याचं दिसतं आहे. एकीकडं महाराष्ट्राचे AICC प्रभारी रमेश चेन्निथला यांनी मंगळवार, 23 जानेवारी रोजी काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत पुण्यातील काँग्रेस भवनात जिथं तुम्ही त्यांच्या शेजारी बसला होता, तिथेच निवडणूक जाहीर झाल्यावर वंचित बहुजन आघाडीचा MVA मध्ये समावेश केला जाईल, असं स्पष्टपणे सांगितलं. आता दुसरीकडं, तुम्ही स्वतःच्या स्वाक्षरीचं निमंत्रण पोस्ट करत आहात.
पटोलेंना युतीबाबत निर्णयाचा अधिकार नाही
पत्रातील इतर दोन स्वाक्षरीकर्त्यांनी, माझ्या अनेक बैठकींमध्ये माझ्याशी संक्षिप्तपणे आणि स्पष्टपणे ही बाब शेअर केली आहे की, नाना पटोलेंना काँग्रेस हायकमांडनं महाराष्ट्रात युती आणि युतीशी संबंधित निर्णय घेण्याचे कोणतेही अधिकार दिलेले नाहीत.
शिवसेनेसोबतच्या बैठकींमध्ये मला सांगण्यात आलं आहे की शिवसेना (UBT) आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्ष राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी थेट पत्रव्यवहार करतात आणि तुम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार नसल्यामुळं ते तुम्हाला लूपमध्ये ठेवत नाहीत.
राष्ट्रीय अध्यक्षांच्या स्वाक्षरींसह आदरपूर्वक निमंत्रण यावं
दरम्यान, काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत आमचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं की, VBA च्या कोणत्याही निमंत्रणावर स्वाक्षरी करणाऱ्यांनी महाविकास आघाडीतील संबंधित पक्षांचे अध्यक्ष उद्धव ठाकरे, शरद पवार आणि मल्लिकार्जुन खर्गे असावेत.
तसेच मविआमध्ये शिवसेना (UBT), NCP (शरद पवार) आणि काँग्रेस या संबंधित पक्षांच्या अध्यक्षांनी स्वाक्षरी केलेले आणि आदरपूर्वक आमंत्रण आम्हाला पाठवायला हवं. किंवा वंचितला बैठकीसाठी सारी रमेश चेन्नस्थला, राहुल गांधी, सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी निमंत्रण पाठवलं तर आम्ही कोणताही संकोच न करता बैठकीला उपस्थित राहू.