औरंगाबाद - जिल्ह्यात दोन दिवसांत दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. फुलंब्री तालुक्यातील पिंपळगाव वळण येथे एका 55 वर्षीय, तर जेहूर (ता. कन्नड) येथे 38 वर्षीय शेतकऱ्याने आपले जीवन संपविले.
तालुक्यातील पिंपळगाव वळण येथे अशोक काशीनाथ वहाटुळे (वय 55) यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (ता. 26) दुपारी उघडकीस आली.
प्राप्त माहितीनुसार, रविवारी दुपारी अशोक यांची पत्नी कासाबाई यांनी विहिरीकडे फेरफटका मारला असता त्यांना विहिरीजवळ अंगावर असलेले रग व बूट आढळले. त्यांनतर कासाबाई यांनी विहिरीत डोकावून पाहिले तर गळ्यातील तुळशीची माळ तरंगताना दिसली. यानंतर कासाबाई यांनी आरडाओरड केली.
शेजारील सर्व शेतकरी येथे जमा झाले. माजी सरपंच कारभारी वहाटुळे यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. गावातील तरुणांनी अशोक यांचा मृतदेह बाहेर काढला. अशोक यांच्यावर सेंट्रल बॅंक, सेवा सोसायटी व काही व्यक्तींचे असे जवळपास सहा-साडेसहा लाखांचे कर्ज आहे.
जेहूर : येथील दिलीप श्रीहरी पवार (वय 38) या शेतकऱ्याने कर्जामुळे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता. 27) रात्री आठच्या सुमारास उघडकीस आली. दिलीप यांना त्यांच्या वडिलांनी शेतीसाठी कर्ज काढून दिले होते; परंतु सततच्या दुष्काळामुळे उत्पन्नामध्ये मोठी घट होत होती. त्यामुळे त्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून कापसाचा व्यापार सुरू केला होता.
त्यातही नुकसान झाल्याने कर्ज वाढले. या विवंचनेतून दिलीप यांनी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. या प्रकरणात देवगाव रंगारी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. अधिक तपास बीट जमादार सुदाम साबळे आणि श्री. खुळे करीत आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.