बी. आर्कच्या प्रवेशाचे निकष बदलल्यामुळे विद्यार्थ्यांची वाढली चिंता.. हे आहेत बदल...

संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र

औरंगाबाद ः बॅचलर ऑफ आर्किटेक्चर कोर्सच्या (बीआर्क) प्रवेशाचे निकष यंदासाठी बदलण्यात आले आहे. यावर्षी बीआर्क अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी बारावीच्या गुणांसंदर्भात नियमांमध्ये विद्यार्थ्यांना सवलत देण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांना घरबसल्या ही परीक्षा ऑनलाईन देता येणार आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित या विषयांसह परीक्षा उत्तीर्ण केली आहे व ज्यांनी १०+३ स्कीममध्ये गणितासह डिप्लोमा केला आहे, असे सर्व विद्यार्थी बीआर्कच्या प्रवेशासाठी पात्र ठरणार आहेत. 

काही दिवसांपूर्वी आयआयटी, एनआयटी व अन्य केंद्रीय सहाय्यता प्राप्त अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेशासाठी बारावीच्या किमान गुणांची अट सौम्य करण्यात आली होती. त्याच पार्श्‍वभूमीवर सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी, या उद्देशाने केंद्र सरकारने यावर्षी आर्किटेक्चर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी बारावीच्या परीक्षेत किमान गुणांची अट शिथिल केली. त्यामुळे बारावीत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित या विषयांसह केवळ उत्तीर्ण होणे विद्यार्थ्यांना आवश्यक करण्यात आले आहे. त्यानुसार जेईई मेन २०२० पेपर दोन आणि नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट फॉर आर्किटेक्चर (नाटा) मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे प्रवेश देण्यात येणार आहेत. 

यंदा कोरोनामुळे नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट फॉर आर्किटेक्चर (नाटा) परीक्षेला स्थगिती देण्यात आली होती. मात्र, आता परीक्षेसाठी २९ ऑगस्ट ही नवी तारीख जाहीर करण्यात आली. यावेळी ‘ए’ आणि ‘बी’ या दोन्ही परीक्षा ऑनलाईन होणार आहेत. दुसरी बाब म्हणजे, परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना बारावीत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित या विषयात किमान पन्नास टक्के गुण असणे आवश्‍यक होते. पण कोरोनामुळे यंदा ही अटही रद्द करण्यात आली आहे. 

विद्यार्थी, पालकांची 
वाढली चिंता 

बीआर्कच्या परीक्षेसाठी २०० पैकी १२५ गुण हे ड्राईंगसाठी असतात. मात्र, कोरोनामुळे यंदा ऑनलाईन परीक्षेमुळे ड्राईंग हा भाग वगळला आहे. येत्या २९ ऑगस्टला परीक्षेचा पहिला अटेंप्ट आहे. त्यानंतर दुसरा कधी होणार याबाबत अद्याप अस्पष्टता आहे. या ऑनलाईन परीक्षा पॅटर्न नेमका कसा असेल? ड्रॉईंगचा भाग वगळल्यामुळे परीक्षेत मार्क कशा पद्धतीने देणार? यामुळे विद्यार्थ्यांची चिंता वाढली असल्याचे आर्किटेक्ट रेणुका देशपांडे यांनी सांगीतले. 


दरवर्षी या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होत असतात. या परीक्षेत २०० पैकी १२५ गुण हे ड्राईंगवर असल्यामुळे मागील दोन वर्षापासून ड्राईंगवर खूप मेहनत घेतली आहे. परीक्षेत स्कोरींगसाठी ड्राईंगचा खूप फायदा होतो. मात्र, यंदा परीक्षा ऑनलाईन घेणार असून ड्राईंगचा भाग वगळला आहे. त्यामुळे दोनर्षाची मेहनत वाया गेली आहे. यंदा कोरोनामुळे विद्यार्थ्यांना सेंटर किंवा ज्या विद्यार्थ्यांकडे तांत्रिक गोष्टी उपलब्ध आहेत त्यांना घरात बसून परीक्षेची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे चिटींग होण्याचे धोका वाढणार आहे. कारण लॅपटॉपच्या पाठीमागे कोण बसेल हे परीक्षकांना कळणार नाही. त्यामुळे हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय होईल. 
-हर्षवर्धन बुरांडे, विद्यार्थी 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com